Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

यो-यो : नात्यांची नवीन व्याख्या!

$
0
0

'यो-यो बाँडिंग' करणाऱ्यांनी सोशल मीडिया पोस्ट सोडून, आपल्या हक्काच्या व्यक्तींबरोबर प्रत्यक्षात काही काळ घालविला, स्वतःविषयीच्या अवास्तव अपेक्षांना महत्त्व देण्यापेक्षा, ज्यांच्या सहवासात आनंद मिळतो अशांना वेळ दिला, तर 'यो-यो' नात्यांचे कोडे निश्चितच लवकर सुटेल. सतत सोशल मीडियावर काय शोभून दिसेल या विचारापेक्षा, आपल्या माणसांना काय वाटेल, याचा विचार केल्यास ते नाते अधिक चांगले होईल.

मेघना कुलकर्णी-रानडे

सोशल मीडियाची क्रेझ कमी होती की काय, म्हणून आता तेथे वापरणाऱ्या शब्दसंपदेची भर पडू लागली आहे. सोशल मीडियावर समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद देताना आपण कुठे कमी पडलो तर, …आपल्याला इतर लोकांनी नावे ठेवली तर, या आणि अशा क्षुल्लक गोष्टींचा अति विचार करून, नेटकऱ्यांनी 'फोजी', '#जोमो', '#मोमो' यांसारख्या अजब शब्दांचा खजिना शोधून काढला आहे. हे शब्द दिसायला छोटे आणि वाचायला अर्थहीन वाटत असले, तरी सोशल मीडियाच्या जगात त्यांना विशेष महत्व आहे. '#फोमो' म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, '#फोजी' म्हणजे फिअर ऑफ जॉयनिंग इन, '#जोमो' म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट, '#मोमो' म्हणजे मिस्टिरी ऑफ मिसिंग आउट.

आता प्रश्न असा येतो, की या शब्दांची ओळख मी का सांगते आहे? कारण, या शब्दांनी माणसांच्या मनात अस्वस्थेतेचे बीज विनाकारणच पेरले, तसेच त्याने लोकांच्या आपापसातील नातेसंबंधांना, मैत्रीलादेखील धक्का लावला. त्याची खरी सुरुवात झाली 'यो-यो बाँडिंग'मुळे. उदाहरणार्थ, 'आम्ही एकमेकांसोबत आहोत खरे; पण आमच्यात यो-यो बाँडिंग आहे.' 'आम्ही इन्स्टाग्राम /फेसबुकच्या बऱ्याचशा पोस्ट, स्टोरीजमध्ये अनेकदा एकत्र असतो; पण आमची मैत्री ही 'यो-यो बाँडिंग'ची आहे,' अशा प्रकारची विचित्र वाक्ये आजकाल खूपदा कानी पडू लागली आहेत. या 'यो-यो बाँडिंग'चा शब्दशः अर्थ म्हणजे चढ-उतारवाले नाते; ज्यात कसलेच सातत्य नाही. कधी बघणाऱ्याला हेवा वाटेल एवढे घनिष्ठ संबंध, तर कधी संपर्क कक्षाच्या बाहेरच. सोप्या भाषेत सांगायचे, तर नात्यात विश्वासार्हता कितपत आहे, हे माहिती नाही. दिखाऊपणावर अधिक भर. प्रत्यक्ष भेटीत कोणताही आपलेपणा जाणवो किंवा न जाणवो, आमचे नाते किती भारी आहे हे '#बेस्टीज', '#गुडवाइब्ज', '#रिलेशनशिपगोल्स' असे जमतील तेवढे हॅशटॅग वापरत सोशल मीडियावर आपल्या नात्याच्या जाहिरातबाजीची हौसच जास्त. थोडक्यात, या तथाकथित 'यो-यो बाँडिंग'चा पाया आणि कळस दोन्ही सोशल मीडियावरील आभासी जग आहे. त्याचे आयुष्य सोशल मीडियासारखेच क्षणभंगुर. कधी चमकणारे, चार लोकांमध्ये चर्चा घडवणारे, तर कधी अचानक लुप्त होणारे. साधारण सोशल मीडियावर प्रमाणापेक्षा अधिक वेळ घालवणारे या वर्गात मोडतात.

अशा या अजबगजब नात्यामध्ये जर दोघेही त्याच विचारसरणीचे असतील, तर प्रश्नच येत नाही. दोघांमधील कोणीतरी एकच जर 'यो-यो' वादी असेल, तर नात्यामध्ये न सुटणारा गुंता होऊन बसतो. ज्यावेळी दोघांमधील कोणीतरी एकच हे सोशल मीडियापेक्षा वास्तवातील गोष्टींना धरून वागण्याचा प्रयत्न करू पाहते, तेव्हा या नात्यांमध्ये गल्लत होऊ लागते. 'यो-यो' विचारांची व्यक्ती ही त्या एका क्षणापुरती जगत असते. दुसरी व्यक्ती त्या नात्यामध्ये भावनेने अडकलेली असते. येथे कोण चूक, कोण बरोबर हे महत्त्वाचे नसून, केवळ सोशल मीडियामुळे, नात्याला असे वेगळे शिक्के मारणे कितपत योग्य आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

हे 'यो यो' विचारवंत मनातून खूप एकटे असतात. आपण, आपल्या समस्या, आपल्याला जाणवणाऱ्या गोष्टी इतरांसारख्या नाहीतच, आपण कोणीतरी वेगळेच आहोत, या भ्रमात हे राहत असतात. एखाद्यासमोर मन मोकळे केल्यास आपण मनाने कमकुवत आहोत, असा इतरांचा समज होईल. …आपण एकदा एखाद्यासाठी हक्काची व्यक्ती बनलो, तर मग समोरची व्यक्ती सतत गाऱ्हाणी सांगत त्रास देईल आणि आपल्या खासगी आयुष्यात नको तेवढी ढवळाढवळ करेल, आपल्याला त्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहायला लागेल, तिला/त्याला रोज भेटावे लागेल, अशी आभासी भीती यांच्या मनात असते. अशा सगळ्या आभासी भीतीमुळे, विचारांच्या गोंधळात आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या सोयीनुसार गृहीत धरत, पाहिजे तेव्हा जवळ करत, पाहिजे तेव्हा लांब करत, त्याच्या/तिच्या मनाचा विचार करत नाही. आपल्या या वागण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल, ही जाणीवच नसते. या विसंगत वागण्यामुळे आपण आपल्याच मनाचे राजे आहोत, असा या 'यो-यो' मंडळींचा गैरसमज होतो. येथेच एखाद्या नात्यामध्ये भावनिक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची गडबड होते. या व्यक्ती 'यो-यो' प्रेमींमध्ये स्वतःची गुंतवणूक करतात आणि समोरून प्रतिसाद न मिळाल्यास दुखावतात. मुळातच ज्यांच्यासाठी एखादे नाते हे अळवावरचे पाणी असते, अशा व्यक्तींबाबत वेगळा विचार करायला हवा. आपले प्राधान्य कशाला आहे, आपला वेळ कोणासाठी, कधी द्यायचा, सतत समोरच्याला काय वाटेल यापेक्षा आपल्याला काय वाटते, असे प्रश्न स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःलाच विचारणे गरजेचे आहे. सोशल मीडिया हे करमणुकीसाठी वापरले जात होते तोपर्यंत ठीक होते; पण आता त्याने माणसांच्या मनाचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यातून नैराश्य, एकटेपणा, व्यसनाधीनता, आत्महत्येचे विचार असे गंभीर प्रश्न उभे राहू लागले आहेत. 'यो-यो बाँडिंग' करणाऱ्यांनी सोशल मीडिया पोस्ट सोडून, आपल्या हक्काच्या व्यक्तींबरोबर प्रत्यक्षात काही काळ घालविला, स्वतःविषयीच्या अवास्तव अपेक्षांना महत्त्व देण्यापेक्षा, ज्यांच्या सहवासात आनंद मिळतो अशांना वेळ दिला, तर 'यो-यो' नात्यांचे कोडे निश्चितच लवकर सुटेल. सतत सोशल मीडियावर काय शोभून दिसेल या विचारापेक्षा, आपल्या माणसांना काय वाटेल, याचा विचार केल्यास ते नाते अधिक चांगले होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles