पर्यावरणीय हानी न करता आपल्या जमिनीची मशागत कशी करावी, याची कोणी सोप्या शब्दांत माहिती दिली तर? उत्तमच ना!! गेली दहा वर्षे मानसी आणि केतकी या दोन निसर्गकन्या 'पर्यावरण पुनरुज्जीवनाचा' वसा घेऊन नेमकं हेच काम करतायत. मूळची चाळीसगावची असलेली केतकी घाटे आणि पुण्यातील मानसी करंदीकर या दोघींनी २००२मध्ये ऑयकॉस कंपनीची स्थापना केली. चाळीसगावसारख्या छोट्या गावातून रसायन आणि वनस्पतीशास्त्र या दोन्ही विषयांत पदवी घेतल्यानंतर केतकी पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली. तर उपकरण शास्त्रात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर मानसीने पर्यावरण शास्त्रात एमएसस्सी केलं. दोघींना पर्यावरणाची प्रचंड आवड, त्यातूनच त्यांनी प्रकाश गोळे यांच्याकडे 'नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट' हा कोर्स केला. तिथेच या दोघींची मैत्री होऊन आयकॉसचा जन्म झाला. निसर्गाचा अभ्यास, त्याचा प्रत्यक्ष उपयोग आणि त्याला व्यावसायिकतेची जोड असं तिहेरी आव्हान आयकॉस या आपल्या संस्थेच्या माध्यमातून पेललं आहे. असा वेगळा विचार का करावासा वाटला यावर त्या म्हणतात, आपल्याकडे असणारे कौशल्य दुसऱ्यांच्या उपयोगी आले तर उत्तमच. आम्हाला दोघींना निसर्गाची प्रचंड आवड तर आहेच पण मग त्यातच पूर्णवेळ कामही करता यावं आणि अर्थार्जनही व्हावं हा यामागील एक हेतू होता.
मोठ्या जमिनी, नवीन शहरं, फार्म हाऊस अशा प्रकल्पात जमिनीच्या विकासाचा तेथील निसर्गाला अनुसरून आराखडा बनवणं, प्राणी पक्ष्यांसाठी आसरे तयार करणं आणि बरोबरीने तेथील नैसर्गिक संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करणे हे या कंपनीचं मुख्य काम आहे. या क्षेत्राकडे मुली सहसा वळताना दिसत नाहीत. यावर मानसी म्हणाली, 'मुळात निसर्गाची आवड हवी आणि त्यासाठी काहीतरी करण्याची आंतरिक उर्मी हवी, हे सगळं असेल तर आपण आपल्या घरच्यांनाही ते समर्थपणे पटवून देऊ शकतो. फक्त या क्षेत्रात येताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, की इतर क्षेत्रांसारखा गलेलठ्ठ पगार इथे मिळत नाही.' एका आगळ्यावेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकून तिथे आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या या दोघी निसर्गसेविका या क्षेत्रात नक्कीच उंच भरारी घेतील यात शंकाच नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट