आमचे लग्न ठरवून झाले आहे. त्याला आता १५ वर्षे होतील. नवऱ्यासोबत माझे उत्तम पटते. दोन मुले आहेत. मात्र, माझे सासू-सासरे विचित्र स्वभावाचे आहेत. त्यांच्याशी माझे अजिबात पटत नाही. उगाच काहीतरी खुसपट काढून भांडणे करतात. नवऱ्यालाही त्यांचा स्वभाव खटकतो. मात्र, मुलगा म्हणून ते शांत राहणे पसंत करतात. उलट मलाच समजावतात. आत्तापर्यंत मी खूप सहन केले. त्यांचा त्रास म्हणजे, माझ्या माहेरची मंडळी आलेली त्यांना सहन होत नाही, मुद्दाम माझ्या तक्रारी त्यांच्यासमोर करतात, जेवणात नेहमी उणीदुणी काढतात. मुलांकडे नीट लक्ष देत नाहीत. आजारी असल्याचे नाटक करून मुद्दाम सेवा करून घेतात आणि वर मी काहीच लक्ष देत नाही, असेही म्हणतात! अशी बरीच कारणे आहेत. केवळ नवऱ्याचे आईवडील आहेत, म्हणून मी इतकी वर्षे मान ठेवला, एकत्र राहिले. आता वयानुसार मलाही सहन होत नाही. त्यांच्यापासून वेगळे होण्याचा विचार आहे. नवराही मला साथ देईल. एकदा वेगळे होण्याचे त्यांच्यापाशी बोलून दाखवले, तर त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे भीती वाटते. मात्र, मला वेगळे व्हायचेच आहे. यासाठी काही कायदेशीर मार्ग आहे का? वेगळे झाल्यानंतरही आम्ही त्यांची जबाबदारी घेऊ, पैसेही पुरवू. त्यामुळे त्यांना न दुखावता आणि नवऱ्यालाही वाईट न वाटता सासू-सासऱ्यांपासून सुटका करून घ्यायची आहे.
उत्तर : तुमचा प्रश्न खरे तर कायद्यापेक्षा नातेसंबंध समुपदेशनाचा आहे. तुमचा नवरा तुमच्यासोबत मुलांसह त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा राहायला तयार असेल, तर तुम्हाला तसे करण्यास कुठलीही कायदेशीर आडकाठी नाही. तुम्ही तुमच्या पती आणि मुलांसह तुमच्या सासूसासऱ्यांपासून विभक्त होऊन वेगळा संसार थाटल्यास तुमचे सासू-सासरे तुमच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत. खरे तर, तुम्हाला उत्तर द्यावे, असा कुठलाही कायदेशीर भाग तुमच्या प्रश्नात नाही. मात्र, तुमच्या नवऱ्यावर त्याच्या आई-वडिलांची, म्हणजेच तुमच्या सासू-सासऱ्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. नैतिक आणि सामाजिक दृष्टीने आई-वडील, अज्ञान मुले यांची संपूर्ण जबाबदारी एकमेकांवर असतेच; पण कायदा त्यापैकी आर्थिक जबाबदारी बंधनकारक करू शकतो. अर्थातच, सासू-सासरे आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून असतील तर. त्यामुळे तुमचे सासू-सासरे आर्थिकदृष्ट्या तुमच्या नवऱ्यावर अवलंबून असतील, तर ते त्यांच्या मुलाकडून, म्हणजे तुमच्या पतीकडून पोटगी मागू शकतात. या व्यतिरिक्त, त्यांची जी काही मालमत्ता असेल, त्याचा त्यांना योग्य वाटेल तो विनियोग करण्यास ते मुखत्यार आहेत. त्यामुळे, तुमच्यावर रागावून त्यांच्या स्थावरजंगम मालमत्तेतून ते इच्छापत्र करून तुम्हाला बेदखलही करू शकतात. तुमची समस्या लक्षात घेता, तुमचे सासू-सासरे स्वभावाने बदलणे कठीण असले, तरी समुपदेशनाच्या मदतीने सहजीवन सुसह्य झाले, तर उत्तमच. त्यामुळे समुपदेशकांची मदत घेऊन पाहावे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट