Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कशासाठी हा अट्टहास?

$
0
0

सकाळी शाळा, दुपारी क्लास, संध्याकाळी ग्राउंड, त्यानंतर संस्कार वर्ग, सुट्टीच्या दिवशी अवांतर विषयाच्या शिकवण्या, मुलांपेक्षा पालकांना आवडणाऱ्या छंदांचे क्लास… हे अवघ्या पाच ते दहा वर्षे वयाच्या मुलांचे अनेक घरात दिसणारे वेळापत्रक. स्पर्धेच्या युगात मुलांना जिंकता यावे, म्हणून पालकांनी मुलांचे बालपण संपवले आहे. ही मुले घरात एकटी बसतात, तेव्हा त्यांना काय करावे सुचत नाही; कारण घरात रमणे त्यांना माहिती नाही. कशासाठी आहे हा अट्टहास?

चैत्राली चांदोरकर

शाळेच्या गप्पा मारताना माझ्या मुलीने अचानक क्लास लावण्याचा हट्ट केला. माझ्यासाठी हा धक्काच होता; कारण ती आत्ता तिसऱ्या इयत्तेत आहे. घरी तुला कंटाळा येतोय का? काय झाले? शाळेत शिकवतात ते कळत नाही का? असे अनेक प्रश्न मी तिला विचारले. तिने दिलेल्या उत्तराला आज अनेक पालक सामोरे जात आहेत.

'मला क्लासला जाण्यात रस नाही; पण वर्गातील मुले क्लास जातात आणि बाई शिकवायला लागल्या की आधीच उत्तरे देतात. त्यांना सगळेच आधी माहिती असते. मला उगाच वाइट वाटते,' तिने मला सांगितलं. केवळ मीच नाही, तर मुलांना क्लासपासून दूर ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाला या आव्हानाला सामोरे जावे लागते आहे.

आपल्या मुलांना जीवतोड स्पर्धेत पळवायचे नाही. त्यांच्या कलाकलाने पुढे जाऊ या, असा सर्वसामान्य विचार करणाऱ्या पालकांची संख्या तुटपुंजी झाली आहे. या उलट मुलांना शाळा, क्लासमध्ये अडकवलेल्या पालकांची संख्या वेगाने वाढते आहे. या घरांमधील मुले सकाळी शाळेत जातात, दुपारी शाळेच्या बाई किंवा इतर घरगुती शिकवण्यांना जातात. मुलांनी एखादा खेळ तर खेळलाच पाहिजे, या हट्टामुळे संध्याकाळी मैदानावर जातात. काही मुले संस्कार वर्गात भरती होतात. दिवसभर मुलगा दमला आहे, म्हणून त्याला टीव्ही समोर बसायची परवानगी मिळते. कार्टून बघतच त्याचे जेवण होते आणि दिवस संपतो.

शनिवारी आणि रविवारी, सुट्टीच्या दिवसांत मुलांचे वेळापत्रक अजूनच काट्यावर चालते. शनिवारी सकाळी अमक्या ढमक्या गणिताचा क्लास, दुपारी विज्ञानाचा क्लास संध्याकाळी पालकांबरोबर कुठे तरी खरेदी. रविवारी सकाळी छंद वर्ग असतोच पुरवणीला. हा छंद अनेकदा मुलांच्या आवडीचा नसतोच. पालकांना आवडणारा किंवा चार चौघांची मुले जातात, म्हणून आपल्या मुलालाही छंद वर्गाला पाठवले जाते. काहीच नाही, तर या सगळ्या क्लासच्या वेळोवेळी रविवारी स्पर्धा असतातच. परीक्षांचा हंगाम सुरू झाला, की अनेक शाळांच्या बाहेर रविवारी मुले वर्गात आणि पालक शाळेबाहेर मोबाइलवर गेम खेळत बसलेले दिसतात. उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीतील शिबिरांबद्दल न बोललेले बरे.

माझ्या परिचयातीलच नव्हे, तर अनेक घरांमधील पालकांनी मुलांना घड्याळावर अडकवून ठेवले आहे. आपण मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, असा समज करून अनेकांनी मुलांना वेगवेगळ्या व्यापात अडकवले आहे. काही पालक आपला मुलगा सगळ्याच क्षेत्रात प्रवीण असावा या उद्देशाने त्याला अभ्यासात गुंतवून ठेवत आहेत.

गेल्या काही वर्षांत सगळ्यांच क्षेत्रातील स्पर्धा वाढते आहे. यात उतरण्यासाठी मुलांना सक्षम केले पाहिजे, याबद्दल दुमत अजिबात नाही; पण त्यासाठी मुलांना तयार करताना त्यांचे बालपण काढून घेणे, हा योग्य पर्याय नाही. काही महिन्यांपूर्वी माझ्या मैत्रिणीने एक गमतीदार किस्सा सांगितला. तिची मुलगी खेळगटात जाते. शाळेने या मुलांची शर्यत घेतली होती. खेळांच्या सप्ताहाला मुले गैरहजर राहू नयेत म्हणून शाळेने महिनाभर आधीच सूचना पाठवली. चिमुकली तीन चे चार वर्षांची ती मुले. बाईंनी शिट्टी वाजवल्यावर काही मुलांना आपण आता पळायचे आहे, हे देखील कळालं नाही. त्यांना दुडूदुडू पळताना पाहणे हा देखील पालकांसाठी भावनिक प्रसंग होता. माझ्या मैत्रिणी शेजारी उभे असणारे दोन पालक त्यांच्या मुलांकडे बघून जोर जोरात सूचना देत होते, 'पटकन पळा… आपल्याला पहिले यायचे आहे ना? महिनभर आपण प्रॅक्टिस केली आहे ना त्यासाठी.' पालकांच्या या सूचना तिच्यासाठी धक्कादायक होत्या. जी मुले आत्ता कुठे स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत, त्यांच्याकडून एवढ्या अपेक्षा? भविष्यात या मुलांवर किती अपेक्षांची ओझी असतील, याचा विचारही त्रासदायक आहे.

शाळेचा अभ्यासच नाही, तर खेळांच्या वर्गातही पालक अपेक्षा ठेवूनच मुलांना पाठवताना दिसतात. 'दुसरा मुलगा बघ किती पटकन शिकतो, तुला काय होते, खेळताना तू किती टाइमपास करतोस,' मुलांना मैदानावर घेऊन जाणाऱ्या पालकांच्या तोंडी ही वाक्य नेहमीच असतात. खेळ हाच मुळात मनाला आणि शरीराला ताजेतवाने करण्यासाठी असतो, हे पालक विसरले आहेत का?

अतिशयोक्ती नाही; पण पहिली-दुसरीत मुले असणाऱ्या पालकांच्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर क्लासच्या जाहिराती व्हायरल होत आहेत. पहिलीतील मुलांना इंग्रजी अवघड जाते, म्हणून उच्चारावरून भाषा शिकण्याचा क्लास, चित्रमय पुस्तकातील अभ्यास जड जातो म्हणून पारंपरिक क्लासचे पर्याय पालक शोधत आहेत. काही वर्षांपूर्वी ज्यांना अभ्यास जड जात असे, त्यांना मदत करण्यासाठी घरगुती स्तरावर शिकवण्या घेतल्या जात होत्या. साधारणत: पाचवीनंतर गणित, विज्ञानाच्या क्लासला मुलांना पाठवले जात असे. कित्येकदा शाळेच्या बाई देखील मुलांना घरी बोलून त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायच्या. यामध्ये स्पर्धा हा मुद्दा नव्हता. आजही अनेक घरांमध्ये पालकांना नोकरीमुळे मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ नाही, म्हणून क्लासचा उपयोग होतो. कधी एखादा विषय कच्चा असल्याने क्लास लावला जातो. यात काही गैरही नाही; पण आपले मूल सतत इतरांच्या पुढे असले पाहिजे, यासाठी क्लासचा अट्टहास मुलांसाठी त्रासदायक ठरतो आहे.

सगळेच पालक चुकीचे आहेत, असे अजिबात म्हणणार नाही; पण जरा उलटा विचार करून आपण बघू. दिवसभर नोकरी, घरातील कामे पूर्ण केल्यावर कधी एकदा आपण स्वत:ला थोडा वेळ देतो, असे प्रत्येकाला वाटते. स्वत:ला हवे ते करण्यासाठी मिळालेला वेळ किती महत्त्वाचा आहे, हे आपण पालक बालपणापासून अनुभवत आलो आहे. हाच अनुभव मुलांना देताना आणि काचकूच का करतो? एक प्रश्न स्वत:ला विचारा, आपण मुलांना आठवडाभरात किती वेळ त्यांना हवे ते करण्यासाठी देतो? त्यांना निरर्थक गप्पा मारता येतात का? खोड्या काढण्यातील मजा त्यांनी कधी अनुभवली आहे का?

साहसी खेळांचे पुरस्कर्ते आणि एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांनी एका कार्यक्रमात दिलेला सल्ला मला आवर्जून सांगावासा वाटतो. ते म्हणतात, 'अलीकडे पालक मुलांना खूप जपतात. पावसात भिजू नकोस सर्दी होईल, थंडीत आजारी पडू नये म्हणून संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालायला लावतात. सारखी सायकल चालवू नको पाय दुखतील, अशा वेगवेगळ्या सूचनांचा सतत भडिमार सुरू असतो. अतिकाळजीमुळे ही मुले धाडस करायचेच विसरतात. सतत पालकांच्या सुचनांवर अवलंबून राहिलेली ही मुले मोठी झाल्यावर स्वत:चे निर्णय घेऊ बघतात, तेव्हा ती मागे पडतात; कारण धाडस हे कोणत्याही दुकानात मिळत नाही. चुकांमधून आलेले अनुभव त्यांच्या गाठीशी नसतात. मोठेपणी समोर आलेल्या अपयशाला सामोरे जाण्याची मानसिक ताकद त्यांच्याकडे नसते. तू लहान आहेस. तुला काय कळते, असे त्यांना म्हणू नका. कधी तरी त्यांच्यावर जबाबदारी टाकून बघा, त्याशिवाय मुले स्वावलंबी होणार नाहीत.'

झिरपे यांचा हा सल्ला मला महत्त्वाचा वाटतो. त्यांनी दिलेली उदाहरणे आपल्या पाल्यांशी जोडून पाहिल्यास, आपण कुठे आहोत, याचे उत्तर प्रत्येकाला मिळेल. लहानपणी आई-बाबांनी विश्वासाने हातात पैसे आणि यादी ठेवून दुकानात पाठवल्यामुळेच किती जणांचे गणित आपोआप पक्के झाले, हे आठवून बघा. आपले पैसे वाचवले पाहिजेत, हे व्यवहार ज्ञान पुस्तकातून नव्हे, तर दुकानातूनच अनेकांनी घेतले असेल.

आई-बाबा जेव्हा चारचौघांबरोबर गप्पा मारायला बसायचे, तेव्हा आपल्याला अवांतर विषयांची आपोआप माहिती मिळायची. अलीकडे मोठ्यांच्या गप्पांमध्ये तुम्ही पडू नका, असे सांगून मुलांना बाजूला ठेवले जाते. त्यांना जर समाज काय आहे, हे दाखवायचे असेल, तर कधी तरी त्यांच्याशीही मोठ्यांच्या गप्पा मारल्या पाहिजेत. आपल्यावर आई-बाबांनी विश्वास ठेवला आहे, याचा प्रत्येक मुलाला अभिमान वाटतो. मग हाच विश्वास त्यांना अभ्यासात आपण का देत नाही? या मुलांना तुमचा भरपूर वेळ नको आहे. मोजकाच; पण पूर्ण वेळ तुम्ही त्यांना द्या. स्पर्धा आहे, तिला सामोरे जावेच लागणार आहे, याचे भान त्यांना देत असतानाच, आम्ही तुझ्या पाठिशी आहोत, अशी विश्वासाची थाप त्यांना देऊन तर बघा!… मुलांमध्ये काही बदल घडतोय का, याचे निरीक्षण करा. तुम्ही केलेल्या या प्रयोगाचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील.

Chaitrali.chandorkar@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>