Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

जगण्याचे नवे भान!

$
0
0

अडनिड्या वयात मुलांच्या मनात निरनिराळ्या भावनांची उलथापालथ होत असते. समज घडलेली नसते, बुद्धीचे निकष मजबूत व्हायचे असतात. अनुभवांचे अर्थ पुरेसे समजण्याआधीच त्यांच्या आजूबाजूचे जग तुफान वेगाने बदलत असते.

डॉ. अंजली औटी

ऋषितुल्य सदावर्तेसरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस, त्यांच्या मुलांनी मोठा करायचा ठरवला. त्यांच्यामुळे आयुष्याला वेगळी दिशा मिळालेले त्यांचे सर्व चाहते विद्यार्थी मोठ्या प्रेमाने आणि आदराने एकत्र जमले. कार्यक्रम एकदम घरगुती, अनौपचारिक. आपल्याला सरांबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त करण्याची ही संधी होती. अत्यंत साधेपणाने आयुष्य घालवलेल्या सरांना या कार्यक्रमाला नाही म्हणता आले नाही. नेहमीच्या हसऱ्या, प्रेमळ डोळ्यांनी ते सगळा सोहळा अनुभवत होते. सगळ्यांचे बोलणे झाल्यावर, त्यांची मोठी मुलगी नम्रता बोलायला उभी राहिली. आपल्या अभिनयाने मराठी लोकांची मने जिंकलेली ती एक नावाजलेली कलाकार. ती आपल्या वडिलांविषयी काय बोलते आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला होती.

'तुम्ही सगळ्यांचे आदर्श होता बाबा, अर्थात माझेही. आजही आहात; पण एक अशी गोष्ट आज मला सगळ्यांसमोर तुम्हाला सांगायची आहे, ज्याचे ओझे गेले कित्येक वर्षे मनावर आहे. तेरा-चौदा वर्षांची असेन मी तेव्हा. मला वाटायचे आयुष्य प्रत्येकासाठी सोपे, सरळ असायला हवे; कारण माझ्यासाठी त्यावेळी तसे ते नव्हते.' वातावरणात एक गंभीर ताण आला. कोठेही न थांबता, अडखळता नम्रता पुढे म्हणाली, 'सगळे जग ज्यांचा आदर करत होते, ज्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आयुष्यात निर्धास्त पुढे चालत जात होते, ते माझे वडील योग्य मार्गांनी पैसे कमावत नाहीत हे 'सत्य' एके दिवशी अचानक मला समजले आणि त्या गोष्टीचा जबर मानसिक धक्का बसला.' याची काहीही कल्पना वडिलांना नव्हती आणि घरात आपल्याशिवाय आणखी कोणाला ही गोष्ट माहीत आहे, याचा अंदाज तिलाही नव्हता.

इतर सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच आपले घर मध्यमवर्गीय. जगण्याची सर्वमान्य, सार्वकालिक तत्त्व, आदर्श सांभाळत जगणारे. आपल्या मुलीचे मन:स्वास्थ्य अचानक ढासळायला लागले म्हणून घरदार अस्वस्थ झाले. हसती-खेळती मुलगी तासनतास एकेकटी एका खोलीमध्ये कोंडून घेऊन बसायला लागली. अबोल झाली. तिच्या खाण्या-पिण्यावर जाणवेल एवढा परिणाम झाला. शाळेत जायचे नाही, बरेच वाटत नाही, म्हणून झोपून राहायला लागली. दोन महिन्यांत वजन कमी झाले, अशक्तपणा आला. डॉक्टर्स सुरू झाले. कोणी म्हणे, रक्त कमी झाले आहे. कोणी म्हणे, हार्मोन लेव्हल बिघडली आहे. अनेक तपासण्या झाल्या. एखादा गंभीर आजार दबा धरून बसला आहे का, याचा शोध घेऊन झाला. डॉक्टरांनी खोदून खोदून विचारले. या वयातील मुलीच्या काय काय समस्या असू शकतात त्याचा विचार केला. कोणावर प्रेम करते का, येथपासून कोणी काही गैर तर वागले नाही ना, हेदेखील तपासले गेले. नम्रता काहीच बोलेना.

तिला वाटायचे, 'मी काय बोलू? जर खरे सांगितले, तर आईला काय वाटेल? किती कडक आहे ती! बाबांपासून घटस्फोट घेईल का? नातेवाइकांना, लोकांना काय वाटेल? लोक नावे ठेवतील. कोणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. बाबा किती वेगळे आहेत सगळ्यांसाठी. आईला हे सहन नाही होणार, तिने आत्महत्या केली तर? लहान भावांचे कसे होणार?' चित्र-विचित्र आणि टोकाचे विचार मनात थैमान घालत. त्यापेक्षा तोंडाला कुलूप लावावे हेच बरे. मग कोणी काहीही विचारो, तिची प्रतिक्रिया थंड. तिला धास्ती बसली मनात, आपले बाबा असे आहेत? हे त्याचे खरे रूप आहे? तिला गोष्टी सांगणारे आपले बाबा आठवले. अनेक गोष्टी. गोष्टीचा शेवट करताना चांगले वागले, तर चांगले फळ मिळणार आणि वाईट वागणाऱ्याला त्याच्या वागण्याची फळे भोगावी लागणार. असे सांगायचे ना हे? मग स्वतःच का असे वागले?

माझ्या कानांनी ऐकले मी बाबांना त्या माणसाशी बोलताना, 'तीन लाख तरी लागतील, मग तुझ्या कामाचे बघू,' असे म्हणाले ते. तो म्हणाला, 'माझ्याकडे नाहीत पैसे तर कुठून आणू?' बाबा म्हणाले, 'तुला आणावेच लागतील. काहीतरी सोय करावीच लागेल.' त्या माणसाचा चेहरा मी बघितला. बाबांची पाठ होती माझ्याकडे. कशासाठी मागत होते बाबा त्याला पैसे? मला बाबांचा राग आला. इतके कसे खोटे वागू शकतो कोणी? आम्हाला सगळ्यांना, जगाला फसवत आहेत. किती वाईट आहेत. लोकांच्या मदतीला धावून जाणारे हेच आहेत का? गावाकडे शेती बघणाऱ्या सदामामांना डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांनी पैसे दिले. डोळ्यांत पाणी आले होते त्याच्या, ते पैसे घेताना. मग ते वागणे खरे, की हे वागणे? खरे-खोटे, योग्य-अयोग्य विचारांमध्ये नम्रता मन:स्वास्थ्य हरवून बसली.

त्यानंतर काही दिवसांनी बाबांना त्या दिवशी भेटलेला तो माणूस घरात शिरताना तिने बघितला. आईदेखील घरातच होती. नक्की हा बाबांना द्यायला पैसे घेऊन आला असावा. आता सगळे आईला समजणार म्हणून ती घाईघाईने हॉलकडे गेली. आई-बाबा दोघेही त्या माणसाशी बोलत होते. टीपॉयवर खूप सारे पैसे ठेवलेले दिसत होते आणि आईला तो माणूस सांगत होता, 'ताई, इतकेच पैसे जमले. खूप प्रयत्न केला मी; पण आता नाही वाटत मला की बँकेकडून आमचे घर मला सोडवता येईल. माझ्या आई-वडिलांनी बांधलेले ते घर आहे ते. भावाने कर्जापायी गहाण ठेवले. आता कुठून आणू मी इतके पैसे?'

आईने बाबांकडे बघत म्हणाली, 'खरेतर आम्हालाही नम्रताच्या आजारपणामुळे शक्य नाही; पण ते घर हातून जायला नको. आम्ही करतो मदत तुला; मात्र शक्य होतील तसे पैसे परत द्यावे लागतील.' हे ऐकले मात्र आणि तिला क्षणात सारे उलगडले. मनावरचे खूप मोठे ओझे तितक्याच अचानक उतरले. तिला भोवळ आली. झालेल्या आवाजाच्या दिशेने सगळे धावले. नम्रताला सावध केले. त्यावेळी तिला समजले, तो आईचा लांबचा नातेवाईक आहे. बाबांकडे मदत मागायला, सल्ला घ्यायला आला आणि आपण भलतेच काही समजलो.

ती क्षणभर बोलायचे थांबली. सगळ्यांनाच चकित व्हायला झाले आणि गंभीरही. आपण ज्यांना जवळचे समजतो, त्या व्यक्ती किती अनोळखी असतात आपल्याला, याचे आश्चर्य होते ते. तिच्या या सांगण्यावरून मुलांच्या भावविश्वात काहीही घडू शकते, याची जाणीव झाली. आपल्याला सगळे कळते, असे समजणाऱ्या मोठ्यांनी अंतर्मुख व्हावे, असे काही होते त्या सांगण्यात. नंतर घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे आधीच्या घटनेकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन नम्रताला अचानक मिळाला आणि तिचा खूप मोठा गैरसमज त्यावेळी आपोआप दूर झाला. हा उलगडा कधीच झाला नसता तर? अविश्वास आणि संशय यांनी तिचे भावविश्व पोखरून टाकले असते.

तिच्या भावविश्वात एवढे मोठे, थरारक नाट्य घडते आहे, याची सुतराम कल्पना घरात कोणालाही नव्हती. तिचे शारीरिक आजारपण हे असह्य मानसिक ताणामुळे आहे, हेही समजले नाही. स्वतःलाच अचानक हा उलगडा झाल्यावर मात्र ती हळूहळू पूर्वपदावर आली.

बोलताना सगळ्यांत शेवटी नम्रता म्हणाली, 'बाबा, तुमच्याबद्दल माझ्या मनात शंका आली, याचीच लाज वाटते. तुम्हाला सगळे खरे सांगून टाकावे असे मला अनेकवेळा वाटले; पण हिंमत नाही झाली माझी. वयाने, कर्तृत्वाने नुसतीच मोठी झाले मी. जगाचे, माणसांचे अनुभव घेतले. आतून बदलले मात्र नाही. कायम माझ्याच दृष्टिकोनातून जग बघत राहिले. त्याचवेळी लगेच तुम्हाला विचारले असते, तर पुढचा त्रास टळला असता. त्यानंतरही सगळे मनातच ठेवले आणि त्याचेही ओझे बाळगले. आपण सागितलं तर पुढे काय होईल याचा कायम अतिरंजित विचार केला मी. खरेतर योग्य विचार करणे, वारंवार शिकवले तुम्ही आम्हाला सगळ्यांना. तुमची मुलगी असूनही मी ते इतक्या उशिरा शिकले. मला माफ करा बाबा, आजूबाजूला असलेले जगण्यातील शहाणपण मला माझ्या वागण्यात आणता आले नाही.' स्वतःसाठी काय योग्य आहे, याची वेळेवर निवड करण्यात मीच कमी पडले. तिच्या मनातील प्रामाणिक भावनेने सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला. स्वतःच्या कमतरतेचा असा नि:संकोच सगळ्यांसमोर स्वीकार करणे तरी खरेच किती जणांना जमते?

अडनिड्या वयात मुलांच्या मनात निरनिराळ्या भावनांची उलथापालथ होत असते. समज घडलेली नसते, बुद्धीचे निकष मजबूत व्हायचे असतात. अनुभवांचे अर्थ पुरेसे समजण्याआधीच त्यांच्या आजूबाजूचे जग तुफान वेगाने बदलत असते. आज घर, समाज यांतून मिळणारी मूल्ये आणि प्रसार-माध्यमांमधून काळ्या-पांढऱ्या रंगात रंगवलेल्या भूमिकांचा रतीब रोज कानावर आघात करत असताना साचेबद्ध दृष्टिकोन नकळत मनात रुजतात. जाणीवा घडत जातात. या सगळ्यात पालकांची भूमिका आजही खरेच खूप महत्त्वाची आहे.

(लेखिका कौन्सिलर आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>