AparnapMT
हॉलिवूडमध्ये अजूनही पुरुष कलाकारांइतके मानधन मिळावे, यासाठी असलेल्या संघर्षाला पुरेसे बळ मिळालेलं नाही. तरीही वर्षभरातील हॉलिवूडपटांच्या यशात महिलांचा वाटा मोठा आहे. एका अभ्यासाअंती एक गोष्ट सिद्ध झाली आहे, ती म्हणजे बॉक्सऑफिसवर गल्ला केवळ हिरोमुळे होतो, हा समज या वर्षाने खोटा ठरवला आहे. अनेक महिला कलावंतांसाठी ही बाब निश्चितच आनंददायी आहे. त्याहीपेक्षा केवळ सिनेमाच नाही, तर प्रत्येक क्षेत्रांत काम करत असलेल्या महिलांसाठी बदल घडवणारी आहे, कारण सिनेमा हा प्रत्येकाच्या मानसिकतेवर नकळत का होईना परिणाम करतोच.
जगभरात हॉलिवूडपटांचा वरचष्मा आहे. तगड्या पुरुष स्टारकास्टचे आकर्षण हेही त्याचे कारण आहे. त्यामुळेच गेली तीन-चार दशके केवळ काही विशिष्ट नावांभोवती हॉलिवूड फिरते, असेच चित्र आहे. भारतातही तीच परिस्थिती आहे. आपण हॉलिवूडमध्ये महिलांसाठी चांगल्या संधी असतात. त्यांच्यासाठी खास सिनेमे तयार केले जातात, असे म्हणत असलो, तरी प्रत्यक्षात स्थिती फारच वेगळीच आहे. त्याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत आलाय. हॉलिवूडमधल्या महिला कलाकारांचे प्रश्न काही वर्षांत तीव्रपणे समोर आलेत. समान वेतनाच्या मागणीसाठी त्यांना जाहीरपणे नाराजी व्यक्त करावी लागली. वंश-वर्ण भेदाच्या भिंत पाडायला हव्यात, अशी आवाहने पारितोषिक वितरणाच्या व्यासपीठांवरून करावी लागली. त्याला प्रसंगी पाठिंबा, तर कधी ट्रोलचाही सामना करावा लागला. हे सगळे सुरू असताना, हार्वे वाइनस्टीन या निर्मात्याने केलेल्या लैंगिक छळाची मालिकाच उघड झाल्याने हॉलिवूडमधल्या सक्षम कलाकारांनाही भूमिका मिळण्यासाठी कधी शारीरिक छळ, अपमानस्पद आणि भेदाच्या वागणुकीला तोंड द्यावे लागले, हे दिसून आले.
या सगळ्या नकारात्मक वातावरणात वर्षाअखेरीस आलेल्या एका बातमीने दिलासा दिलाय. तो म्हणजे यंदा हॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवर महिला कलाकारांनीच पुरुषांच्या तुलनेत अमाप यश कमावले आहे, याचा. हा मुद्दा निव्वळ कमाईचा नाही, तर या निमित्ताने झालेल्या अभ्यासातून अनेक दिलासादायक गोष्टी समोर आल्या आहेत. हे सगळे सांगण्याआधी या अभ्यासाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ‘क्रिएटिव्ह आर्टिस्ट एजन्सी’ (सीएए) या संस्थेने २०१४ ते २०१७ दरम्यान प्रदर्शित झालेल्या साडेतीनशे सिनेमांचे परीक्षण केले. त्यापैकी केवळ १०५ सिनेमे हे महिलांची प्रमुख भूमिका असलेले होते. या सिनेमात बॅकडेल चाचणी घेण्यात आली. या कसोटीनुसार ज्या सिनेमात दोन महिला कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत आणि त्यांच्या संवादात पुरुषांचा उल्लेख नाही, असे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेत, असे आढळून आले आहे.
ज्या सिनेमात महिला प्रमुख भूमिकेत असते, ते सिनेमे चालत नाही, असा जो काही समज खोलवर रूजला आहे, तो खोटा पडला आहे. त्यांच्यातही सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्याची ताकद आहे. हे या निष्कर्षामुळे सिद्ध झाले आहे. मूळात असा अभ्यास करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सीएएला हॉलिवूडमध्ये महिलांना अधिकाधिक संधी मिळावी, असे वातावरण तयार व्हावे असे वाटते. अन्य वंश-वर्णाचे कलाकार यांनाही प्रतिष्ठेनुरूप भूमिका मिळावी, यासाठी दबाव निर्माण करणे हाच हेतू होता, शिवाय पडद्यावर महिलांचे चित्रण अधिक संवेदनशीलरित्या केले जावे. त्यांची प्रतिभा, प्रतिमा लैंगिकतेच्या पारड्यात मोजली जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचा उद्देश त्यामागे होता. त्यामुळेच पुरुष कलावंतांचा पगडा, वर्चस्वाला आव्हान देण्याची क्षमता महिला कलाकारांमध्ये आहे. ते आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे, हे या चाचणीच्या निष्कर्षाने सिद्ध झालेय.
या यशामुळे पुढच्या वाटा सोप्या होण्यास मदत होणार आहे. हे चित्र भारतीय सिनेमांतही दिसेल, अशी चिन्हे आहेत. अगदी लैंगिक छळाविरोधात कलाकार पुढे आल्यानंतर येथेही थोड्या फार प्रमाणात हा बदल झाला आहे. इतकेच नाही थेटपणे आव्हान दिल्याची उदाहरणे दिसायला लागली आहेत. महिला कलाकारांना मिळणारी पक्षपाती वागणूक, त्यांच्या भूमिकांचे केलेले लैंगिकीकरण, त्यांच्या पेहरावापासून चारित्र्यांपर्यंत सगळ्यावर उडवले जाणारे शिंतोडे आणि त्यांच्या शारीरिक ठेवणीविषयीच्या चर्चा या पलीकडे जाऊन त्यांनी केलेल्या क्षमतांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे, शिवाय महिलांच्या वाट्याला आलेल्या भूमिका, त्यांचे प्रश्न थेटपणे चर्चेला आले, हे समाधान देणारे आहे. अगदी थेटपणे पुरुष कलावंतांना जाब विचारण्याचा पवित्रा घेण्याचे धाडसही त्या दाखवू लागल्या आहे. अगदी याच आठवड्यात सिनेमाशी संबंधित काही कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्याचा फोटो अक्षयकुमारने सोशल मीडियावर टाकताच, दिया मिर्झाने या बैठकीला एकाही महिला सदस्याला आमंत्रण का मिळू शकले नाही, असा प्रश्न त्याला जाहीरपणे केला. प्रश्न साधा असला, तरी यापुढे अशा प्रश्नांची दखल घ्यावी लागेल किंवा पुढच्या वेळी कदाचित सहकारी महिलांना स्थान देण्याची तयारी स्वतःहून दाखवली जाईल.
बॅकडेल चाचणी म्हणजे काय?
सिनेमांसाठी हॉलिवूडमध्ये ही कसोटी मांडली गेली आहे. ती ‘बॅकडेल-वॉलेस’ नावानेही ओळखली जाते. अमेरिकन कार्टूनिस्ट अलिसन बॅकडेलयांनी ‘डाइक्स टू वॉच आउट फार’ या चित्रमालिकेतून १९८५ मध्ये महिलांच्या सिनेमातील संधीकडे लक्ष वेधण्यासाठी या व्यंगचित्रमालिकेचा आधार घेतला होता. यात जे मुद्दे मांडले गेले होते, ते आता ‘बॅकडेल’ चाचणी नावाने ओळखले जातात. ही व्यावसायिक सिनेमांसाठी असलेली कसोटी आहे. यात तीन प्रमुख अटी आहेत. सिनेमात दोन महिलांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत का, ज्या एकमेकांशी संवाद साधतात आणि त्या एकमेकींशी बोलताना पुरुष हा विषय सोडून अन्य विषयांवर संवाद साधतात. ही चाचणी महिलांच्या सशक्त भूमिकांना वाव मिळावा, या दृष्टीने चर्चा व्हावी किंवा पावले टाकवी, यासाठी होती. एका व्यंगचित्रांच्या मालिकेतून पुढे आलेला हा विचार प्रेरणादायी ठरला आहे. महिलांना सिनेमात केवळ ‘शोभेची बाहुली’ म्हणून वावरण्याची संधी न देता त्यांनाही पुरुष कलाकारांइतके महत्त्व मिळावे, ही भावना तीव्रपणे पोहोचवण्यासाठी ही चाचणी फायद्याची ठरली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट