वृक्षारोपणासाठी उपयुक्त ठरतील अशा 'सीड बॉम्ब'विषयी तुम्ही नुकतंच वाचलं. आता रक्षाबंधनच्या निमित्तानं इकोफ्रेंडली 'सीड राखी'ही बाजारात आली आहे. नेमकं काय आहे या राखीत?
बहिणीनं भावाला बांधलेला धागा तिच्या रक्षणाचं प्रतीक बनतो. मात्र बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला हाच धागा निसर्गरक्षणाचंही प्रतीक बनणार आहे. रक्षाबंधनच्या निमित्तानं बाजारात आलेल्या आकर्षक राख्यांमध्ये इकोफ्रेंडली 'सीड राखी' लक्षवेधक ठरली आहे. रक्षाबंधन झाल्यानंतर ती राखी फेकून न देता ती कुंडीतल्या मातीमध्ये टाकली, की त्यातून झाड उगवतं. त्यामुळे ही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या या राखीला चांगली मागणी आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्तानं कलरफुल राख्यांनी बाजारपेठ फुलून जाते. बऱ्याचशा राख्या बनवण्यासाठी वापरला जाणारा कापूस हा बिटी कापूस या प्रकारचा असून, त्याचं विघटन होत नाही. शिवाय त्यात वापरले जाणारे रंग हे रासायनिक असतात. त्यामुळे त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. म्हणूनच कलसूबाई मिलेट ह्या ग्रुपनं ही 'सीड राखी' ही संकल्पना बाजारात आणली.
कशी बनते?
इकोफ्रेंडली राखी बनवण्यासाठी देशी कापूस, नैसर्गिक रंग यांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या राख्यांमध्ये झाडांच्या बिया वापरल्या गेल्या आहेत. मध्यप्रदेशात उगवणारा हा कापूस महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यात येतो. वर्ध्यात त्यापासून धागा बनवला जातो. हा धागा पुन्हा मध्यप्रदेशात पाठवला जातो. तिथल्या ग्रामीण भागातले लोक त्यापासून विविध रंगांच्या, बियांच्या राख्या बनवतात. यात प्रामुख्यानं चंदन, ज्वारी, पारिजात, नाचणी, तुळस ह्यासारख्या बियांचा वापर होतो. या राखीमध्ये वापरण्यात आलेल्या देशी कापासाचं विघटन होतं. तसंच ही सीड राखी कुंडीत टाकल्यावर त्यात वापरण्यात आलेल्या बीमुळे त्यातून रोपटं उगवतं. त्यामुळे निसर्गरक्षणाशी जोडणारा हा राखीचा धागा लोकांच्या पसंतीस उतरतोय.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट