Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

जागतिक महिला दिनाचं मतदान कनेक्शन!

$
0
0

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या हक्कांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबतच्या अनेक हक्क आणि अधिकारांचा समावेश होता. यात कामाचे तास, वेतन या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. महिलांना जगभरात अनेक देशांमध्ये मतदानाचा हक्क नव्हता. भारत मात्र याबाबत पहिल्या दिवसापासून अपवाद होता. भारतात सुरुवातीपासूनच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.

का साजरा होतो महिला दिन?

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

मतदानाचा अधिकार..कुठे, केव्हा

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातही महिलांना सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार नव्हता. तेथे महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी १४४ वर्षे लागली. ब्रिटनमध्ये १०० वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतात महिलांनी मतदान करू देण्यात सुरुवातीला काही ब्रिटीश अधिकाऱ्यांचा विरोध होता. स्वित्झर्लंडमध्ये महिला मतदानासाठी १९७४ साल उजाडले. स्वतंत्र भारतात मात्र सुरुवातीपासून महिलांना मतदान करता येते. अनेक इस्लाम राष्ट्रांमध्ये अगदी अलीकडे २१ व्या शतकापर्यंत हा अधिकार वंचित ठेवण्यात आला होता.

भारतात कधी साजरा झाला महिला दिन?

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

संघर्ष सुरूच

महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी सरकरमध्ये प्रतिनिधित्व मात्र कमी आहे. अजूनही भारतात लोकसभेत, विधानसभांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मतदानाच्या पातळीवर महिलांच्या लढ्याला यश आलं असलं तरी मतदारांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी अधिकाधिक संख्येने पुढे येण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>