Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

का हो लगीन घाई?

$
0
0

शब्दुली कुलकर्णी

सकाळी लवकर उठून मस्त जॉगिंग करून आल्यावर आरोही आजोबांच्या खुर्चीत विसावलेली असते. सोशल मीडियावरचे अपडेट्स पाहत बसलेली असताना अचानक तिला आईचा व्हॉट्सअपवर मेसेज येतो. तिची आई आतल्या खोलीतून तिला मेसेज करत होती, म्हणून तिला थोडं आश्चर्य वाटलं. त्या मेसेजची विंडो ओपन करून बघते तर एका मुलाचे सहा-सात फोटो आईनं तिला पाठवलेले असतात. हे फोटो कशासाठी पाठवण्यात आले आहेत, हे आईला विचारायला उठणार तेवढ्यात आतल्या खोलीतून आई-बाबा बाहेर येताना तिला दिसले.

तिला समोर बसवत आई-बाबा कोणत्या तरी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार याची कल्पना आरोहीला आली होती आणि तो विषय कोणता आहे हे सुद्धा तिला माहीत होतं. आता आपली शाळा घेतली जाणार या विचारात ती असते. तेवढ्यात तिची आई बोलते की, ‘तुला फोटो पाठवलेला मुलगा आम्हाला तुझ्यासाठी योग्य वाटतो. तुला कसा वाटतोय ते सांग’. भल्या सकाळी हा विषय काढल्याबद्दल आरोही थोडी चिडते. पण तिला शांत करत तिचे बाबा बोलतात की, ‘आधी सुचवलेल्या अनेक स्थळांना तू नकार दिला आहेस. निदान यावेळेस तरी तू सकारात्मक विचार करशील अशी अपेक्षा आहे. तू स्थळं नाकारून मोकळी होतेस, आम्हाला इतरांना उत्तरं द्यावी लागतात. म्हणून या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून तुझा निर्णय कळव’. बाबांना अशा शब्दांत बोलताना आरोहीनं यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. स्थळं नाकारुन मोकळी होतेस म्हणजे त्यामागे काही तरी कारणं असतात. लोक काय म्हणतील हे विसरुन जगायला शिकवणाऱ्या बाबांना आज अचानक लोकांना उत्तरं द्यावी लागतात, याची काळजी का वाटू लागली. एकूणच काय तर बाबांनी असं बोलणं हा एक प्रकारे आरोहीसाठी धक्काच असतो.

ऑफिसमध्ये जाण्यासाठी नेहमीची लोकल पकडली असता, त्या ग्रुपमध्येही हाच विषय. आज सगळ्यांना झालंय तर काय? असा विचार करून कानात हेडफोन्स घालून ती गाणी ऐकू लागते. तेवढ्यात एक काकू लग्न कसं योग्य वेळी झालं पाहिजे हे उदाहरणासहीत सांगत असतात. त्यांच्या ओळखीमध्ये कशी अनेकांची लग्न होता-होता राहिली आहेत, हे त्या आरोहीला सांगत होत्या. योग्य वेळी लग्न झालं पाहिजे, हा मुद्दा तिला पटलेला असतो. पण लग्न करण्याची माझ्यासाठी योग्य वेळ कोणती हे इतर कसे ठरवू शकतात. ती योग्य वेळ ठरवण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे मला आहे. इतरांनी योग्य वेळ ठरवून काहीच उपयोग नाही. आज मला माझ्या घरी करिअरचा मार्ग निवडण्याचं आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. या सर्वापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आहे. लग्न झाल्यानंतर हे स्वातंत्र्य जपलं जाणार आहे का? मुळात एवढं स्वातंत्र्य त्या घरी मिळणार आहे का? या सगळ्याचा विचार करुन माझ्यामते योग्य असलेल्या वेळी मी निर्णय घेईन.

सकाळी झालेल्या या घटनेनंतर आरोही खिन्न असते. तिला शांत-शांत पाहून ऑफिसमधील एक सहकारी जरा कुत्सित स्वरात तिला विचारते की, ‘आरोही आज अजिबात बडबड करत नाहीस. लग्न ठरलं वाटतं. तुझं लग्न ठरावं म्हणून मी दररोज देवाकडे प्रार्थना करायचे. अखेरीस ठरलं तर! तुझ्या आई-बाबांचे कष्ट वाचले. मग साखरपुडा कधी?’ त्यांची बडबड ती शांतपणे ऐकून घेते. आपल्या शांत असण्याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, याचा विचार करून तिला हसू येतं. पण तेवढंच त्याचं एक विधान खटकतं, ते म्हणजे आई-बाबांचे कष्ट वाचले. हा सर्वस्वी आमचा कौटुंबिक मुद्दा आहे. मुलीचं लग्न ठरवणं, ही मोठी जबाबदारी असते हे मान्य आहे, पण तो त्रास नाही. ठेवणीतले डायलॉग मारले की या लोकांचं होतं, पण समोरच्याच्या मनात काय सुरु असू शकतं, याचा जराही विचार ही मंडळी करत नाहीत. शेवटी कॉन कॉलचा बहाणा सांगून आरोही काढता पाय घेते.

जेवतानाही इतर सहकारी ‘आरोहीचं लग्न’ या जागतिक विषयाला हात घालतात. मुलगा मिळण्याआधीच तिच्या काल्पनिक लग्नसोहळ्याचे मनोरे रचले जातात. त्यातल्या एक ज्येष्ठ महिला सहकारी तर ‘अपेक्षा’ या विषयावर तिला लेक्चरच देतात. सध्याच्या मुलींच्या कशा अवास्तव मागण्या आणि अपेक्षा असतात, यावर त्यांचं विवेचन चालू असतं. चर्चा एवढ्यावर न थांबता आरोहीच्या अपेक्षांवर तिचे सहकारी मत मांडू लागतात. तिच्या अपेक्षा कशा फोल आहेत, एवढ्या अपेक्षा ठेवल्या तर लग्न कसं होणार, असे बरेच तर्क वितर्क मांडले जातात. आपल्याकडे मुलींच्या अपेक्षांवर भरभरुन बोललं जातं. त्याच्या अपेक्षा किती वर-वरच्या असतात. त्याची पूर्तता करताना मुलाची किती दमछाक होते वगैरे वगैरे. पण आज आम्ही मुली उत्तम करिअर करून आमच्या पायावर उभ्या आहोत. घर घेण्यापासून आई-बाबांना सांभळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही करतो. मग जोडीदाराकडून का अपेक्षा ठेवू शकत नाही. लग्न झाल्यानंतर आम्ही घरातली सगळी कामं करायची, स्वयंपाक-पाण्याचं बघायचं, घर चालवण्यासाठी आर्थिक हातभार लावायचा, मुलाच्या पालकांना सांभाळायचं. अशा सगळ्या अपेक्षा आमच्याकडून ठेवल्या जात असताना आम्ही का अपेक्षा ठेवायच्या नाहीत? मुळात आम्हा मुलींच्या अपेक्षा फोल असतात हे ठरवण्याचा अधिकार मुलांना किंवा इतरांना दिला कोणी? आरोहीच्या मनामध्ये विचारांचं असं द्वंद्वं चालू असतं.

घरी पोहोचल्यावर तिला वेगळंच चित्र पाहायला मिळतं. तिची आई सोशल मीडियावर तिच्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाचे फोटो आणि आरोहीच्या एका मैत्रीणीच्या साखपुड्याचे फोटो बघत असते. ते दोघंही आरोहीपेक्षा वयानं लहान आहेत, आरोहीच्या लग्नाला उशीर तर करत नाही ना, हा विचार त्यांचं डोकं पोखरू लागतो. आरोही काहीच न बोलता तिच्या खोलीत जाऊन निवांत पडते.

लग्नासाठी बघायला घेतलेल्या प्रत्येक मुलीला अगदी दररोज या परिस्थितीचा सामना करावा लागतो. जिथं जाऊ तिथं या एकाच विषयावर चर्चा होते. जसं की, चर्चेसाठी दुसरे कोणतेच विषय राहिले नाहीत की काय असा प्रश्न पडतो. सारखा-सारखा तो एकच विषय चघळला जातो. मुलीचं लग्न हीच इति कर्तव्यता या पालकांच्या भूमिकेमुळे मुलींवर दडपण येतं. अशा परिस्थितीत ‘काय मग ठरलं की नाही? तुमच्या मुलीला एकही मुलगा पसंत पडत नाही का?’ अशा प्रश्नांचा भडीमार केला जातो. त्याच विषयावर बोललं गेल्यानं मुलीवर एक प्रकारचा दबाव येतो.‘आमच्याकडे लग्न हा विषया काढला रे काढला की मी घरातून काढता पाय घेते. भरीस भर म्हणून शेजारपाजारचे काही उदाहरणं देऊन आई-बाबांना घाबरवत असतात. माझं खूप वय झालंय असं समजून जास्त वय असलेली, फारशी न शिकलेली स्थळंही सुचवत असतात, या सगळ्यामुळे निराश व्हायला होतं’, असे अनुभव नेहाने (नाव बदललं आहे) शेअर केले. ‘सतत त्याच विषयावर ऐकून घुसमटायला होतं. केवळ लग्न हा एकच विषय माझ्या आयुष्यात उरलाय का? असा प्रश्न कधी-कधी मलाच पडतो. अवतीभवती सतत तेच असतं. याकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय मी स्वीकारला आहे’, असं श्रेया सांगते. ही मनतली घुसमट थांबवण्यासाठी सरसकट सगळ्या स्थळांना नकार देण्याचा पर्याय मुली स्वीकारतात. कारण त्यांच्यावर दबावच इतका असतो. आजच्या म्हणजे २१व्या शतकातल्या मुलीचं आयुष्य लग्न या एकाच विषयाभोवती फिरत नसून करिअर, इच्छा-आकांक्षा आणि तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती घडपड असते. अनेकदा पालकांकडून असंही बोललं जातं की, स्थळं बघायला घेण्याआधी किंवा एखाद्या विवाहसंस्थेत नाव नोंदवण्याआधी विचारण्यात आलं होतं. तेव्हा मुलीनं सहमती दर्शवली होती म्हणून पुढे बघायला सुरुवात केली. पण तिच्या मनातली ही घुसमट पालकांनी समजून घ्यायला हवी. या नाजूक काळात पालकांचा आधार महत्त्वाचा असतो, हे लक्षात ठेवायला हवं.

आजूबाजूच्या मुलांचं लग्न ठरल्यावर पालकांवर एक प्रकारचा दबाव येतो. अशा वेळी प्रत्येकाची वेळ वेगळी असू शकते, याचा पालकांनी विचार करावा. तसंच आपल्याकडे महिलांच्या अपेक्षा कमीच असतात किंवा त्यांना कमीच लेखलं जातं, अशी मानसिकता दृढ झाली आहे. पण काळ बदलला जशा महिलांच्या जबाबदाऱ्या बदलल्या तशा त्यांच्या अपेक्षाही बदलल्या, ही मानसिकता रुळायला हवी.
डॉ. अपर्णा देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

सगळीकडे लग्न या एकाच विषयावर चर्चा चालू असताना त्या मुलीची मनातल्या मनात घुसमट होत असते. एवढंच नाही तर तिच्या मनात भीतीनेही घर केलेलं असतं. अशा नाजूक वेळी पालकांची साथ महत्त्वाची असते. मुलीचं लग्न ही इतिकर्तव्यता न मानून तिच्याशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे.
गौरी कानिटकर, मॅरेज कौन्सलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>