Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

दागिना

$
0
0

दागिने सौंदर्यवृद्धीसाठी, अभिरूचीसाठी वापरले जात असले, तरी ते काही प्रमाणात बंधनही ठरत आहे. तेव्हा या बंधनाचा किती स्वीकार करायचा, हे स्त्रियांनी ठरवले पाहिजे. आज मुलींमध्ये दागिने वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मुलींचे खरे दागिने सुदृढ शरीर, बुद्धीची चमक, कार्याची धमक हे आहेत. या दागिन्यांमुळे खऱ्या अर्थाने त्या सोन्यासारख्या झळाळतील आणि हिऱ्यासारख्या चमकतील!

सुरेखा गायखे-बोऱ्हाडे

'कार्यक्रमाला जायचे म्हणून मी आधीच अर्धा तास आलो, तरीही तुझे आवरलेले नाही? तू कधीपासून आरशाशी गप्पा मारते आहेस. गळ्यात हा हार घालू की तो? हातात काय घालायचे, कानात काय? बाप रे! वाट बघून कंटाळलो आहे. झाला येथेच कार्यक्रम उरकला,' अशी वाक्ये घराघरांतून ऐकू येतात. एखाद्या कार्यक्रमाला, उत्सवाला जायचे म्हटले, की बायकांना तयार व्हायला वेळ लागतोच. कपड्यांची निवड आहेच; परंतु त्यावर कोणते आणि किती दागिने घालायचे, यासाठीही बराच वेळ मोडतो. प्रत्येक स्त्रीला दागिन्यांचा सोस असतोच.

कितीही नाही म्हटले, तरी स्त्रियांकडे एखाद-दुसरा दागिना असतोच असतो. असे कशाला, लहानपणापासून मुलीच्या गळ्यात हार, कानात डुल, हातात बांगड्या आणि पायात पैंजण घातले जाते. लाडकी लेक पहिले पाऊल टाकते, तेव्हा ती छुमछुम मनाला भावते. बाळ मुलगा असो किंवा मुलगी पायात वाळे, घुंगराचे पैंजण घातले जाते. त्याची रुणझुण सर्वांनाच आवडते. पैंजण हा एक दागिना आहे. पैंजण या दागिन्याला अनेक नावे आहेत, तोरड्या, साखळ्या अशी. नामदेवांच्या एका अभंगात तर श्रीकृष्णाच्या पायात 'अंदू' आहेत, असा उल्लेख आहे.

परब्रह्म निष्काम तो हा गौळीया घरी

वाक्या, वाळे, अंदु कृष्णा नवनीत चोरी।

या अभंगातील अंदु हा कानडी शब्द आहे. हत्तीच्या पायातील भक्कम साखळीसाठी अंदू हा शब्द वापरला जातो. महाराष्ट्रातही अंदु हा शब्द यादव काळापासून वापरला जातो. याविषयी विचार करताना हत्तीला बंधनात ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळदंडांप्रमाणे स्त्रीच्या पायतल्या साखळ्या या तिच्या बंधनासाठीच का, हा विचार नाही म्हटले तरी विजेसारखा चमकून गेलाच. पैंजणच कशाला, मुली, स्त्रिया अनेक दागिने शरीरावर परिधान करतात. नववधूच्या पैंजणाची, जोडव्यांची, हातातल्या काकणांची किणकिण संपूर्ण घराला सुमधूर नाद देते. स्त्रियांनी दागिने वापरण्याची परंपराच तयार झाली आहे. दागिने वापराच्या या परंपरेमुळे ते आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत. पुरुषही काही प्रमाणात दागिने वापरतात; परंतु स्त्रिया या मोठ्या प्रमाणात दागिने वापरताना दिसतात. स्त्रियांना दागिने आवडतात, की परंपरेने ही दागिन्यांची आवड निर्माण केली आहे, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माणूस हा कायमच सौंदर्याचा, कलेचा भोक्ता आहे. सुंदरता, कलाकुसर कायमच त्याला आकर्षित करते; म्हणून स्वतःची भूक शमवल्यानंतर आपोआपच त्याचे लक्ष निसर्गातील सौंदर्याने वेधून घेतले. निसर्गातील फुले, फळे, पाने, माती, रंग, वेली यांच्या साहाय्याने स्वत:ला सजवणे सुरू केले. त्यानंतर मानवाच्या विकासाच्या प्रवाहात विविध धातूंचा शोध लागत गेला, तसतसे सौंदर्यवर्धक साधनांतही बदल होत गेले.

सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम आणि आता तर प्लॅटिनमसारख्या महागड्या धातूंचा उपयोग दागिने बनवण्यासाठी होऊ लागला आहे. निसर्ग निर्मित हिरे, माणके, मोती, पोवळे यांसारख्या शोभिवंत चिजांचा उपयोग मानव दागिन्यांसाठी करू लागला. दागिने बनवणे ही एक कला आहे, त्यातही कौशल्य दाखवून निसर्गात उपलब्ध असलेल्या या सुंदर गोष्टींप्रमाणेच खोटे दागिने बनवण्यातही त्याने प्रावीण्य मिळविले आहे. दागिने बनवणे, घडवणे आणि तिचे मार्केटिंग या क्षेत्रात जागतिक पातळीवर कितीतरी मोठी उलाढाल होते. दागिने हा घटक जीवनावश्यक गोष्टीत मोडत नाही. मानवाला मात्र त्याची आवडच नव्हे, तर सोस आहे. पुरुषापेक्षा स्त्रिया दागिने जास्त परिधान करतात. स्त्रिया डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत स्वतःचे सौंदर्य आभुषणाने खुलवण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी पुरुषही बऱ्यापैकी गळ्यात माळा, बोटात अंगठी, कानात बाळ्या, भिकबाळ्या, पायात तोडा वापरत असत. कालपरत्वे, परिस्थितीनुरूप हे प्रमाण कमी होत गेले. स्त्रिया मात्र आजही दागिन्यांच्या बंधनात, मोहात अडकलेल्या आहेत, की अडकवून ठेवल्या आहेत, हेच कळेनासे झाले आहे. कवी 'बी' यांनी म्हटले आहे,

ते स्वातंत्र्य खरे न, फक्त अपुली तोडिते बंधने

अन्यांच्या पदशृंखलास बघते, निष्कंप ऐशा मन।

परंपरेने मुलींना हातात बांगड्या, कानात डुल, गळ्यात हार, साखळी, पायात पैंजण घातले पाहिजे, असा आग्रह धरला जातो. मुलींचे लग्न झाल्यानंतर या आभूषणांमध्ये वाढ होते. पुरुष दागिन्यांच्या वापरापासून, मोहापासून बाजूला झाला. स्त्रियांच्या जीवन व्यवहारातील इतर बंधनाप्रमाणे हे दागिन्यांचे बंधन क्रमाक्रमाने वाढतच गेलेले जाणवते. वेगवेगळ्या कारणांसाठी स्त्रियांना दागिने घालणे अनिवार्य केले जाते.

सौभाग्यवतीने गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी, हातात काचेच्या बांगड्या घालणे आवश्यक समजले जाते. मारवाड, राजस्थानमध्ये माथ्यावरील भागात बिंदी किंवा त्याला भांगसार म्हटले जाते, तो अलंकार सौभाग्याचे लेणे म्हणून वापरला जातो. हे सौभाग्य अलंकार दिवस-रात्र परिधान करण्याची प्रथा आहे. रोजच्या जीवनात ते वापरायचे असल्यामुळे, त्यात आर्थिक परिस्थिती, अभिरूची, धारणा आणि सौंदर्यदृष्टीनुसार विविधता, वेगळेपणा आले आहे. या सर्वांत पैशाचा, वेळेचा किती अपव्यय होतो, हे लक्षात घेतले जात नाही. या बरोबरच या आकर्षक व्यवधानाकडे स्त्रिया एवढ्या मग्नतेने लक्ष देतात, की इतर जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होते. बऱ्याचदा मुली, स्त्रियांचे स्वतःचे आरोग्य, स्वतःच्या शरीराची स्वच्छता, स्वतःचे करिअर, इतर कामे या गोष्टींकडे कधीकधी दागिन्यांच्या झगमगाटामुळे दुर्लक्ष होते. दागिने बनवणे, मिळवणे, घालणे आणि ते समाजात मिरवणे, यालाच महत्त्व दिले जाते. सोने, चांदी, मोती आणि हिऱ्यांचे किती दागिने आहेत, यावर श्रीमंती मोजली जाते. भारताला 'सोने की चिडिया' असे संबोधले जाते. खरेच आहे ते. येथील प्रत्येक स्त्रीकडे सोने असतेच असते. त्याची मोजदाद केल्यास 'अहो आश्चर्यम' अशीच गत होईल.

हुंडा नावाचा एक करूण पदर दागिन्यांच्या रूपाने स्त्रीजीवनाला जोडला गेला आहे. हुंडा म्हणून मुलीच्या लग्नात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी केली जाते. हुंड्याच्या या देण्याघेण्यामुळे, हेव्यादाव्यामुळे, भांडणामुळे कितीतरी मुलींच्या सुंदर जीवनाला गालबोट लागले आहे. स्त्रीजवळ असणाऱ्या दागिन्यांना तिचे स्त्रीधन म्हणून संबोधले गेले, ते नावापुरतेच. मुली, स्त्रियांचे आरोग्यदायी जीवन हीच खरी संपत्ती आहे. मानवता, सहृदयता हाच खरा त्यांचा दागिना आहे, हे या नश्वर दागिन्यांचा चमचमाटात विसरायला होते आहे.

दुसऱ्या बाजूने विचार केल्यास, आयुर्वेदात सोने-चांदीसारखे धातूचे दागिने शरीरावर वापरल्यास त्याचा शरीराच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे सांगितले आहे. हे दागिने शरीरावरील विशिष्ट बिंदूवर प्रभाव टाकतात; त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. शरीर-मन प्रसन्न राहते. सोन्याचे दागिने शरीरावर कंबरेच्या वरील भागात, तर चांदीचे दागिने संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. अर्थात, परंपरेने स्त्रियांना अनेक प्रकारचे दागिने घालायला सांगितले आहेत. त्यामागे काही ना काही आरोग्यविषयक कारणही जोडले आहे. ही सारी कारणे पुरुषांच्या उपयोगाचीही आहेत, याकडे मात्र सगळ्यांचे सोयिस्कर दुर्लक्ष होते.

मीराची नणंद उदाबाई मीराला साजशृंगार करून पतीच्या महालात जाण्याचा आग्रह करते. तेव्हा ती म्हणते,

साधोकी सङ्‌ति दुखभारी, मानो बात हमारी

छाया तिलक गलहार उतारी, परिरोहार हजारी

रतनजडित पहिरो आभूषण, भोगो भोग अपारी

मीरांजी चलो महले में, थाने सौगंध हमारी।

मीराबाई ही स्वतंत्र विचार करणारी स्त्री आहे. श्रीकृष्ण भक्ती हाच तिला मोठा अलंकार वाटतो. दागिने सौंदर्यवृद्धीसाठी, अभिरूचीसाठी वापरले जात असले, तरी ते त्यांच्यासाठी काही प्रमाणात बंधनही ठरत आहे. तेव्हा या बंधनाचा किती स्वीकार करायचा, हे स्त्रियांनी ठरवले पाहिजे. सोन्या-चांदीचे दागिने वापरणे किंवा बाळगणे जसे धोकादायक आहे, तसेच सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम हे धातू सोडून इतर धातूंचे दागिने वापरणे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज तर मुलींमध्ये दागिने वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मुलींचे खरे दागिने सुदृढ शरीर, बुद्धीची चमक, कार्याची धमक हे आहेत. या दागिन्यांमुळे खऱ्या अर्थाने त्या सोन्यासारख्या झळाळतील आणि हिऱ्यासारख्या चमकतील!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>