Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

आस्था की आकर्षकता?

$
0
0

आध्यात्माचा भर आस्थेवर हवा की आकर्षकपणावर? प्रश्न थोडा विचित्र वाटेल; पण तो अनेकांना पडला आहे खरा. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या पुनरुच्चाराने या वादाला धार चढली. 'उत्तराधिकारी म्हणून महिला लामाची निवड झालीच तर ती आकर्षक असावी,' या अपेक्षेने लामांच्या महत्तेला संशयात ओढले गेले. विचारांचे तेज व्यक्तिमत्त्वात झळकणार असेल, तर दार्शनिक निकष गैरलागू ठरतात. करुणेने व्यापलेल्या महनीयांचे बोल शब्दार्थानुरूप स्वीकारायचे, की लाक्षणिक अर्थ घेऊन अशारीर व्यापकता अंगीकारायची, हा भाग बौद्धिक परिपक्वतेवर सोडलेला बरा.

वृषाली देशपांडे

हा खल सुरू झाला एका मुलाखतीमुळे. त्यातील प्रश्नाच्या उत्तरामुळे म्हणा हवे तर. प्रख्यात तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची 'बीबीसी'ने २०१५मध्ये एक मुलाखत घेतली होती. पुढील दलाई लामा एक स्त्री असू शकते काय, असा प्रश्न त्यांना त्यात विचारण्यात आला. त्यांचे उत्तर होते, 'असू शकते! उपयोगाचे ठरत असल्यास. स्त्री दलाई लामा झाली, तर ती आकर्षक असावी.' त्यावेळीही दलाई लामा यांच्या उत्तराने अनेकांना विस्मयचकित केले होते. 'बीबीसी'च्या अलीकडील मुलाखतीत रजनी वैद्यनाथन यांनी त्यांना या विधानाची मुद्दाम आठवण करून दिली. तुम्ही अद्यापही त्या उत्तरावर ठाम आहात काय, अशी विचारणा केली असता, दलाई लामांनी जुन्याच उत्तराचा पुनरुच्चार केला. बुद्धिमत्तेएवढेच सौंदर्य महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले. सहिष्णुता आणि आत्मविश्वासाची शिकवण आणि प्रचार करणाऱ्या दलाई लामांसारख्या जागतिक स्तरावरील आध्यात्मिक गुरूंकडून आलेले हे वक्तव्य वैद्यनाथन यांना जेवढे विचित्र वाटले, तेवढीच टीकेची झोड मुलाखत प्रसिद्ध होताच दलाई लामांवर उठली.

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. मंगोल भाषेत 'दलाई' म्हणजे महासागर किंवा मोठा. 'लामा' म्हणजे गुरू. अर्थात ज्ञानाचा महासागर. तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरू झाली. दलाई लामा हे बोधिसत्त्वाच्या करुणेचा अवतार मानले जातात. जगभरातील बौद्ध त्यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत तेरा दलाई लामा होऊन गेले असून, तेन्झिन ग्यात्सो हे सध्याचे चौदावे दलाई लामा आहेत. दलाई लामांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते बौद्ध धर्मातील मूल्य आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा धार्मिक अधिकार सर्व सांप्रदायिक सीमांच्या पलीकडचा आहे. सांप्रदायिकतेवर मात करून तिबेटमधील आणि निर्वासित तिबेटींमधील सर्व पंथांना जोडून ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. तिबेटी राष्ट्रधर्माचे दलाई लामा प्रतीक आहेत. वर्तमान दलाई लामांनी या सर्व भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचा अधिकारही मोठा आहे. सर्वमान्य आहे. मानसिक सौदर्यांचे मानदंड जागतिक अभ्यासकांनी स्वीकारले असताना, आकर्षकतेचा सिद्धांत अधोरेखित केल्याने दलाई लामांवर प्रचंड टीका झाली. त्यांच्या विधानाने अनेकांना 'अस्वस्थ'केले. या बाबीची दखल घेत, तसे नमूद करीत, दलाई लामांच्या कार्यालयातून आणि त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला. 'अशा' चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

खरे तर, वर्तमान दलाई लामांच्या पुढाकारानेच आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, निर्वासित तिबेटी भिक्षुणींसाठी स्वतंत्र मठ सुरू करण्यात आले. तेथे आतापर्यंत केवळ पुरुष भिख्खूंसाठी राखीव असलेला अभ्यासक्रम महिलांसाठी खुला करण्यात आला. महिलांकडे वस्तू म्हणून पाहण्याला त्यांनी नेहमीच विरोध केला. आपल्याकडे अधिक महिला नेते असतील, तर जग अधिक शांत जागा होईल, असे त्यांनी वारंवार नमूद केले आहे. बौद्ध साहित्यात अंतर्मनाच्या आणि बाह्य सौंदर्याला सारखेच महत्त्व असल्याचे सांगत, समानता महत्त्वाची असून, आपण महिलांचे अधिकार आणि महिलांना समान वेतनाच्या बाजूने असल्याचे दलाई लामा यांनी या मुलाखतीत सांगितले. महिलांना सन्मान, समानता, योग्य संधीचा त्यांनी पुरस्कार केला आहे. तरी त्यांनी ते विधान का केले असावे, याबद्दल जगभरातील अनेकांच्या मनात कुतूहल कायम आहे.

तिबेटी बौद्ध धर्माचे अभ्यासक तेझिन पालड्रन नमूद करतात, की कोणाचा मत्सर करू नये. वाईट बोलू नये. आपण कनवाळू असावे. वर्तन आणि उद्देश योग्य असावा, असे तिबेटी पालक कायम आपल्या मुलांना शिकवत असतात. यासोबतच कोणालाही भेटताना पोशाख स्वच्छ असावा, मनोवस्था प्रसन्न असावी आणि वावर सहज असावा, तुमच्या सन्निध्यात आनंद वाटावा, अशीही शिकवण असते. बाह्य दर्शन चांगले नसेल, तर मनाचा चांगुलपणाही ठसणार नाही, असा विचार असतो. दलाई लामांना कदाचित असेच सुचवायचे असावे. चारित्र्य विरुद्ध दिसणे असे ते म्हणत नव्हते, असे म्हणायला वाव आहे का? कारण ते अंतर्गत आणि बाह्य सौंदर्य दोन्ही हवे, असेही बोलले होते. वर्तमान दलाई लामा हे युरोपीय आणि पाश्चात्य देशांना भेट देणारे, तेथील नेत्यांशी चर्चा करणारे पहिले दलाई लामा आहेत. बाहेरचे जग त्यांनी पाहिले आहे. आपले दिसणे चांगले असले, की लोक आपले बोलणेही ऐकून घेतात, विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतात या निरीक्षणातून त्यांचे मत असे झाले असावे काय, या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. बौद्ध धर्मात दया, करुणा, औदार्य, प्रामाणिकपणा या विचारांना सुंदर (सोभना) म्हटले आहे. हे सौंदर्य भगवान बुद्धही मानत होते. धम्मपदात त्यांनी म्हटले आहे की मत्सर, स्वार्थीपणा किंवा अप्रामाणिकपणा असेल, तर तुमच्याकडे वक्तृत्व आणि सौंदर्य असले, तरी ते अनाकर्षक ठरते. म्हणजेच ते सौंदर्याला नाकारत नाहीत, तर आवडी-नावडीसाठी केवळ तो निकष नसावा, असे म्हणतात. दलाई लामांचेही म्हणणे तसेच तर नसावे?

अनेक ग्रंथांमध्ये तथागत बुद्धांची त्वचा अतिशय मुलायम, देदीप्यमान अगदी सुवर्णकांती म्हणावी अशी झाल्याचे उल्लेख आहेत. लोभ, द्वेष, संशय यांचा ज्ञानप्राप्तीमुळे विलय झाला होता आणि प्रेम, स्नेह, दया, करुणा यांच्या अभिव्यक्तीमुळे त्यांना अनोखा मुखवर्ण प्राप्त झाला होता. शेवटी ते तथागत होते. त्यांच्याइतक्या उच्च स्तराचे नाही, तरी खऱ्या ध्यानधारणेमुळे चेहऱ्यावर शांतपणा आणि सुखद भाव येतात. वर्ण तेजस्वी होतो. त्याला भद्रमुख म्हटले आहे. असे झाले की व्यक्ती आकर्षकच दिसते ना? असे म्हणायचे होते का लामांना?

दलाई लामांच्या या विधानावर पाश्चात्य माध्यमांत अधिक प्रतिक्रिया उमटल्या. स्त्रीवादी चळवळीतून किंवा महिलांनी म्हणून अजून फारसा आक्षेप नोंदवलेला नाही. सुंदर दिसावे, आकर्षक दिसावे, आपल्या अस्तित्वाची दखल सगळ्यांनी घ्यावी, आपला प्रभाव पडावा, ही स्त्रीसुलभ प्रवृत्ती आहे. ती कोणी नाकारू शकत नाही. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती काय बोलतात, याकडे सहज लक्ष दिले जाते, ही मानवी वृत्ती आहे. पॅरिसमधील व्होग मासिकाच्या कार्यालयात बसून दिलेल्या मुलाखतीच्या वेळी दलाई लामांच्या मनावर सौंदर्य आणि आकर्षक असण्याचा प्रभाव ठसला होता, असे असेल का? की दलाई लामांनी केलेला तो विनोद होता? कारण 'मृत चेहऱ्याकडे' पाहायला कोणाला आवडेल, असेही ते हसत हसत म्हणाले होते.

तिबेटी समाजात असलेला रुढ विनोद इंग्रजीत अनुवादित होताना वेगळेच रूप घेऊन आला आणि त्याची 'ब्रेकिंग न्यूज' तर झाली नसेल? शेवटी दलाई लामाही माणूसच आहेत. चुका त्यांचाकडूनही होऊ शकतात, या निष्कर्षाप्रत यायचे काय? कारण काहीही असले, तरी दलाई लामांसारख्या आध्यात्मिक गुरूंकडून असे विधान येणे अनपेक्षित होते. दिलगिरीमधून त्यांनी मनाची महत्ताही दाखवून दिली. मनाच्या मोठेपणाखेरीज व्यक्तिमत्त्वात आकर्षकता झिरपणे शक्य नाही, हेच खरे वैश्विक सत्य आहे. त्या प्रभावाची नाळ करुणेशी जुळली असते. प्रामाणिकतेशिवाय अशी करुणा झळकणे केवळ अशक्यच. स्त्री-पुरुष भेदापलीकडच्या या वास्तविकतेचा आस्थेवाईक अंगीकार सर्वसामान्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नसावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>