Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

भय इथले वाढत जाई...

$
0
0

आज मला समाजात मुलींचे पालक भयग्रस्त दिसतात. छोट्या - दैनंदिन व्यवहारांमध्येदेखील मुलींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाबद्दल त्यांना शंका येते आहे किंवा शंका घेणे भाग पडते आहे. अशा खऱ्या-खोट्या शंकांनी ग्रासल्यामुळे मुलींना घरात कोंडून ठेवणे शक्यही नाही आणि योग्य तर नाहीच नाही. पुढे कधी ना कधी मुलींना याच समाजवास्तवाला सामोरे जायचे आहे.

मंगला गोडबोले

ही आठवण १९५९-६०च्या काळातील आहे. आम्ही ज्या भागात राहायचो, तेथील एका कुटुंबावर मोठी आर्थिक आपत्ती आली. घरात वृद्ध आई-वडील, चार मुले, नवरा-बायको टुकीने राहत होते. अचानक नवऱ्याची नोकरी गेली. शब्दश: खायचे वांधे आले. नवरा पोस्टासमोर बसून मनीऑर्डर फॉर्म, पत्रे वगैरे लिहून चार पैसे मिळविण्याची धडपड करू लागला. गोरीगोमटी, सुस्वरूप, मध्यमवयीन बायको घरोघरी जाऊन अत्तराच्या छोट्या बाटल्या विकून किडुकमिडुक मिळवू लागली. ती आमच्या पाहण्यातील पहिली 'सेल्सगर्ल' असावी. नऊवारी नेसून, दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घऊन, पोटाशी अत्तराच्या बाटल्यांचा पुठ्ठ्याचा खोका धरून ती दुपारभर वणवण फिरायची. किती पैसे मिळवायची माहीत नाही; पण दुपारी बारा ते साडेचार-पाच कुठेकुठे दिसायची. एका आमच्या घरी केवडा अत्तर द्यायला आली असताना, माझ्या आईच्या आणि तिच्या गप्पांमधून कानावर आले, 'अगदी नाईलाज आहे म्हणून जावे लागते दुसऱ्यांच्या दारापुढे; पण त्याही एक पथ्य पाळले. भर दिवसाउजेडी हिंडायचे. उन्हाने जीव घाबरला, तरी चालेल. अंधार पडल्यावर बाईचे काही खरे नसते.' सातवी-आठवीत असलेल्या माझ्या मनाने घेतले, एकूण दिवसा बाई सुरक्षित असते तर! बाईने सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित वेळ निवडली, की झाले.

*****

मी तेव्हाच्या अकरावीत होते. एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या बंगल्यापासून जवळच्या अंतरावर, मुंबईत राहत होते. एक बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. देखणे रूप, उत्तम गाणे, खणखणीत अभिनय या गुणांमुळे अनेक महिला त्यांच्या चाहत्या होत्या. त्यांच्या निधनाने हळहळत असतानाही मधेच कोणी ना कोणी दबक्या आवाजात म्हणत होते, 'उद्योगासाठी चित्रपटाचे क्षेत्र निवडले ना, तेथेच चुकले बाईंचे. असल्या झगमगाटी दुनियेतील बाई कसली स्वच्छ राहते आणि ती ढीग तसे म्हणेल, आसपासचे पुरुष सोडणार आहेत तिला?' माझ्या उमलत्या वयाने मनोमन धारणा करून दिली, बाईने स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी चांगले क्षेत्र निवडायला हवे.

*****

१९६९-७०चा सुमार. श्री. ज. जोशींची 'आनंदी गोपाळ' ही कादंबरी बरीच गाजत होती. वाचक उड्या टाकत होते. समीक्षक चिंध्या उडवत होते. १०० वर्षांपूर्वी जन्मलेली आणि अवघे २२ वर्षांचे आयुष्य लाभलेली ही आपल्याकडील पहिली महिला डॉक्टर अचानक नव्याने चर्चेत आली होती. गोपाळरावांचा तऱ्हेवाईकपणा, चक्करपणा, क्रूरपणा यावर खूप बोलले जात होते. आपल्या तरुण बायकोला सातासमुद्रापार, अज्ञात ठिकाणी एकटीने पाठविताना त्यांना काहीच वाटले नसेल का, अशी चर्चा सुरू असताना कोणीतरी म्हटले, 'त्यांचा आपल्या बायकोवर विश्वास असेल. ती फक्त आणि फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करेल, अशी खात्री असेल. शेवटी या गोष्टी बाईवरच अवलंबून असतात ना! बाई चोख असेल, तर कोण हिंमत करेल तिच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची? मन चंगा तो कठौती में गंगा!' नकळत मनावर बिंबले गेले, बाईने सभ्य, शालीन, सत्वशील राहिले, की कोणी तिचा 'बाल बांका' करायला धजत नसते. तेव्हा आपण नेहमी नाकासमोर चालणारे व्हायला हवे. या टप्प्याला मी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आले होते. चांगली शैक्षणिक पात्रता, चांगले व्यवसाय क्षेत्र आणि भक्कम सुरक्षाकवच देणारे कुटुंब मिळाले, की बाई सुरक्षित, आत्मनिर्भर राहू शकते, शकावी, असे काहीसे 'कंडिशनिंग' होत होते.

*****

या सर्व काळात घरी काका, मामा, मोठे चुलत-मावस भाऊ आणि क्वचित पुरुष मित्र येत होते. एकत्र वावरत होते; पण त्यांच्यापासून आपल्याला कधी धोका असेल, असे मनात येत नव्हते. घरचे लोकही त्याबद्दल फार कटाक्षाने काही सांगत-सुचवत नव्हते. एखाद्या पुरुष नातेवाइकाबद्दल प्रवाद उठले आहेत, म्हणून त्याच्यापासून सगळेच प्रयत्नपूर्वक दूर राहिले आहेत असे घडे; पण एकूण बहुसंख्य नाती, नातेवाइक सुरक्षित मानले जात. काहींचे महाविद्यालयासाठी लांब जाणे, त्यानिमित्त मुंबईच्या लोकलचा प्रवास, कारण-प्रसंगाने रात्र किंवा अवेळ होणे असे सुरू होई. त्यासाठी आपल्या इमारतीमधील, कॉलनीतील, गल्लीतील कोणी समवयस्क मुलगा सोबत असल्यास बरे वाटे. तो लगेच काही गैर वागेल, लहानमोठ्या संकटात टाकेल, असे तेव्हाच्या आम्हा मुलींनाही वाटत नसे. घरच्यांनाही वाटत नसे. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे आणि अनोळखी पुरुषांबरोबर दूर कोठेतरी जाणे यावरील रास्त बंदी सोडली, तर एरवी आमच्या सुरक्षिततेचा फार घोर आमच्या घरच्यांना लागल्याचे स्मरत नाही. त्या अर्थी मी सुरुवातीच्या तीन प्रसंगांतून सुचविलेल्या किंवा दाखविलेल्या धारणा सरासरी सर्वांच्या असाव्यात, असे मानण्यास जागा आहे. लग्न वेळोवारी व्हावीत हा आग्रह असे आणि मुलीला एकदा सुरक्षित ठिकाण मिळवून दिले, की बहुतेक आई-वडील निश्चिंत होत.

हे अंमळ जुने असले, तरी आज पस्तिशी-चाळिशीत असलेल्या मुलींच्या पिढ्यांना वाढविणाऱ्या आमच्या पिढीच्या मातांनीही, आपल्या मुलींच्या सुरक्षिततेचा फार बाऊ केला नव्हता, असे स्मरते. कुठे जात आहात, कोण कोण आहे सोबत, केव्हा येणार वगैरे माहिती घेतलेली असे. आजच्यासारखी मोबाइलची सुविधा नसल्याने, त्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहता येत नसे. एकूण विश्वास टाकण्यावर विश्वास ठेवूनच मुली वाढविल्या जात.

यामागे थोडा भाबडेपणा असेल, थोडे अज्ञान असेल, थोडा नाईलाज असेल, हे सहज शक्य आहे; पण आपल्या तीन-चार वर्षे वयाच्या मुलीलादेखील कोणाबरोबर बाहेर जाऊ देऊ नये, कोणत्याही वयातील मुलीला कधीही एखाद्या पुरुष नातेवाइकाबरोबर एकटे सोडू नये, मुलीचे लग्न झाल्यावर सुरुवातीची काही वर्षे तिच्या सासरच्या नातेवाइकांबाबत सावध, दक्ष राहावे अशा प्रकारची असुरक्षितता एकूण सर्वत्र आणि खास करून मुलींच्या पालकांच्या मनात नव्हती. शाळेचा चपरासी, कॉलनीचा गुरखा, घरी येणारा नोकर-दूधवाला-पेपरवाला वगैरे बाप्ये, शाळेची रिक्षा किंवा बस असल्यास तिचा चालक, शिकवणीचे शिक्षक असा प्रत्येक पुरुषाकडे संशयाने पाहिले जात नसे. आपण चांगले राहिले, की समोरचे आपल्याकडे चांगल्या नजरेनेच बघतात, सन्मानानेच वागवितात असा समजुतीत (अंधश्रद्धेत?) बरीच माणसे असत.

यावरून काल-परवापर्यंतची सगळी यच्चयावत पुरुष जमात गंगाजलासारखी पवित्र होती, अशा छापाचा निष्कर्ष कोणीच काढू नये. कोणत्याही काळात जेथे कोठे माणसांचे व्यवहार असतील, तेथे गैरव्यवहारही होत असतील. कोणत्याही काळात अन्याय, अत्याचार, अनाचार होत असतील आणि कुठे ना कुठे मुली-बायका त्यांना बळी जात असतील, हे नक्की. फरक कशात पडत असेल? एकतर पुरुषांना संधीच कमी मिळाल्याने, अत्याचारांचे प्रमाण कमी असेल. जे होत होते, त्यांचा माध्यमांतून होणारा गाजावाजा कमी असेल. त्यामुळे पुढच्या 'पुरुषव्याघ्रांना' प्रेरणा कमी मिळत असतील. माध्यमांकडून कळत नकळत वासनांना खतपाणी घालण्याचे प्रमाण कमी असेल. पौरुषाच्या अचाट कल्पना माजलेल्या नसतील. व्यसनांचा वाढता पगडा आणि त्यांच्यामधून आलेला उन्माद कमी असेल. जनाची-मनाची लाज थोडीफार टिकून असेल. देव, धर्म, पाप, पुण्य, कायदा, शासन यांचा धाक थोडा तरी शिल्लक असेल. बेकारी, बेरोजगारी, मनाचे रिकामपण कमी असेल. घरदार, कुटुंब यांचे उत्तरदायित्व जास्त असेल.

या उघड दिसणाऱ्या शक्यतांखेरीजची आणखी एक शक्यता मला सुचते, दिसते ती अशी - शिक्षण, नोकरी, जगाचा अनुभव, अर्थार्जनाची कुवत, कुटुंबाचे प्रमुखत्व असा काही ठळक बाबींमध्ये जोवर पुरुष बायकांच्या तुलनेत थोडेफार वरचढ होते, त्यांची 'सुप्रीमसी' किंवा नेतृत्व जोवर बायका (भलेही नाईलाजाने असेल; पण) मानत होत्या, तोवर पुरुषांना ते तरी एक समाधान असेल. 'तुम्ही मोठे. तुमच्याशिवाय आमचे चालणार नाही,' अशा स्वरूपाचा भाव त्यांना सुखावत असेल. त्यांच्या अहंकाराचे पोषण करत असेल. आज अनेक पुरुषांकडे बाईपेक्षा जास्त असा कोणताही सामाजिक-आर्थिक घटक उरलेला नाही. शिक्षण, अर्थार्जन, कुटुंब चालविण्याची क्षमता याबाबतीत पुरुषांना आव्हान द्यायला, त्यांच्या मदतीशिवाय वाटचाल करायला खूप बायका समर्थ आहेत. बाईवर वर्चस्व गाजवायला, बाईला नामोहरम करायला अनेक पुरुषांपाशी फक्त शरीर एवढेच शस्त्र उरले आहे. या शस्त्रापुढे कोणीही बाई कोणत्याही क्षणी हतबल होऊ शकते. म्हणून पुरुषार्थाचे एवढे ओंगळ आणि भयकारी प्रदर्शन होत असेल का?

कारणे काहीही असोत, विचारांती आणखीही सुचोत. आज मला समाजात मुलींचे पालक भयग्रस्त दिसतात. मग ते आपल्या तीन-चार वर्षांच्या मुलीला नोकराबरोबर बागेत खेळायला पाठविणे असो, शाळेच्या व्हॅनमध्ये ड्रायव्हर एकटा असताना सात-आठ वर्षांच्या मुलीला बसविणे असो, जीममधील इन्स्ट्रक्टरबरोबर जाऊ देणे असो किंवा एखाद्या शैक्षणिक सहलीला महाविद्यालयीन कन्यकेला पाठविणे असो. पुढे चित्रपट, टीव्ही वगैरे क्षेत्रांमध्ये पाठविणे ही तर फार दूरची गोष्ट झाली. छोट्या - दैनंदिन व्यवहारांमध्येदेखील मुलींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाबद्दल त्यांना शंका येते आहे किंवा शंका घेणे भाग पडते आहे. अशा खऱ्या-खोट्या शंकांनी ग्रासल्यामुळे मुलींना घरात कोंडून ठेवणे शक्यही नाही आणि योग्य तर नाहीच नाही. पुढे कधी ना कधी मुलींना याच समाजवास्तवाला सामोरे जायचे आहे. त्याची पूर्वतयारीही करून घ्यायला हवीच आहे. पूर्वी निदान मुलगी वयात येण्याची तरी कोणी समाजकंटक वाट बघत असतील. आज सात, पाच, तीन वर्षे वयाची मुलगी, अगदी पाळण्यातील मुलगीही सुरक्षित नाही, हे विदारक सत्य आहे.

'भय इथले वाढत जाई...' अशा परिस्थितीत हे पालक अडकले आहेत, एवढे मात्र खरे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>