चोखोबांची भक्ती हा त्यांच्या जगण्याचा श्वासही आहे आणि ध्यासही आहे, हे समजण्यापर्यंतचा प्रवास सोयराबाईंनी हळूहळू केला असणार. वारकरी संप्रदायातील भक्तीची संकल्पना ही भक्ताच्या जाणीवांची उत्क्रांत अवस्था असल्याचे स्पष्टपणे जाणवते. भक्त म्हणून घडत जाणे, स्वत:ची ओळख नव्याने पुन:पुन्हा होणे हा मनाचा अखंड विकास, प्रवास म्हणजे भक्ती हे तत्व 'चोखोबाच्या स्त्रीचे बाळंतपण' या प्रकरणातून स्पष्ट होते. प्रा. रूपाली शिंदे चोखोबांच्या कुटुंबावर ओढावलेला आणि चोखोबांच्या भक्तिवेडामुळे गुंतागुंतीचा झालेला प्रश्न विठोबाला समजतो. चोखोबांच्या काळजीने व्याकुळलेली आणि प्रसूत वेळ जवळ येऊन ठेपलेली, अशा विचित्र प्रसंगामध्ये अडकलेल्या सोयराबाईंची सोडवणूक करण्यासाठी, चोखोबाची बहीण झाला सारंगधर। वहिनी उघडा द्वार हांका मारी। दोघीही भेटल्या तेव्हा आनंदाने। आले ते रुदन चोख्याकांते।। बरे बाई तुम्हा देवाने धाडिले। पती माझा गेला कोणीकडे।। चोखोबाच्या घरी निर्माण झालेल्या बिकट प्रसंगातून सोयराबाईंना वाचविण्यासाठी विठोबा निर्मळेचे रूप घेऊन येतो; कारण चोखोबा चिंतातूर होऊन बहिणीच्या घरीच गेले होते. आता या प्रसंगानंतर विठोबाच्या रूपातील निर्मळेचे उद्गार जास्त महत्त्वाचे आहेत. त्या म्हणतात, चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार। अज्ञान भ्रतार तुमचे गावी।। म्हणोनिया तुम्ही सांगता त्या काम। विरक्तासी श्रम वाटतसे।। दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत। होयाचे ते होत आपणची।। केली त्वा सूचना आल्या माझ्या घरा। त्याने केली त्वरा मजलागी।। सर्वही साहित्य दिले म्हणे आता। नका करू चिंता वहिनी काही।। निर्मळेच्या मुखातून बोलणारा विठोबा सोयराबाईंची प्रेमाने; पण कानउघडणीच करत आहे. संसारातील व्यवहारामध्ये गुंतलेल्या तुम्ही चाणाक्ष बायका मोठ्या हुशारीने व्यवहाराबाबत अज्ञानी, अनभिज्ञ असलेल्या वेड्यापिशा भक्त पतीला संसारातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे काम सांगता. त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देता. त्यामुळे विरक्त वृत्तीने संसार करणाऱ्या भक्ताला खूप श्रम, कष्ट पडतात, चिंता लागते, असे खडे बोल सुनावून चोखोबांचे भक्तिवेड जाणून असणारी लौकिकातील निर्मळा आणि विठोबा रूपातील निर्मळा 'दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत' असे सांगते. माझ्या दादाने बाळंतपणासाठी साधनसामग्रीची व्यवस्था करण्याची पत्नीची सूचना पाळण्यासाठी काही मार्ग काढायचा, अशी खूणगाठ मनाशी बांधली. तो माझ्या घरी आला. मलाच सर्व साहित्य घेऊन तुझ्याकडे त्याने धाडले. चोखोबांच्या भक्तीतील श्रेयस सोयराबाईंना पुरेसे स्पष्ट झाले नव्हते, हे त्या प्रसंगातून जाणवते. चोखोबांची भक्ती हा त्यांच्या जगण्याचा श्वासही आहे आणि ध्यासही आहे, हे समजण्यापर्यंतचा प्रवास सोयराबाईंनी हळूहळू केला असणार. वारकरी संप्रदायातील भक्तीची संकल्पना ही भक्ताच्या जाणीवांची उत्क्रांत अवस्था असल्याचे स्पष्टपणे जाणवते. भक्त म्हणून घडत जाणे, स्वत:ची ओळख नव्याने पुन:पुन्हा होणे हा मनाचा अखंड विकास, प्रवास म्हणजे भक्ती हे तत्व 'चोखोबाच्या स्त्रीचे बाळंतपण' या प्रकरणातून स्पष्ट होते. हा सारा प्रसंग चोखोबांचे गुरू नामदेवरायांनी आपल्या मधुरवाणीने सांगितला आहे. सहजीवनातील अनभिज्ञता, सहचराचे अंतरंग आणि त्याच्या अंतरात्म्याची मागणीच न समजणे, हे खूप मोठे दु:ख नामदेवराय अलवार हाताने आणि रसाळ वाणीने व्यक्त करतात. संसार करताना प्रेयसाच्या पलीकडच्या श्रेयस साधनेतील वेगळ्या हाका ऐकू येणाऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला समजून घेणारा हृदयस्थ सोबती त्याला कुटुंबामध्ये अपवादानेच मिळत असावा. म्हणूनच सोयराबाईंना निर्मळेच्या मुखातून विठोबानेच समजाविणे, हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. सोयराबाईंनी संयमाने, विनंतीवजा शब्दांमध्ये चोखोबांनी गृहस्थधर्म पाळण्याची केलेली मागणी 'प्रपंच करावा नेटका' या धरतीवरची होती. त्यांना चोखोबांचे भक्तिवेड समजले होते; पण ते चोखोबांचे जीवनमूल्य झाल्याची जाणीव नव्हती. समजणे आणि जाणणे या दोन गोष्टींमधील फरक सोयराबाईंना आकळला नव्हता. सोयराबाईंचे बाळंतपण पार पडले. नवजात बालकाचे बारसे झाले. चोखोबाच्या पुत्राची पाचवी पूजन, नामकरण हे सारे आनंदाने केल्यावर निर्मळेने आपल्या घरी मेहुणपुऱ्याला परतण्याचा विचार वहिनी- सोयराला सांगितला. त्यावर वहिनीने, 'नका जाऊ आता बाई तुम्ही। येऊ द्या घरधनी करतील बोळवण।' असे उत्तर दिले आणि 'काय काय आठवू तुमचे उपकार। न पडे विसर जन्मोजन्मी।' अशी कृतज्ञताही व्यक्त केली. त्यावर निर्मळेच्या तोंडून प्रत्यक्ष विठोबानेच सोयराबाईंना उपदेश केला. तो उपदेश सोयराबाईंची चोखोबांच्या भक्तीबाबतची जाण वाढविणारा होता. दादा माझा असे पांडुरंग भक्त। सदा त्याचे चित्त देवावरी।। मान्य करी वहिनी तयाचे वचन। तेणेचि कल्याण असे तुझे।। भक्तीमध्ये सदैव आकंठ बुडालेल्या चोखामेळा यांचे भक्त असणे, नामस्मरण करणे, अभंग रचणे, बोलणे, आध्यात्मिक उपदेश करणे हे सारे तू श्रद्धेने आणि उदारतेने मान्य कर, असे या उपदेशाचे सार आहे. चोखामेळा यांच्या भक्तीचा आदर आणि माहात्म्य यांचा स्वीकार करण्याचा सल्ला विठोबाने निर्मळेच्या मुखाद्वारे दिला. त्यामुळे सोयरा आणि चोखोबा यांच्या सहजीवनातील निसटलेल्या धाग्याची जाणीव होते. चोखोबांचे शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वी सोयरा-चोखोबा यांच्या नात्यात अपूर्णता राहिली होती. येथे निर्मळेच्या घरी अचानक गेलेले चोखोबा महिनाभर राहिले. चोखोबासी मास झाला बहिणीघरी। विचारी अंतरी चोखा तेव्हां। सोडोनिया आलो प्रपंचाचे भये। अंतरले पाय देवाजीचे।। महिनाभर बहिणीकडे आल्यामुळे विठोबाच्या चरणभक्तीचा वियोग झाला, असा विचार करून त्यांनी बहिणीचा निरोप घेतला आणि ते स्वगृही परतले. घरी परतल्यावर विठोबाच्या कृपेने पुत्रजन्म, बारसे सारे काही यथासांग पार पडल्याचा वृत्तांत त्यांना समजला. त्यावर चोखोबा सोयराबाईंना म्हणतात, कैंची बाई येथे आले पांडुरंग। धन्य तुझे भाग्य भेटी झाली। हा प्रसंग म्हणजे सोयराबाई-चोखोबा यांच्या भक्ती सहजीवनाचा, भक्तीधर्माचरणाचा सहप्रवास यांचा आरंभ असावा. निर्मळेचे पती बंका हेदेखील चोखोबांचे शिष्य आणि विठ्ठल भक्त. त्यांनी मातृत्वाची आस लागलेल्या सोयराबाईंचे चित्र रेखाटले आहे. मूल होत नाही म्हणून तळमळणाऱ्या सोयराबाई एके दिवशी मनातल्या मनात विठोबाशी बोलतात, म्हणे कावो नारायणा विसरलासी। आमुचीया कुळी नाही वो संतान। तेणे वाटे क्षीण मना माझ्या। सोयाबाईंची प्रपंचातील गुंतवणूक, आई होण्याची इच्छा आणि अगदी सहजपणे मनातील खंत बोलून दाखवावी एवढ्या जवळचा विठोबाचा सहवास. येथे सोयराबाई प्रपंचात जास्त गुंतलेल्या आहेत; पण भक्तीच्या वाटेवर समीपता - परमेश्वराच्या जवळ असावे, त्याच्यापाशी मन मोकळे करावे, त्याच्या सान्निध्यात असावे, अशी सलोकता, अशी भक्त-ईश्वर यांच्यातील भिन्नता, वेगळेपण, दोघे स्वतंत्र, वेगळे असल्याची जाणीव सोयराबाईंना आहे. सोयराबाईंची अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठोबा वृद्ध, भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये चोखोबांच्या घरी जातो. या अनाहुत पाहुण्याने थोडी चौकशी केल्यानंतर सोयराबाई त्याला सांगतात, म्हणे घरधन्यासी विठोबाचा छंद। आठविती गोविंद रात्रंदिवस।। संसारी सुख नाही अणुमात्र। सदा अहोरात्र हाय हाय।। पोटीही संतान न देखेची काही। वाया जन्म पाटी झाला माझा।। संसार करण्याची, उदरनिर्वाहाची, शिलकीची, गृहिणीची स्वाभाविक इच्छा आणि गरज पूर्ण होत नाही, यामुळे अक्षरश: तळमळणाऱ्या सोयराबाई त्रागा करतात. म्हणूनच त्यांच्या तोंडून 'संसारी सुख नाही अणुमात्र। सदा अहोरात्र हाय हाय।।' अशी खंत व्यक्त होते. अशा संसारात मातृत्वाचे सूखही नाही; त्यामुळेच 'वाया जन्म पाटी झाला माझा,' असे खेदजनक उद्गार येतात. सोयराबाईंना नीटनेटका संसार करायचा होता आणि चोखोबा तर विठोबापाशी निमग्न! सोयराबाई व्यवहारदक्ष, सदैव जागरुक स्त्री होत्या. म्हणूनच घरी आलेल्या ब्राह्मणाने तहान-भूक लागल्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी अन्न-पाण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्या मनात पहिला विचार येतो, सोयराबाईने मनी करोनी विचार। म्हणे हा अविचार करू कैसा। हा तव आहे वृद्ध ब्राह्मण। दंत कानहीन दुर्बळ तो।। विन्मुख जाता पती रागावेल। बोल हा लागेल कपाळासी।। सोयराबाईंच्या मनातील द्वंद्व, त्यांच्यासमोर उभा राहिलेला पेचप्रसंग बंका महाराजांनी अचूकतेने टिपला आहे. समाजाचा रोष आणि पतीची नाराजी ओढविणे या दोन दोष्टी कळत आहेत. दोन्ही पैकी एक करावे लागणारच आहे, याची जाणीव व्यवहाराचे, समाजरचनेचे भान असलेल्या सोयराबाईंना होती. कुटुंबात स्वयंपाक, भांडी, गणगोत, आप्त हे सारे सांभाळताना, जपताना बाई लोकव्यवहाराचे, जनरीतीचे भान जास्त नेकीने पाळत असावी. सोयराबाई जनरीतीचा आब राखून संसार करणाऱ्या बाई होत्या. चोखोबांनी गृहकृतदक्ष असावे, असे त्यांना वाटते. चोखोबा मात्र भक्तीचा आगर! प्रेमाची माऊली, कृपेची सावली आणि मनाचे मोहन असलेल्या चोखोबांच्या भक्तीशी एकरूप झाले पाहिजे. त्यांची काया, वाचा, मन, प्राण वाहून केलेली भक्ती समजण्यासाठी अपत्य जन्माचा प्रसंग किंवा प्रसूत समयी घडलेली हकीकत सोयराबाईंना अंतर्मुख होण्यास भाग पाडते. कर्ममेळ्याच्या जन्म प्रसंगी विठोबाने निर्मळेच्या रूपात केलेला उपदेश हा त्यांच्या प्रपंचधर्माला नवी कलाटणी देणारा होता. संसारामध्ये सुख, आनंद शोधणाऱ्या सोयराबाईंना याची जाणीव होते. किती हे सुख मानिती संसाराचे। काय हे साचे मृगजळ।। अभ्रीची छाया काय साच खरी। तैसीच हे परी संसाराची।। मी आणि माझे वागविती भार। पुढील विचार न करता।। काहे गुंतले स्त्रीपुत्रधना। का ही वासना न सुटे यांची।। सोयरा म्हणे अंती कोण सोयवील। फजिती होईल जन्मोजन्मी।।
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट