कुटुंबव्यवस्थेचा विस्कळीतपणा सावरायचा असेल, तर कुटुंबव्यवस्थेच्या प्रत्येक घटकाकडून आजच्या काळानुरूप, योग्य पद्धतीने कार्य होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतील फरक ओळखायला हवा. बाहेर कितीही चमत्कार असला, भौतिक सुखसुविधा उपलब्ध असल्या, तरी खरा आनंद कौटुंबिक सुख-समाधानात आहे, हे प्रत्येकजण मान्य करेल. ती कुटुंबासाठी महत्त्वाची आहे हे समजून घेऊन, घरातील जबाबदाऱ्या प्रत्येकाने वाटून घेतल्यास हलकेफुलके, आनंदी कौटुंबिक जीवन, प्रत्येकाच्या आयुष्याचे नंदनवन असेल. सुरेखा बोऱ्हाडे-गायखे खूप दिवसांनी भेटलेली सुमेधा अगदी बदललेली दिसली. सदा हसतमुख, बडबडी अशी ती एकदम शांत, अबोल आणि शरीराने थकलेली दिसली. वय वाढलेले असले, तरी चेहऱ्यावरचा नूर कोणी ओरबाडल्यासारखा वाटत होता. खूप खोदून, आपुलकीने विचारल्यावर तोंडाचेच नाही, तर तिच्या हृदयाचे कुलूप उघडले गेले. तिने सांगितले, 'तुला माहीतच आहे, माझ्या मुलीचे - स्मितचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. आम्ही माय-लेकी भावनिक दृष्टीने खूप घट्ट, प्रेमाने बांधलेले आहोत. तीच सुखी नाही, तर मी कशी सुखी असणार?' चांगला नवरा मुलगा, संपन्न सासर, चांगली माणसे पाहून झालेले स्मिताचे लग्न मी याची देही, याची डोळा अनुभवले होते. मग आता काय झाले? यावर तिने जे सांगितले, त्यावर विचारात पडण्याची वेळ आली. तिच्या मुलीने एम.बी.ए. सारखे उच्च शिक्षण घेऊन कार्पोरेट कंपनीत चांगली दोन वर्षे नोकरी केली. लग्नानंतर नोकरी सोडली. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यावा आणि नोकरीची गरज नाही, म्हणून स्मित घरीच राहू लागली. वैचारिक, आर्थिक दृष्टीने भक्कम असलेली स्मित म्हणे आजकाल डिप्रेशनमध्ये गेली आहे. तिला त्रास होत असल्यामुळे तिच्या आईला, म्हणजे सुमेधालाही बीपीचा त्रास आणि अजूनही बरेच काही सुरू झाले आहे. तिच्या या दुःखाला कुरवाळण्याला म्हणा किंवा स्वतः ते वाढवण्याला काय म्हणावे, काही कळेना? परंतु विचार केला, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, हे खरे आहे. पूर्वी स्त्रियांवर दिसणारी बंधने होती. आता न दिसणारी, फक्त तिलाच जाणवणारी, बऱ्याच ठिकाणी तिला अडविणारी, तिच्यावर परिणाम करणारी अनेक बंधने आजही अदृश्य स्वरूपात कुटुंबात, समाजात तिच्यावर आहेत. आई-वडील मुला-मुलींना वाढविताना शिक्षण आणि इतरही बाबतीत समानता दर्शविण्याच्या उदाहरणांत वृद्धी झालेली आहे. मुली लग्नाआधी उच्चशिक्षित होऊन आर्थिक दृष्टीने सक्षम, स्वावलंबी होत आहेत. लग्नानंतर गरज नाही म्हणून किंवा वैवाहिक जीवन, घर-संसार सुखाचा होण्यासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारीमुळे बऱ्याच कमावत्या मुली नोकरीला रामराम करतात किंवा घरातील तसे करायला तिला भाग पाडतात. त्यावेळी घरातील कामात न संपणारा वेळ, आर्थिकदृष्ट्या येणारे परावलंबन आणि आपण एवढे शिकून काय करतो आहोत, हा विचार अस्वस्थ करणारा असतो. इतके दिवस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन असते. आता मात्र छोट्या छोट्या खर्चासाठी हात पसरायला लागतात किंवा मन मारून जगावे लागते आहे, या भावनेमुळे मुलींची घालमेल होते. हे प्रमाण अत्यल्प असले, तरी मुलींवर मोठा परिणाम करणारे आहे. दुसऱ्या चित्रात आज मुली लग्नानंतरही उच्चशिक्षित होऊन कार्पोरेट क्षेत्रात म्हणा किंवा अन्य क्षेत्रातही आठ-दहा तास काम करत आहेत. बाहेर काम करून घराला आर्थिकदृष्ट्या भक्कम आधार देण्याचे काम त्या करत आहेत. एवढे करूनही तिच्या पारंपरिक कौटुंबिक जबाबदाऱ्या तिने पूर्ण केल्या पाहिजेतच, अशा अपेक्षा कुटुबाकडून केल्या जातात. स्त्रियांनी बाहेर कितीही कर्तृत्व गाजविले, तरी स्वयंपाक, केअर टेकर, स्वच्छता कर्मचारी या भूमिका तिने न बोलता चोख बजावल्या पाहिजेत, अशी अपेक्षा असते. त्याबरोबरच नवऱ्याची बायको, प्रेयसी, सखी तर ती उत्तम हवीच; त्याबरोबर बाळाची आई, सासू-सासऱ्यांची सून आणि नात्याप्रमाणे प्रत्येकाशी त्या त्या पद्धतीने गुज, प्रेम जपणारी सेवा देणारी, प्रत्येकाला हवी तशी ती असायला हवी. बाहेर आपल्या कार्यक्षेत्रात तिने कितीही नाव कमावलेले असले, आपले वेगळे स्थान निर्माण केलेले असले, तरी घरात आल्यावर तिचे वरील प्रमाणेच रूप कुटुंबाला हवे असते. बाहेर आपल्या कार्य-कर्तृत्वाने कितीही चमकले, झगमगले, तरी घरात तिला निववावे लागते, थंड व्हावेच लागते. दोन्ही तीरांवर हात ठेवता येत नाही असे म्हणतात; परंतु आजची स्त्री ही कसरत करताना दिसते. हे सर्व करताना हातातून काहीतरी निसटतेच. थोडे इकडे-तिकडे होतेच. यातही याची सर्वांत जास्त झळ बसते ती स्त्रीलाच. घरातून नोकरीनिमित्त किंवा स्वतःचा छंद जपताना, करिअर सांभाळताना होणाऱ्या धावपळीचा शारीरिक ताण तिच्यावर पडतोच. त्याबरोबर नवरा, मुले, इतर कुटुंबिय यांच्याकडूनही तिला कारण असताना, तर कधी कारण नसतानाही बोलणी, टोमणे मिळत असतात. पाच-दहा वर्षांपूर्वीपर्यंत नोकरी करणाऱ्या स्त्रिया निमूटपणे हे सहन करत होत्या. स्त्रियांच्या कुटुंबाकडून होणाऱ्या या सूक्ष्म; परंतु परिणामकारक खच्चीकरणावर प्रत्यक्षात कोणीही बोलत नाही. 'जाऊ द्या, हे असेच असते,' असे म्हणत स्त्रियाही त्याकडे दुर्लक्ष करत आल्या आहेत. आजची तरुणाई या गोष्टीकडे गांभीर्याने पाहते आहे. आजच्या नवविवाहिता आर्थिक स्वावलंबन, स्वातंत्र्य यामुळे होणारा थोडासाही अन्याय सहन करत नाहीत. ही बदलाची नांदी आहे. यातच जुन्या-नव्या पिढीचा वाद विकोपाला जाताना दिसतो. नवविवाहित दांपत्यांत घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याचे कारण या सर्वांमध्ये आहे. आज एक तर वयाच्या मध्यान्हात मुश्किलीने लग्न होते. तशात नोकरीमुळे म्हणा किंवा वरील कारणामुळे लवकरच कुटुंब विभक्त होते. साऱ्या जगात कौतुक होत असलेल्या कुटुंब संस्कृतीला धक्के बसत आहेत. प्रभावी डिजिटलायझेशन, तंत्रज्ञानाचा वेगवान प्रवाह, भौतिक सोयीसुविधा, पाश्चात्य संस्काराचा वाढता प्रभाव या सर्वांचा परिणाम कौटुंबिक व्यवस्थेवर पडतो आहे. मुलीचे उच्चशिक्षण, त्यांचे वैचारिक-आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन वाढत आहे. मुली बदलत आहेत; त्याचबरोबर त्यांच्यावरील बंधने, तिच्याविषयीच्या पारंपरिक दृष्टिकोनात जसा बदल होणे आवश्यक आहे, तसा होताना दिसत नाही. त्यामुळे काहींना मुलींचे स्वातंत्र्य, तिची अभिव्यक्ती ही आज योग्य असतानाही आगावूपणाची वाटते. लग्न झाल्यावर कुटुंबासाठी नोकरी सोडून देण्याचे सामंजस्य कधी तिला दाखवायला लागते, तर कधी क्षमता, इच्छा नसताना घरातील जबाबदाऱ्या पार पाडून, घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी बाहेर पडावे लागते. तिने घरातून बाहेर पडावे, काम करावे, पैसा कमवावा, त्याबरोबर तिने घरातील सच जबाबदाऱ्याही तेवढ्याच तत्परतेने पार पाडाव्यात, ही कुटुंबाची अपेक्षा असते. आयटी क्षेत्रात सर्व जगाशी संपर्कात असणारी मुलगी, घरात सून म्हणून चौकटीतच आवडते. स्मार्ट, बोल्ड, हुशार मुली सर्वांनाच आवडतात; पण ती जेव्हा बायको बनते, तेव्हा तिच्यातील हेच गुण अति वाटायला लागतात. नोकरीच्या निमित्ताने मिळणारे स्वातंत्र्य, समाजात वावरावे लागताना निर्माण होणारे संबंध, यांमुळेही बऱ्याचदा घरात कलह निर्माण होतात. करिअरमध्ये तिच्या महत्त्वाकांक्षेला फुटणाऱ्या धुमाऱ्यांना कुटुंबातून विरोध होतो. या असलेल्या अनेक सूक्ष्म बाबींमुळे दांपत्यातील वाद विकोपाला जाऊन, कुटुंबव्यवस्था ढिली होत आहे. या गोष्टीसाठी बऱ्याचदा स्त्रियांनाच कारणीभूत ठरवले जाते. ते योग्य नाही. कुटुंबव्यवस्थेचा विस्कळीतपणा सावरायचा असेल, तर कुटुंबव्यवस्थेच्या प्रत्येक घटकाकडून आजच्या काळानुरूप, योग्य पद्धतीने कार्य होणे आवश्यक आहे. मुलींनीही मिळणारे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतील फरक ओळखायला हवा. बाहेर कितीही चमत्कार असला, भौतिक सुखसुविधा उपलब्ध असल्या, तरी खरा आनंद कौटुंबिक सुख-समाधानात आहे, हे प्रत्येकजण मान्य करेल. ती कुटुंबासाठी महत्त्वाची आहे हे समजून घेऊन, घरातील जबाबदाऱ्या प्रत्येकाने वाटून घेतल्यास हलकेफुलके, आनंदी कौटुंबिक जीवन, प्रत्येकाच्या आयुष्याचे नंदनवन असेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट