Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

शरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक

$
0
0

अॅड. जाई वैद्य

प्रश्न : मी २६ वर्षांचा तरुण आहे. उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण व नोकरी आहे. इतर अनेक मुलांप्रमाणे मलाही कॉलेजमध्ये असल्यापासून एक गर्लफ्रेंड होती. आमचे एकमेकांशी शरीरसंबंधही होते. मी तिला आधीपासूनच सांगितले होते, की मी एकुलता एक मुलगा असल्याने, मला आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करावे लागणार आहे. मला ती आवडत होती; पण तिच्याशी लग्न करून, मी संपूर्ण आयुष्य तिच्याबरोबर काढणार नाही, हेदेखील माहिती होते. माझ्या आई-वडिलांनी मुली पाहायला सुरुवात केल्यावर, मी माझ्या गर्लफ्रेंडशी असलेले नाते संपवायचे ठरवले. हे सांगितल्यावर ती खूप अपसेट झाली. मी फसवले, शरीरसंबंध ठेवले म्हणजे मी लग्न करेन, असे तिला वाटले, म्हणून ती तयार झाली, असे म्हणत माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली आहे. तसे झाल्यास माझी व माझ्या कुटुंबाची समाजात बदनामी होईलच; शिवाय कदाचित माझे संपूर्ण करिअर उध्वस्थ होईल, अशी भीती वाटते. काय करावे हे कळत नाही.

उत्तर : गर्लफ्रेंडशी लग्न करणार नाही, हे तुम्हाला सुरुवातीपासूनच माहीत होते, हे तुम्ही दिलेल्या तपशीलावरून स्पष्ट दिसते. आई-वडिलांना तिच्याबद्दल सांगून त्यांची परवानगी मिळाली असती, तरी तुम्हालाच तिच्याशी लग्न करायचे नव्हते. तिला आयुष्याचा जोडीदार करून घ्यायचे नव्हते. तुमच्या मनात हे स्वच्छ व स्पष्ट होते. असे असतानाही तुम्ही तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. तुमचे नाते किती काळ होते, हे तुम्ही दिलेले नाही. या कालावधीत तुमचे नाते कसे घडले, हे फक्त तुम्ही दोघेच जाणता. या काळात तुम्ही तिच्या मनाचा, भावनांचा अंदाज घेतला होता का? तुम्ही तिच्यात भावनिक गुंतवणूक होऊ न देता, केवळ मैत्री म्हणून शरीरसंबंध ठेवत होता; पण तिला संपूर्ण काळात असेच वाटेल किंवा वाटलेच पाहिजे, असे तुम्ही कसे ठरवू शकाल? हा तिच्या भावनांचा प्रश्न आहे. अगदी आर्थिक मदतीपासून ते करिअरमधे दुसऱ्याला मदत करणे किंवा स्वतःच्या करिअरमधील उत्कर्षाच्या संधी सोडून देण्यापर्यंत अनेक निर्णय अशी मैत्री टिकविण्यासाठी घेतले जातात. मानसिक आणि भावनिक नात्यांत हा धोका कायमच असतो. बरे, एवढ्या जवळचे भावनिक नाते एकाच्या अचानक निर्णयाने संपुष्टात आणायचे म्हणताना, दुसऱ्याला सावरण्यासाठी वेळ देणे आवश्यक ठरते. तसे न झाल्यास साहजिकच दुसऱ्याला फसवले गेल्यासारखे वाटू शकते. त्यातून तक्रारी उद्भवल्यास पोलिसांना त्या नोंदवून घेण्याशिवाय पर्याय नसतो. व्यक्तिगत नातेसंबंधांत फसवले गेल्याची भावना, फसवण्याचा उद्देश इत्यादी सिद्ध करणे हे जितके घटितावर आधारित असते, तितकाच त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा, भावनांचा त्यात समावेश असतो. त्यामुळे केवळ एकाच्या दृष्टिकोनातून असे संबंध पाहणे न्याय्य ठरत नाही. पोलिस व न्यायालयाला दोघांनाही बाजू मांडण्याची समान संधी द्यावीच लागते. बदनामीचे म्हणाल, तर विवाहाव्यतिरिक्त इतर समाजमान्यता नसलेल्या सर्व शरीरसंबंधांबद्दल हा धोका असतोच; कारण शरीरसंबंध आणि नीतिमूल्यांची अविभाज्य सांगड आपल्या मनात आहे.

शरीरसंबंध आणि प्रेमभावना हे एकमेकांशी निगडित आहेत, याबद्दल कोणाचे दुमत नसावे. स्त्री असो वा पुरुष, केवळ संभोगसुखासाठी एखाद्याशी भावनाहीन शारीरिक संबंध ठेवणे, हा नैतिकतेचा आणि मानवी दृष्टिकोनातून सुसंस्कृतपणाचा सर्वांत खालचा दर्जा मानला जातो. अर्थात, यंग जनरेशनला असे वाटत नाही आणि लग्नाची 'कमिटमेंट' करण्याअगोदर आणि जबाबदारी घेण्याअगोदर मोकळे शरीरसंबंध ठेवणे, लिव्ह इन रिलेशनचा अनुभव घेणे, हे सर्वमान्यच नव्हे, तर तरुणाईसाठी नैसर्गिक आहे, असे ते मानतात; पण हे वाटते तितके सोपे नाही. मानवी नाती आणि मानसशास्त्र गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असतात. स्त्री असो वा पुरुष, शरीरसंबंध ठेवण्यातील प्रत्येकाची भावनिक गुंतवणूक वेगळी असू शकते. सुरुवातीला जरी आपण फक्त मित्र-मैत्रीण आहोत आणि एकमेकांशी मैत्रीपूर्ण शरीरसंबंध ठेवत आहोत, हे दोघांना मान्य असले, तरी काही काळानंतर त्यांच्यात कसे भावबंध निर्माण होतील, याची खात्री कोणी द्यावी? कालांतराने त्यांच्यापैकी एक जर दुसऱ्याच्या प्रेमात पडणे किंवा लग्न करण्याचा हट्ट धरून बसणे किंवा गरोदर राहणे, मूल हवेसे वाटणे, असे काहीही घडू शकते. अशा वेळी कोणाच्या भावना चूक-बरोबर ठरवणार? एकमेकांशी करार करून, अटी ठरवून, एकमेकांवर अटींप्रमाणे तेवढेच नेमके प्रेम किंवा नाते ठेवणे, याची खात्री कशी आणि कोणी द्यावी? लिव्ह इन रिलेशन्स तर सोडाच; पण रीतसर लग्न केले, तरी त्यात गैरसमज, राग-रुसवे टाळता येत नाहीत. मग अशा केवळ सामंजस्यावर आधारित नात्यात, केवळ मैत्रीपूर्ण शरीरसंबंध दीर्घकाळ टिकवता येतील, अशी अपेक्षा मला तरी वैयक्तिक अवास्तव वाटते. शिवाय भारतात शरीरसंबंध हा अजूनही मैत्रीचा सहजसोपा विस्तारित भाग समजला जात नाही. शरीरसंबंधांशी निगडीत असलेली सामाजिक नैतिकता आणि प्रत्येकाच्या मनातील वैयक्तिक नैतिकता वेगळी असू शकते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मैत्रीपूर्ण शरीरसंबंध किती योग्य-अयोग्य, सुरक्षित की धोकादायक, हे प्रत्येकाने आपापले ठरवावे.

अशा घटनांमधे वैयक्तिक दोष कोणाचा याविषयी मतमतांतरे असू शकतात; पण कायद्याने दोषी कोण हे ठरविण्याचे नियम आणि त्यांची आखीव चौकट आहे. कायद्याचा अर्थ कसा व का लावला जावा, याला ठोस सिद्धांतिक विचारांचा पाया आहे. त्यापलीकडे जाऊन कुठल्याही दाव्याचा विचार न्यायव्यवस्थेतील कोणत्याही घटकाने करणे आणि त्यांनी तसा करावा अशी समाजाने अपेक्षा ठेवणे, हे अयोग्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>