सात वर्षांपूर्वी, अकरावीत असताना रुईया कॉलेजच्या 'सी' डिव्हिजनमध्ये माझी आणि इशाची मैत्री झाली. तशा आम्ही दोघीही डोंबिवलीच्याच. पण एकमेकींना फार ओळखत नव्हतो. एक दिवस कॉलेजमधून घरी जाताना माटुंगा स्टेशनवर तन्वी नावाच्या एका मैत्रिणीमुळे आमची ओळख झाली. तिथून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. मग कॉलेजमध्ये एकत्र येणं-जाणं, नाक्यावरची धम्माल, एकत्र डबा खाणं यातून आमची मैत्री अजून घट्ट होऊ लागली. आमच्या दोघींच्या आवडी निवडी साधारण सारख्याच आहेत. आम्ही दोघीही थिएटर करतो. अकरावीपासूनच रुईया नाट्यवलयमधून एकांकिकांमध्ये काम करत होतो. दिवसभर एकांकिकांच्या तालमी असायच्या. वेगवेगळ्या स्पर्धा आणि महोत्सव आम्ही एकत्र करायचो. अभिनयाशिवाय आम्ही दोघी कथ्थक करतो. त्यामुळे तीही आमच्यातली एक कॉमन गोष्ट आहे. कॉलेजची पाच वर्ष कशी संपली ते कळलंही नाही. खूप स्पर्धा, मज्जा-मस्ती, लेक्चर्स बँक करणं, एकत्र नाटक-सिनेमा बघणं आणि त्यावर चर्चा करणं, नाईट आउट्स, भटकंती आणि अभ्यास अशी सगळी धमाल आम्ही कॉलेजमध्ये असताना केली. आता आम्ही दोघीही व्यावसायिक नाटकांमध्ये काम करतोय. दोघी आपापल्या आयुष्यात व्यस्त असलो तरी दिवसभरात काय काय केलं हे एकमेकींना सांगितल्याशिवाय राहवत नाही. चुका सांगणं, भांडणं, अबोल धरणं या सगळ्यामुळे आमच्यातली मैत्री अधिक घट्ट होते. आम्ही वयाने कितीही मोठ्या झालो किंवा अभिनयक्षेत्रात कुठेही पोहोचलो तरी आमची मैत्री कायम राहील याची खात्री आहे.
- सायली परब, डोंबिवली
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट