अस्मिता चितळे
'माझे बाळ पाच महिन्यांचे आहे. बाळाला पुस्तकांची ओळख व्हावी, त्याला पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी सुरुवातीला कोणती पुस्तके आणू?'
सोशल मीडियावरील महिलांच्या एका गटात एका आईने मध्यंतरी हा प्रश्न विचारला होता. विशेष म्हणजे, त्या खाली कमेंटमध्ये पाच महिन्यांच्या बाळासाठी पुस्तके कशी निवडावीत असे सांगणाऱ्या काही जणी होत्या. अपवादाने दोघी-तिघी अशा होत्या, ज्या म्हणाल्या की कशाला हवे पुस्तक आत्ता? जरा मोठे तर होऊ द्या. हे सांगणाऱ्या एकीला मेसेंजरवर तिसऱ्याच एकीचा मेसेज आला. मोठे होताना आपण नेमके काही दिले नाही, तर मुले वाहावत जातात. सुरुवातीपासूनच आपण मुलांना निवडक आणि वेचक दिले पाहिजे. मुलांना घडवावे लागते.
दुसरी घटना लॉकडाउनमधली...
काही मैत्रिणी ऑनलाइन व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना लॉकडाउनमध्ये 'कोडिंग' शिकवल्याचे आणि आता मुले दिवसभर त्या क्लासमध्ये कसे आवडीने बसताहेत हे चढाओढीने सांगत होत्या. त्यांच्यापैकी एकीने विचारले, तिसरी-पाचवीच्या टप्प्यांवर 'कोडिंग' कशाला यायला हवे? तेव्हा बाकीच्यांकडून एकमुखी उत्तर आले, आता कम्प्युटरला पर्याय नाही आणि मुले पुढे सॉफ्टवेअर शिकली, तर हे 'कोडिंग' उपयोगीच पडेल. या वयात 'कोडिंग' कशाला हवे म्हणणारीच्या डोक्यात एक प्रश्न आला. मुले इंजिनीअर आणि तेही सॉफ्टवेअर इंजिनीअर होणार, हे जणू गृहितच धरल्यासारखे झाले आहे. यापेक्षा मुलांनी वेगळा मार्ग स्वीकारला तर?
घटना तिसरी...
पाच वर्षांच्या एका मुलीला घेऊन तिची आई लहान मुलांच्या फॅशन शोसाठी हजर होती. लहानगीच्या अंगावर चमचमते कपडे आणि मेकअप. ती चिमुकली काहीशी कंटाळलेली होती. रॅम्पवर जायला तिने चक्क नकारच दिला. आईच्या दटावणीनंतर मात्र ती गेली. तिच्या आईने फेसबुकवर या साऱ्या शोचा वृतांत साग्रसंगीत लिहिला होता. मुलीवर झालेल्या कौतुकाच्या वर्षावाने आईला अगदी कृतकृत्य झाले होते. ही पोस्ट वाचताना माझ्या डोळ्यासमोर मात्र दिसत होता, तो चिमुकलीचा कंटाळलेला चेहरा.
या तिन्ही घटना भिन्न असल्या, तरी या सगळ्यांत एक समान धागा आहे. तो म्हणजे, मुलाला आपल्याला हवे तसे घडवण्याचा, निदान त्या दृष्टीने पावले टाकण्याचा अट्टाहास असण्याचा. करोनापूर्व आणि करोनापश्चात दोन्ही काळांत बाकी अनेक गोष्टींमध्ये उलथापालथ झाली असली, तरी मुलांना घडवलेच पाहिजे आणि सगळे कसे वेचक, निवडक फक्त आपल्या मुलाला मिळाले पाहिजे या मनोधारणेत काहीही बदल झालेला नाही. असे चित्र दिसले, की मला मुले म्हणजे ओरिगामी करण्यासाठी आणलेले कागद वाटायला लागतात! आपल्याला हवे तसे आकार घडवण्यासाठी आणलेली एक वस्तू. मुलांचेही असेच आहे का? मी एक पालक आहे, मला पाहिजे तसे माझे मूल करणार आणि त्याने ते केलेच पाहिजे आणि मुलाला ते आवडलेच पाहिजे, असा आग्रह दिसून येतो.
कुणी म्हणेल, पिढ्या न् पिढ्या हेच चालत आले आहे. मुलांना वळण लावणे, त्यांच्याकडून आपल्या पूर्ण न झालेल्या अपेक्षा पूर्ण करून घेणे, मुलांना भावनिक आवाहन करून आपल्या मनासारखे वागायला लावणे.. काही अंशी हे बरोबरही असेल; पण मुख्य फरक असा आहे, की या साऱ्या अपेक्षा मूल मोठे झाल्यावर सुरू होत असते. आता पालकांच्या मुलांकडून अपेक्षा ठेवण्याचे वयच मुळी पाच महिन्यांवर आले आहे. महत्त्वाकांक्षा म्हणजे काय हे माहितीही नसण्याच्या वयात मुलाची महत्त्वाकांक्षी आई त्या मुलाला घडवण्याच्या नावावर तिला जे आवडत आहे, हवे आहे ते करायला लावते. मग ते नृत्य, अभ्यास, टीव्ही शो, मॉडेलिंग, वाद्यवादन, स्पर्धात्मक परीक्षा अशा पैकी काहीही असते. या महत्त्वाकांक्षेपोटी मुलाचे बालपण हरवून जाते, हे पालक म्हणून आपल्या गावीही उरत नाही. मग मुलाला त्याचे बालपण, त्याच्या आनंदाच्या गोष्टी आपण केव्हा करू देणार? मनमोकळेपणाने, निरपेक्षपणे मुलांसह खेळणे, त्यांना जे करायला आवडते ते करू देणे आणि त्या गोष्टी मुले करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे, हाही पालकत्त्व निभावण्यातला मोठा भाग असतो.
ही गोष्ट आपण विसरतोय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. मुलांना मन असते आणि त्यांना त्यांच्या आवडीनिवडीही असतात; पण ही गोष्ट 'आम्ही त्यांना घडवतोय, त्याने त्यांचेच भविष्य उज्ज्वल होणार आहे,' या गोंडस दबावाखाली आपण साफ विसरून जात आहोत. पालक म्हणून आपले काम काय, तर मुलांना उत्तम माणूस म्हणून जगण्याची जाणीव देणे, समाजभान आणि संवेदनशीलता मुलांच्यात रुजवणे, मुलाच्या मतांचा आदर करून त्यांच्यासह संवाद साधत राहणे आणि मुलांना मानसिकदृष्ट्या खंबीर करणे. कौटुंबिक पातळीवर सुरक्षित वाटेल, समाधानी वाटेल असे वातावरण मुलांना देणे ही पालक म्हणून सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. आपले मूल कसे आहे, त्याच्या क्षमता काय आहेत, त्याच्यातील जाणीवा, उणिवा काय आहेत ते समजून घेणे आणि त्या दूर कशा होतील यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे हे प्रयत्न व्हायला हवेत. वेचक, निवडक तेच निवडून मुलांना काही तरी 'रेडिमेड' देण्याऐवजी, मुलांना एखादी गोष्ट निवडण्यासाठी सारासार विचार करायची सवय, निर्णयस्वातंत्र्य आणि आत्मविश्वास देता आला, तर मूल स्वतःहून वेचक, निवडकच गोष्ट स्वीकारतील. ही क्षमता निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे.
हे सारे व्हायला हवे असेल, तर सर्वांत आधी पालकांनी मुलांवर त्यांना हव्या त्या गोष्टी लादणे थांबवायला हवे. पालक म्हणून आपण कसे वागतो याचे आपणच आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण आपल्या आई-वडिलांनी सांगितलेले काय काय ऐकत होतो, त्यांचे आणि आपले काय वाद होत होते, का होत होते याची एकदा उजळणी केली, की आपण पालक म्हणून कसे वागायला हवे हेही आपल्याला कळेल. त्यातून आपला मुलांशी असणारा संवाद वाढत जाईल. या संवादातून आपले मुलांशी असणारे नाते बळकट होईल. मूल व्यक्ती म्हणून सक्षम आणि संवेदनशील होईल. एकदा का दुतर्फी संवाद सुरू झाला, की आपणही आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणार नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट