आज सकाळीच सुधाचा फोन आला. आपल्या नवीनच लग्न झालेल्या मुलीच्या संसाराबद्दल सुधा भरभरून बोलत होती. सुधा सईबद्दल म्हणचे तिच्या मुलीबद्दल सांगत होती की, तिने लग्न झाल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या कशा चांगल्या प्रकारे हाताळल्या आहेत. तिच्या आवाजातून समाधान अगदी ओथंबून वाहत होतं. 'मला बाई सईची थोडी काळजी वाटायची की लग्न झाल्यावर हिला स्वयंपाकघरातील जबाबदारी घेणे तितकेसे जमेल का? कारण लग्नाच्या आधी केवळ करिअर एके करिअर. आधी भरपूर अभ्यासामुळे तिला मान वर करून पाहायलादेखील वेळ मिळत नसे. मी छान गरमागरम पदार्थ तिच्यासमोर ठेवत असे. कधीतरी क्वचित आवडीने एखादा पदार्थ तिने रांधला असेल! आवड होती तिला, पण सवड मिळत नव्हती.' सुधाचं हे बोलणं ऐकून मनात म्हणलं, चला सुधा खुश आहे. कारण हीच सुधा मुलीबद्दल माझ्याकडे तक्रार करायची की, 'कसं होईल गं लेकीचं माझ्या. थोडंही स्वयंपाकघरात डोकावत नाही. लग्नानंतर समजून घेणारी माणसं मिळोत म्हणजे झालं!' आता लेक परदेशी असल्यामुळे सगळं तिलाच पाहावं लागतं. त्यामुळे तिचं आईचं मन थोडं काळजीतच होतं. एक उसासा टाकत ती म्हणाली, 'अगं तिकडे त्यांच्याकडे मोलाने काम करणारी माणसे मिळत नाहीत. घरातले अगदी प्रत्येक काम उपसायचे असते. आठ-दहा तास नोकरी आणि त्यानंतर घरकाम. स्वयंपाकघर वाट बघत असते. शरीर खूप थकलेले आणि खूपशी भूक लागलेली. पण फार त्राणही नसते स्वयंपाक करण्याचे. तरी सई हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या आवडीचा पदार्थ करते आणि खिलवते. सासरी-माहेरी मग उत्साहाने सांगते की आज मी असा फक्कड मेनू केला होता. सोबत फोटो असतातच, जे पाहून माझा आईचा ऊर अभिमानाने भरून येतो.'
आईशी गप्पा मारताना सई सांगत होती, की सकाळी सकाळी ती ज्या किचनमध्ये जाते ते काहीबाही आवरतच राहते. घड्याळ तिला घाबरवत असतं. पण ती आवरायचं काही थांबवत नाही. ही फक्त सईची नाही तर आजकालच्या अनेक मुलींची गोष्ट वाटते मला, ज्या नोकरी, घर, नातेवाईक सगळं काही आनंदाने सांभाळत आहेत. किचनमध्ये गेलं की, एक तासात बाहेर यायचं असतं. सकाळी दहा वाजता एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन द्यायचे आहे. मनासारखी पीपीटी तर बनवली आहे. हा प्रोजेक्ट मिळाला की प्रमोशन पक्कं. मग पगारवाढ ओघाने आलीच. असे विचार करता करातच ती रांधत असते काही ना काही. तिला आपल्या जगण्याचे स्टँडर्ड कालच्या जगण्यापेक्षा एक पाऊल पुढे हवे असतात. पण या सगळ्यात जबाबदाऱ्या बाजूला पडू नयेत, हे सुद्धा ती पाहते.
आवरता आवरता स्वतःसोबत घरातल्या पसाऱ्याशीही ती बोलतच राहते. एकीकडे ती मटकी भिजवते. मोड येण्यासाठी भिजवलेले हिरवे मूग बांधून ठेवते. चांगली मुरावी म्हणून कणिकही आधीच मळून घेते. आता कसे ही सगळी पूर्वतयारी असली की झटपट स्वयंपाक होतो. पुढचा आठवडा ऑफिसचा धावपळीचा मग इकडे काही अंधार पडायला नको. तिचा 'तो' पक्का खवय्य्या आणि तिच्या झटपट पाककृतींचे तोंड भरून कौतुक करणारा. तो मनापासून जेवला की हिलाच समाधान वाटतं! चहा घेता घेता कॅलेंडरवर ती काही खुणा करते. डायटेशियनने सांगितल्याप्रमाणे फॉलो करायचे तर तीही तयारी करायलाच हवी. बरीचशी तयारी झाल्यावर तिला थोडे हायसे वाटते. तोपर्यंत दोन तास आरामात निघून गेलेले असतात. आपल्या हक्काच्या राज्यातून बाहेर पडते. स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायचे असते म्हणून ताण पुसून टाकण्याचा प्रयत्न करते. आरश्यासमोर उभी राहते, थोडं आवरते आणि लॅपटॉप पुढे घेऊन बसते. तरीही डोक्यात तेच घोळत राहते की काही ना काही आवरायचे राहून गेलेले आहे.
कितीही काळ बदलत गेलेला असला, तरी स्त्रियांमध्ये हे उपजतच उगवून येत असावे का? अनेकजणी असतीलही केवळ करिअर आणि स्वत:च्या महत्त्वाकांक्षांना प्राधान्य देणाऱ्या, पण आजही अशा अनेकजणी आहेत ज्या आनंदाने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. असं वाटायचं की नव्या काळात तरी कमी वावर असेल तिचा स्वयंपाकघरात. पण तसं काही होत नाही. त्याची मदत असतेच, पण नेतृत्व मात्र ओघाने तिच्याकडे येत जाते. हे सगळं मुलींच्या केवळ जडण घडणीतच नाही तरी मूळातच आहे. म्हणूनच पंचवीशी-तिशीच्या या स्वावलंबी मुलींनाही आपल्या घरासाठी, माणसांसाठी इतकं झटून काही करावंसं वाटतं. आजूबाजूला स्त्रीवादी वातावरणाचा इतका गोंगाट असतानाही, त्याचा अयोग्य परिणाम आपल्यावर किंवा संसारावर न होऊ देता अनेकजणी हा समतोल साधत आहेत. कोणीही न लादता आपलेपणाने, स्वत:ची जबाबदारी ओळखून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या या मुली आजच्या पिढीच्या नायिकाच आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट