Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

पर्ज्युरीचा अर्ज

$
0
0

अॅड. जाई वैद्य

प्रश्न : माझे लग्न डिसेंबर २०१७मध्ये झाले. हे पाहून, ठरवून केलेले लग्न असल्याने लग्नाचा खर्च (हॉल, केटरर) दोन्ही बाजूंनी अर्धा अर्धा केला आहे. लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवताना मला थोडा कमजोरपणा आला. हे माझ्या पत्नीने तिच्या माहेरी सांगितले. तिच्या घरच्यांनी सांगितलेल्या डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी सिमेन अॅनालिसिस टेस्ट केली; पण तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आमच्यात दोनदाच संबंध आले; पण ते यशस्वी झाले नाहीत. डॉक्टरांनी आमचे समुपदेशन करताना सांगितले, की हा आतला आजार नॉर्मल माणसाला समजून येत नाही. तुमच्यात सुसंवाद, संबंध असायला पाहिजे; त्यामुळे यामधे फरक पडेल. इतरही उपचारपद्धती आहे. लग्नाआधी याचा काही अनुभव नसतो माणसाला. मी तिला समजावले; पण तिने समजूतदारपणा दाखवला नाही. माझ्याशी, कुटुंबाशी चांगले बोलणे नाही. लग्नानंतर ती महिनाभर सासरी राहिली, त्यानंतर माहेरी निघून गेली. परत आली नाही. त्यानंतर तिने व तिच्या नातेवाइकांनी मार्च २०१८मध्ये एक बैठक बोलावली. तिला माझ्याबरोबर नांदायचे नाही, सोडचिठ्ठी घ्यायची आहे, असे सांगितले. माझ्या कुटुंबावर खालच्या पातळीवर आरोप केले. त्यानंतर तिने जून २०१८मध्ये महिला साहाय्य कक्षाकडे आमची खोटी तक्रार केली. त्यांनीही आमचे समुपदेशन केले. तिने तिच्या जबाबात सांगितले, की तिला माझ्याबरोबर पुढे नांदायचे नाही व आम्ही परस्परसंमतीने घटस्फोट घेण्यास तयार आहोत. त्यानंतर तिने डिसेंबर २०१८मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली कोर्टाची नोटीस पाठवली. त्यात तिने सर्व खोटे आरोप केले. आम्ही तिच्याशी कुठलेही गैरवर्तन केलेले नाही. जाताना ती तिचे सर्व दागिने घेऊन गेली आहे. ती कामाला जाते हे सिद्ध केले आहे, असे आम्ही न्यायालयात सिद्ध केले आहे. तिच्या वकिलांनी सेटलमेंटसाठी पाच लाख रुपयांची मागणी असल्याचे सांगितले. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. ती मंगळसूत्र व इतर दागिनेही घेऊन गेली आहे. मला दागिने परत मिळतील का? दागिने परत मिळाल्यास मी दागिन्यांएवढी रक्कम देण्यास तयार आहे. तिच्याविरुद्ध न्यायालयात पर्ज्युरीचा अर्ज दाखल करू का? मी सामंजस्याने घटस्फोटासाठी तयार आहे. मी कधीपर्यंत यातून बाहेर पडू शकतो?

उत्तर : तुम्ही पत्नीविरुद्ध न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे का? नसल्यास छळ या कारणाखाली आणि ती घर सोडून गेल्यास दोन वर्षे पूर्ण झाल्यावर त्याग या कारणासाठी तुम्हाला घटस्फोटाचा दावा दाखल करता येईल. तुमच्यावर केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी डॉक्टरांच्या साक्षीची मदत होऊ शकेल. शारीरिक कमतरतेवर वैद्यकीय उपायास वेळ न देता शरीरसंबंधास नकार देणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपसातील संबंध सुधारण्यास वाव न देणे, तशा प्रयत्नास प्रतिसाद न देणे, तुमच्यावर व तुमच्या कुटुंबियांवर खोटे आरोप करणे आणि घर सोडून जाणे, हे सर्व छळ या सदरात बसू शकतील. मार्च २०१८मध्ये तिने घटस्फोटाचा इरादा व्यक्त केला व त्यापूर्वीच वैवाहिक संबंधांनाही विराम दिल्यामुळे, दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होताच तुम्हाला त्याग या कारणासाठी घटस्फोट मागता येईल. लग्नात भेट मिळालेले दागिने तिने नेणे, हे कायद्यास धरून आहे. तुम्हाला काही कारणास्तव ते परत हवे आहेत आणि त्या बदल्यात तुम्ही तिला त्याची किंमत रोख द्यायला तयार असाल, तर तसे वकिलांमार्फत तिला सुचवून पाहावे. नोकरी करत असूनही तिने ते न्यायालयापासून लपवले असल्याचे तुम्ही सिद्ध केले असल्याचे म्हटले आहे. खोटे बोलून, खोटा पुरावा दाखल करून न्यायालयास फसवले असल्याचे तुम्ही सिद्ध करू शकत असाल, तर वकिलांच्या सल्ल्याने पर्ज्युरीचा दावा दाखल करू शकता. त्यामुळे न्यायालयात धडधडीत खोटे बोलण्यास नक्कीच वचक बसेल. परस्परसंमतीने घटस्फोटासाठी पाच लाख रुपयांची कायमस्वरूपी पोटगीची मागणी वकिलांमार्फत केल्याचे तुम्ही म्हटले आहे. सामंजस्याने घटस्फोटासाठी तुम्हीही तयार आहात. न्यायालयाच्या मदतीने तुम्ही मिडिएशनद्वारे यातून काही मार्ग निघतो का, हे पाहावे. न्यायिक लढाई लढण्यात जाणारा वेळ, पैसा, श्रम व मनःस्ताप वाचल्यास तुम्ही लवकरात लवकर नव्याने सुरुवात करू शकाल. अर्थात, तुम्हाला तुमची बाजू योग्य असल्याचे सिद्ध करूनही घटस्फोट मिळेलच; पण त्याला वेळ लागू शकतो.

या प्रश्नाच्या निमित्ताने दोन महत्त्वाच्या गोष्टी नमूद करता येतील, एक म्हणजे लग्न टिकविण्यासाठी वेळ आणि प्रयत्न दोन्ही द्यायला हवे. विशेषतः ठरवून केलेल्या विवाहात एकमेकांतील नाते विकसित होण्यास पुरेसा वेळ देणे आवश्यक असते. दुसरे म्हणजे दाव्यात केलेले खोटे आरोप आणि पोटगी मिळावी म्हणून किंवा द्यावी लागू नये म्हणून केलेली खोटी वक्तव्ये उलटून फार महागात पडू शकतात. तसे होणार नाही, याची लक्षपूर्वक काळजी घ्यायला हवी.

पटत नसेल व घटस्फोट घ्यायचा असेल, तर सामंजस्याने घ्यावा हा सल्ला सर्वच देतात. ज्या पक्षकारांस आपण फसवले गेलो आहोत असे वाटते, त्यांची पैशांच्या स्वरूपात नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा असते. ती मिळावी म्हणून गैर वा बेकायदेशीर मार्ग अवलंबणे किंवा खोटे आरोप करून दुसऱ्या पक्षावर वेगवेगळ्या केसेस लादणे, हेही अयोग्यच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>