Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

लग्न आणि भूमिका

$
0
0

मुलग्याचे किंवा मुलीचे लग्न ठरण्याआधी आई-वडिलांनी आपल्या भूमिका तपासून पाहणे गरजेचे आहे. मुलांना त्यांची स्पेस देणे, त्यांना त्यांच्या संसारात धडपडू देणे, त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू देणे गरजेचे असते. मुलांना गरज भासल्यास आपण आहोत, हा विश्वास नक्की द्यावा; परंतु त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपला हस्तक्षेप थांबल्यास, खूप प्रश्न सुटू शकतात.

गौरी कानिटकर

लग्नानंतर प्रत्येक मुलग्याची किंवा मुलीचीच भूमिका बदलते असे नाही, तर त्यांच्या आई-वडिलांचीही भूमिका बदलत असते. ते सासू आणि सासरे या नवीन भूमिकेत जात असतात. आपण ज्या वेळी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारतो, त्यावेळी आधीच त्याची पूर्ण तयारी करायला हवी. सासू-सासरे ही भूमिका बजावताना तर, त्याची फारच गरज आहे. वर्षानुवर्षे आपल्या मनात तेच तेच पारंपरिक विचार असतात. परंपरांचे साचे मनात असतात. घरातील वर्षानुवर्षे होणाऱ्या गोष्टी त्याच पद्धतीने पुढे होतील, असे आता नवीन काळात घडणार नाही, याची जाणीव ठेवायला हवी. बदलत्या काळाप्रमाणे नोकरीतील कामाची पद्धत बदलते आहे. कामाचे तास वाढले आहेत. तिथले ताण वाढले आहेत. शिवाय अनेकदा ऑफिसचे ठिकाण लांब असते. जाण्यायेण्यात बराच वेळ जातो; पण अनेक ठिकाणी याची जाणीव ठेवली जाते, असे होत नाही.

शमाताई म्हणाल्या, 'आमच्या घरी वर्षात तीन नवरात्र असतात. ती अगदी साग्रसंगीत पद्धतीने व्हायलाच हवीत. एवढी वर्षे मी सांभाळले आहे. आता अंजलीने- माझ्या नवीन सुनेने हे सगळे केले पाहिजे. मी तर सगळे सोवळ्यात करत होते. तेवढी काही माझी अपेक्षा नाही; पण सगळी नीट पूजा करून सवाष्ण जेवली, की मग माझे काहीच म्हणणे नाही. मग खुशाल तिने तिच्या कामावर जावे.' या उदाहरणात अंजलीला एवढी रजा मिळेल का? शिवाय तिने वेळेवर कामावर जाणे अपेक्षित आहे ना? एवढेच नाही, तर तिला ते करण्यात रस आहे का? तिला नेमके काय वाटते आहे, याचा विचारच नाही.

आत्ताच्या मुलगे-मुलींना त्यांची त्यांची स्पेस महत्त्वाची वाटते. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यात प्राधान्य कशाला आहे, हे जाणून घ्यायला हवे. त्यांनी काही नवीन पदार्थ केले, तर त्याला दाद द्यायला हवी. आमच्या परिचयातील एक गृहस्थ आहेत. त्यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. गणपतीचे दिवस होते. त्यांची नवी सून वीणाने उकडीचे मोदक केले होते. ते करताना तिने त्यात भरण्यासाठी साखरेचे सारण केले. या गृहस्थांच्या घरी गुळाचे सारण करायची पद्धत होती. साखरेचे सारण आणि गुळाचे सारण या दोन्हींच्या चवीत खूपच फरक आहे. वीणाने ते पहिल्यांदाच केले होते. ते म्हणाले, 'वा वा! फार मजेदार झाले आहेत मोदक!' ही घटना जेव्हा त्यांनी मला सांगितली, तेव्हा मला फारच गंमत वाटली आणि त्यांच्या हजरजबाबीपणाचे कौतुक वाटले. ते म्हणाले, 'आपल्या घरात नवीन माणूस येणार आहे, तर त्या व्यक्तीची वागायची पद्धत कशी आहे, याचे निरीक्षण केले पाहिजे. हल्ली मुलग्याचे लग्न होऊन नवीन सून घरी येणार म्हटले, की 'अरे बापरे' असे ऐकायला मिळते. त्या ऐवजी अरे वा! आता नवीन माणूस येणार घरी. आता मलाही तिच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कशी असेल बरे ती? असे कुतूहल मनात जागृत करणे आणि त्याच नजरेने नावीन्याचे स्वागत करणे आपल्याला वेगळ्याच वाटेवर घेऊन जाणारे असते.'

आज आपल्या समाजात झट लग्न, पट घटस्फोट ही पद्धत रूढ होऊ पाहत आहे. एकूण होणाऱ्या घटस्फोटांपैकी आई-वडिलांच्या हस्तक्षेपामुळे होणाऱ्या घटस्फोटांची संख्या फार मोठी आहे. रोज उठून आपल्या मुलीला दिवसातून तीन-तीन वेळा फोन करणारे अनेक आई-वडील आहेत. शिवाय प्रत्येक गोष्ट मुलांच्या पुढ्यात वाढून देणारे आई-वडीलही कमी नाहीत. कोणत्याही बाबतीत मुलांना काहीच कमी पडता कामा नये, असा विचार करणारे कितीतरी आई-वडील आहेत.

'एका मुलाची चौकशी करायची आहे. सिद्धार्थ त्याचे नाव' विजयाबाई विचारत होत्या. 'हं, म्हणजे फॉर्ममध्ये लिहिला आहे त्याचा पगार पन्नास हजार; पण वयाच्या मानाने, म्हणजे अठ्ठावीस आहे ना त्याचे वय, त्या मानाने कमी वाटतो आहे माझ्या मुलीला त्याचा पगार. तिने त्याला तसे विचारलेदेखील. बाकी मला स्थळ म्हणून योग्य वाटते आहे. मी माझ्या मुलीला म्हटले, आता तेवढ्यासाठी स्थळ नाकारू नकोस. बरे तशी आमची परिस्थिती चांगली आहे हो. मी तिला म्हटले, की मी देते दर महिना तुला चाळीस हजार. मग तर झाले?' अशा पद्धतीने वागणारे पालक संख्येने कमी नाहीत.

आपल्या मुलांची लग्न ठरण्यापूर्वीच, आपली भूमिका नेमकी कशी असणार आहे, याचा विचार प्रत्येक आई-वडिलांनी करणे आज अगत्याचे आहे. त्यांचे त्यांचे आयुष्य त्यांना जगू द्यायला हवे. त्यावेळी जर त्यांनी मागितली, तरच मदत करावी. आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध अधिक सकस कसा होईल, याचे नियोजन पालकांनी आधीच करायला हवे. आपापले उद्योग, छंद, नवीन गोष्टी शिकायला हव्यात. म्हणजे मग मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यासारख्या गोष्टींना आळा बसू शकेल.

लेखाच्या अखेरीला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे, आपल्या मुलांचे सेक्स लाइफ हे लग्नानंतर सुरू होत असते. त्यासाठी दोघांना भरपूर एकांत मिळणे आवश्यक असते. कदाचित ते दोघेही सुरुवातीच्या काळात उशिरा उठतील, एकमेकांच्या भोवती भोवती करतील; पण कालांतराने हे आकर्षण कमी होईल, याचे भान घरातील मोठ्या माणसांना असेल, तर प्रश्न सोपे होतील. समजून घेणे यालाच तर म्हणत असावेत ना? या विषयावर खूप काही लिहिता येण्यासारखे आहे; पण तूर्तास इतकेच!

(लेखिका विवाह समुपदेशक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>