Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सावित्रीचा वड

$
0
0

वटपौर्णिमेचे व्रत करताना त्यातील खरे मर्म जाणून घेतले पाहिजे. पौराणिक कथेतील खरे तत्व आणि वैज्ञानिक अनुष्ठान समजून ते अंगिकारले पाहिजे. स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री शक्तीचा महिमा जाणून घेऊन, कुटुंबातील, समाजातील मुली-स्त्रिया खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या पाहिजेत. स्त्रियांनी स्वतःतील क्षमता ओळखून वाढवली पाहिजे. पुराण कथेतील वास्तवता आणि आजच्या काळात तिची उपयोगिता लक्षात घ्यायला हवी.

सुरेखा गायखे - बोऱ्हाडे

ऑफिस सुटल्यानंतर मैत्रिणींच्या घोळक्यात दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'वट पौर्णिमे'चे व्रत, त्याची तयारी यासंबंधी चर्चा अगदी जोरात रंगली होती. एक मैत्रीण उत्साहाने सांगत होती, 'वटपौर्णिमेसाठी सासूबाईंनी माझ्यासाठी सुंदर साडी आणली आहे; कारण लग्नानंतरचे हे माझे पहिले व्रत आहे. मी अगदी नटूनथटून वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहे.' सर्वजणी तिचे हे कौतुकमिश्रित बोलणे अगदी आनंदाने ऐकत होत्या. त्यातील थोडी अनुभवी मैत्रीण म्हणाली, 'सावित्रीने आपल्या पतीचे प्राण साक्षात यमधर्माकडून परत आणले, म्हणून तिच्या नावाने हे व्रत सर्व स्त्रिया करतात. यामुळे आपला पतीही दीर्घायू होईल अशी स्त्रियांच्या मनात श्रद्धा असते. खरे सांगू का यामुळे पुरुषांनाही बरे वाटते. पुरुषवर्गाचा अहं सुखावणारी आणि वाढवणारी शेकडो व्रतवैकल्ये आपल्या समाजातील स्त्रिया वर्षानुवर्षे अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने करत आल्या आहेत. या व्रतामागची परंपरा, कारणे खऱ्या अर्थाने समजून घेऊन, तसे ते व्रत आपण करतो का, याला महत्त्व आहे.' हे आणि अशाच प्रकारचे वैचारिक मंथन आज कुठलाही सण-उत्सव, व्रत-वैकल्य आल्यावर होताना दिसते. ते योग्यही आहे.

स्त्री शिक्षणाने वैचारिक क्रांती झाली. तरीही बऱ्याचदा असे होते, की पूर्वापार परंपरा आहे ना, मग त्यानुसार आपण तिचे पालन केले पाहिजे. जुने आहे त्याप्रमाणे चालले पाहिजे, अशी सर्वसामान्य प्रवृत्ती दिसते. ही व्रत-वैकल्ये, उपवास, रूढी-परंपरा यांचा सांस्कृतिक रंग सातत्य असल्याने गडद झाला आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून चालण्याचाच प्रयत्न जास्त असतो. सूक्ष्मतेने बघितल्यास स्त्रियांची अनेक व्रते ही पुत्ररक्षणाच्या आणि सौभाग्य रक्षणाच्या हेतूने आलेली आहेत. आज सौभाग्यवाचक जी व्रते दिसतात, ती ज्येष्ठ महिन्यापासून आषाढापर्यंत चार-पाच महिन्यांत साजरी केली जातात. मूलतः त्यांचा संबंध भूनिर्मित वनस्पतींशी, जीवनोपयोगी निसर्गसंपत्तीशी आहे. ही व्रत वैकल्ये निसर्गाशी, पर्यावरणाशी संबंधित आहे. निसर्गाने दिलेल्या भूनिर्मित दानाविषयीची कृतज्ञता व्रत-वैकल्यांतून व्यक्त केली जाते. वटपौर्णिमेवेळी वट या संजीवन वृक्षाची पूजा करण्याचा प्रघात जसा आहे, तसेच नवरात्रातील घट स्त्री गर्भाशयाचे आणि सृष्टिगर्भाचेही प्रतीक आहे, म्हणून नवरात्रीचे व्रत केले जाते. गुढीपाडव्याला निंबाची सुकुमार कोवळी आरोग्यदायी पाने गुढी उभारण्यासाठी, ती पाने खाण्यासाठी उपयोगात आणली जातात. याद्वारे निसर्ग आणि मानव यांचा घनिष्ठ सहसंबंध पुनःपुन्हा अधोरेखीत केला जातो. लोकभाषेतून हा संबंध वारंवार दर्शविला गेला आहे. लेकी-बाळींनी मोठ्यांना नमस्कार केल्यावर, त्यांना 'जन्मसावित्री हो' असा आशीर्वाद दिला जातो.

स्त्रीला होणाऱ्या अपत्यासाठी 'पोटी फळ येणे' ही वनस्पतीची परिभाषा वापरली जाते. ही व्रतवैकल्ये प्रतीक उपासना असतात. भूमीपासून अन्नधान्यादी वनस्पतींची निर्मिती आणि स्त्रियांमध्ये असलेली अपत्य निर्मिती या दोन्ही शक्ती मानवासाठी कायमच पूजनीय ठरल्या आहेत. ही व्रतवैकल्ये खरे तर स्त्रीमाहात्म्य सांगणारी आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र ही व्रते पुन्हा एकदा पुरुष माहात्म्य सांगण्यासाठी वापरली गेली. वटपौर्णिमेला अनेक स्त्रिया वडाला दोरा गुंडाळत सात फेऱ्या मारतात. सात जन्म हाच पती लाभो आणि त्याचे आरोग्य चांगले राहो, अशी कामना करतात. कित्येकदा स्त्रियांच्या या भावनिकतेवर, व्रतसंस्कारावर हास्य, विनोद होतात.

आजच्या कामाच्या व्यापात, घाईगर्दीत स्त्रिया हे व्रत परंपरा म्हणून डोळे झाकून पार पाडत असतात. आजूबाजूला वृक्षांची संख्या कमी झाली आहे. त्यात पूजेसाठी वड मिळणे दुष्कर झाले आहे. आता तर अगदी दुर्मीळ झालेल्या वडाच्या फांद्या ओरबाडून, सर्रास बाजारात विक्रीला आणलेल्या दिसतात. त्या फांद्याची पूजा केली जाते. तीही उपलब्ध झाली नाही, तर वडाच्या चित्राची पूजा केली जाते. हरितालिका व्रतासमयी तसेच गुढीपाडवा आणि इतरही सणांच्या काळात वनस्पतींची पाने, फुले जास्त वापरून, त्याचे निर्माल्य केले जाते. हे करताना या व्रतामागचा मूळ उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. वड खऱ्या अर्थाने संजीवन वृक्ष आहे. त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडला जातो. वडाच्या वृक्षाची मुळे वंशवृद्धीसाठी उपयोगी असतात. त्याचे फळ, पान दृष्टिदोषावर गुणकारी असतात. वडाचे हे महत्त्व आणि माहात्म्य सावित्रीच्या कथेची जोड देऊन सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्रतामार्फत झाला आहे. ज्येष्ठ महिन्यात वर्षा ऋतूचा शुभारंभ होतो. मान्सूनच्या सुरुवातीला वडासारख्या आरोग्यदायी वृक्षाची पूजाच नाही, तर निंब, आंबा, बाभूळ, पिंपळ या वृक्षांचे रोपण करून, त्यांचे संवर्धन करून, पृथ्वी हिरवाईने नटवली पाहिजे. व्रतवैकल्य, उपासना यांच्या नावाखाली वृक्ष-वेलींना लुटले जाते.

लोकपरंपरेतील अनेक व्रत-वैकल्ये, उपासना, देव-धर्मविषयक धारणा यांतून एक लक्षणीय वैशिष्ट्य जाणवते. हे सर्व ऐहिक सुखासाठी, संपन्नतेसाठी केले जाते. कुटुंब, समाजातील व्यक्तींच्या आरोग्यसंपन्नतेसाठी वैज्ञानिक दृष्टी ठेवून या व्रतांची सुरुवात झाली आहे. दैनंदिन जीवनातील अडथळ्यांचे निवारण करणाऱ्या सर्व उपासना, विधी, रूढी हा सगळा लोक धर्म आहे. या सर्वांतून जीवनात आनंद, मनोरंजन, उल्हास साधण्याचा प्रयत्न होताना दिसतो. हे सर्व निर्माण करण्यात स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा ठरत आला आहे. प्राचीन काळापासून प्रकृती आणि स्त्री यांची नवनिर्माणक्षमता वंदनीय ठरली आहे. म्हणूनच प्रकृती आणि स्त्री या दोघींमध्ये अतूट नाते आहे. प्रकर्षाने स्त्रीचा ओढा निसर्गाकडे राहिला आहे. शेतीचा शोध स्त्रीनेच लावला आहे. प्राचीन कृषिव्यवस्थेमध्येही जमिनीची निर्माणक्षमता वाढावी, म्हणून सीतायज्ञ विधी केला जायचा. आज हा विधी लोप पावला असला, तरी जमिनीच्या सुफलीकरणासाठी अपत्यवतीने करावयाच्या अनेक चालीरिती कृषिजीवनात विद्यमान आहेत. स्त्रीया कृषिविषयक कामे अगदी तन्मयतेने करताना दिसतात. यातूनच विविध व्रत-वैकल्य, सणवार यांची निर्मिती झाली आहे.

वटपौर्णिमेचे व्रत करताना पतीच्या प्राणाचे रक्षण करणाऱ्या सावित्रीचे रूप सर्वांना भावते. हे करताना तिने यमधर्माशी केलेले वैचारिक बुद्धिवाद, तात्विक, चतुर वाद लक्षात घेतला पाहिजे. यमधर्माशी युक्तिवाद करायचा, म्हणजे सावित्रीमध्ये विलक्षण बुद्धी, चातुर्य, वाकपटुत्व होते. मुख्य म्हणजे तिच्यात धैर्य आणि आत्मविश्वास होता. असे पांडित्य, आत्मविश्वास आपल्या घरातील स्त्रियांमध्ये असावा, असे मानणारी पुरुषमंडळीही कमी असतात. घरातील स्त्रीने अगदी सावित्रीप्रमाणे पतिव्रता असावे, असेच आजही पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला वाटत असते. सीतेप्रमाणे तिने पतीच्या आज्ञांचे कायम पालन करावे आणि सावित्रीप्रमाणे अगदी कितीही मोठे संकट आले, तरी त्याविरुद्ध संघर्ष करून पतीचे प्राण वाचवणारे दैवी सामर्थ्य तिच्यामध्ये असले पाहिजे, असेच आजही वाटत असते. दैवी सामर्थ्य असलेली सावित्री बुद्धिवादी, विचारी, आत्मविश्वासाने परिपूर्ण, म्हणजे सर्वच दृष्टीने समर्थ आणि स्वतंत्र होती. तिचे हे सामर्थ्य यम समोर आला तेव्हा प्रकट झाले, असे म्हणता येणार नाही. यामागे तिच्या माता-पित्यांचे मोठे कर्तृत्व होते. पिता अश्वपती आणि राणी मालवी यांच्या मनात सावित्री मुलगी असल्यामुळे कोणतीही न्यूनत्वाची भावना नव्हती. तिला त्यांनी सर्व प्रकारचे शिक्षण दिले. सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक ते सर्व त्यांनी केले. सावित्री खूप शिकली, तर तिचे लग्न करणे जड जाईल, ही भीतीही त्यांनी ठेवली नाही.

सुसंस्कृत, प्रगल्भ जाण असलेली तेजस्वी सावित्री बनली, याचे खूप मोठे श्रेय तिच्या माता-पित्यांना जाते. अशाप्रकारे आपल्या मुलींनाही सावित्रीसारखे तेजस्वी होण्यासाठी घराघरांतून प्रयत्न होतात का, हा विचार या व्रतानिमित्ताने झाला पाहिजे. पुढे सावित्रीला त्यांनी पतीनिवडीचे स्वातंत्र्य दिले. सावित्रीने एका दरिद्री, वनवासी; परंतु सात्विक, गुणवान तरुणाची निवड केली. अल्पायू असण्याच्या कारणाने राजाने सावित्रीला पुन्हा विचार करायला सांगितला. मनाने पतीवरण केल्यामुळे ती आपल्या निश्चयाशी ठाम राहिली. वडिलांनी तिच्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान केला. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी आणि ते पेलण्याची जबाबदारी म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्यातून घेतलेल्या निर्णयाच्या परिणामाला तोंड देण्याचे सामर्थ्य त्यातून निर्माण होते. हेच गुण सावित्रीत निर्माण झाले. जीवनात येणाऱ्या सर्वच संकटांना तिने तोंड दिले. नवऱ्याला जीवदान आणि सशक्तपणा, सासऱ्याची दृष्टी, पुत्रप्राप्ती आणि गेलेले राज्यवैभव शत्रूकडून तिने परत मिळवले, ते स्वतःच्या निर्णयक्षमतेच्या बळावर.

हे व्रत करताना त्यातील खरे मर्म जाणून घेतले पाहिजे. एक बाजू असलेल्या पौराणिक कथेतील खरे तत्व आणि दुसरी बाजू असणारे वैज्ञानिक अनुष्ठान समजून ते अंगिकारले पाहिजे. या वटपौर्णिमेतून स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री शक्तीचा महिमा जाणून घेऊन, त्याप्रमाणे कुटुंबातील, समाजातील मुली-स्त्रिया खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या पाहिजेत. स्त्रियांनी स्वतःतील क्षमता ओळखून वाढवली पाहिजे. पुराण कथेतील वास्तवता आणि आजच्या काळात तिची उपयोगिता लक्षात घ्यायला हवी. त्याचप्रमाणे नवनिर्माणाची सुरुवात म्हणून या दिवशी वृक्षलागवड करून, त्याचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>