स्त्री घराच्या चौकटीतून बाहेर पडलीय, तिचं स्वातंत्र्य ती जपतेय. पण आजच्या जगात वावरत असताना तिच्या समोरील समस्याही वाढल्या आहेत. अर्थात, समस्या कितीही असल्या तरी आजची स्त्री डरपोक नाही. वाटेवरती कितीही काचा असल्या तरी आयुष्यात काही करून दाखवण्याची जिद्द त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास 'मुंटा'च्या डिबेटमध्ये व्यक्त झाला.
यामध्ये कॉलेजच्या प्रोफेसर्स आणि काही विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. तुमच्या नजरेतली भारतीय स्त्री कशी आहे? यावर बोलताना क्रांती कानेटकर म्हणाली, की 'भारतात पूर्वी महिलांवर अनेक निर्बंध लादले जायचे आणि स्त्रिया ते निमूटपणे सहन करायच्या. सध्याची भारतीय स्त्री मात्र बदलली आहे. ती बदल स्वीकारणारी आहे. पुरुषप्रधान समाजामध्येही ती आपलं स्थान बनवू पाहते.'
सुरक्षितता...मोठी समस्या
'स्त्री ही पूर्वीही असुरक्षित होती. घरातच तिच्यावर अनेक अत्याचार होत होते. आता फक्त याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. यात मीडियाचा मोठा वाटा आहे', असं मत माधवी शिखरेने मांडलं. घराबाहेर पडल्यापासून ते घरी परत येईपर्यंत मुलींच्या आणि तिच्या पालकांच्या मनाला घोर असतो. परंतु ग्रामीण भागात स्त्रिया घरीही तितक्याच असुरक्षित असतात. आपल्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो? यावर बोलताना चारुश्री वझेने सांगितलं, की 'सुरक्षेच्या बाबतीत महिलांनी जागरूक राहायला हवंच. पण डरपोक बिलकूल होता कामा नये.' रुचिता पाड्याळ म्हणाली, की 'स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता कामा नये. आजची तरुणी यासाठी सक्षम आहे. मुलीने स्वतःच्या फायटिंग स्पिरीटवर विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी कराटेसारख्या स्वसंरक्षणाच्या माध्यमाचं प्रशिक्षण घ्यायला हवं. कारण अत्याचार करणाऱ्याइतकाच त्याविरोधात आवाज न उठविणाराही गुन्हेगार असतो.
शिक्षणाची भूमिका महत्त्वाची
महिला दिन एक दिवस साजरा करण्यापेक्षा स्त्री-पुरुष समानतेचं मूल्य कायमस्वरूपी मनात रुजवायला हवं. शिक्षण यात नक्कीच महत्वाची भूमिका निभावू शकतं. समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. अनेक पुरुषही स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देताना आज आपण बघतो. हे कौतुकास्पद आहे.
-शाल्मली रेडकर, प्रोफेसर, रुईया कॉलेज
विशेष वागणूक नको
जागतिकीकरणामुळे आजच्या स्त्रीमध्ये बदल झाले आहेत. समाजाची चौकट मोडण्यापेक्षा ती विस्तारून स्वतःचं स्थान निर्माण करण्यावर तिचा भर आहे. समाजाची मानसिकता मात्र अजूनही तीच आहे. आम्हाला पुरुषवर्गापेक्षा वरचढ व्हायचं नाही आणि आम्हाला विशेष वागणूक नकोय. तर आम्हांला समाजात समानता हवी आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवाय असं आजच्या स्त्रीचं म्हणणं आहे.
- आश्लेषा रांगणेकर, प्रोफेसर, रुईया कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट