Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

एकी हेच बळ!

$
0
0

तन्वी अमित

करोनाचा प्रकोप आटोक्यात येतोय असे वाटतानाच त्याने अचानक उग्र स्वरूप गाठले आणि आपण सगळेच पुन्हा एकदा लॉकडाउनच्या अपरिहार्यतेकडे ढकलले गेलो. या दरम्यान एक विलक्षण बोलके चित्र अनेकदा समोर आले, ज्यात करोनापूर्वी मानव स्वतःला जैविक साखळीच्या केंद्रस्थानी मानताना दिसत होता. मात्र, या अतीसूक्ष्म अदृष्य विषाणूने त्याला जागे केले आणि 'हे विश्वची माझे घर' या भावना विसरत चाललेल्या मानवाला या संपूर्ण वैश्विक कुटुंबातले त्याचे स्थान दाखवून दिले.

आपल्या भोवती संपूर्ण जग फिरत नसून, या अखंड अव्याहत चालणाऱ्या विश्वाचा आपणही एक भाग आहोत हे सगळ्यांनाच पुन्हा उमजले. 'सब टिके हैं, एक दुसरे के सहारे' या वास्तवाचे भान येणारे अनेक क्षण गेल्या काळात आपण अनुभवले. 'जागतिक कुटुंब दिवस' या शब्दाची व्याप्ती आता आपले लहानसे कुटुंब ते आपण राहतोय तो भाग, शहर, देश आणि संपूर्ण विश्व अशी पूर्वीपेक्षाही अधिक गांभीर्याने केली जातेय. याच्या अनेक कारणांपैकी लॉकडाउन हे एक फार मोठे कारण आहे. घरांची दार बंद होत जाताना मनामनांना लागलेली कुलूपे मात्र उघडत गेली. माणसे घराघरांत बंद झाली आणि संवादांची मिटू लागलेली कवाडे किलकिली होऊ लागली.

जागतिकीकरणाच्या रेट्यात 'रॅट रेस'मध्ये धावताना परस्परांच्या होणाऱ्या भेटी म्हणजे वर्षाअखेरीस होणारे काही दिवसांचे 'आउटिंग' अशी संकल्पना रूजली होती; पण या निवांत भेटी लॉकडाउनमुळे घरातच झाल्या. कुटुंबे पुन्हा एकत्र आली. सुरुवातीच्या काळात घरातूनच होणारे काम, मदतीसाठी कामवाल्या मावशींचे नसणे अशा सगळ्यांशी जुळवून घेतानाच एकीकडे संपूर्ण कुटुंबाने एकत्र स्वयंपाक करणे, घरातली काम करणे, एकत्र जेवणे, गप्पा मारणे, आठवणींमध्ये रमणे, विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले आदल्या पिढीच्या बालपणीचे खेळ घरातील मुलांशी खेळणे यातून नात्यांमध्ये नवे सुरेखसे बंध निर्माण होताना दिसले. अडचणींतून वाट काढताना संपूर्ण कुटुंबाने एकत्र असणे हे किती महत्त्वाचे आणि हिंमत वाढवणारे असते ही जाणीव झाली व त्यातून एक आशादायी चित्र सर्वत्र उभे राहताना दिसले.

नात्या-नात्यांमधले जिव्हाळ्याचे बंध कधी उलगडले, तर कधी दुरावलेली नाती सांधली जाऊ लागली. 'वेळ मिळत नाही' या कारणाने मागे पडलेले फोन नातेवाइकांना, ओळखीच्यांना, मित्रमंडळींना, सहकाऱ्यांना, प्रसंगी अपरिचितांनाही सहज म्हणून किंवा मदतीच्या निमित्ताने केले जाऊ लागले. एकमेकांसाठी शक्य होईल त्या संपूर्ण मदतीसाठी सगळेच जण तयार झाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सोशल मीडिया व्हॉट्सअपचे ग्रुप एकमेकांसाठी सरसावले व जीवनावश्यक वस्तुंपासून ते हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, प्लाज्मा वगैरे गोष्टींच्या मदतीसाठीही माणसे माणसांसाठी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे उभी राहिली. आपल्या मूलभूत गरजा किती मोजक्या असतात या जाणीवेपाशी माणसे येऊ लागली. संकटकाळात केवळ पैसाच नव्हे, तर कुटुंबातील आणि जोडलेली माणसे आपल्यासाठी उभी राहतात. आपली विस्तारित कुटुंबे म्हणजे नेमके काय आणि त्यांचे महत्त्व काय, याची प्रचिती गेल्या दीड वर्षाच्या या काळात येत गेली. एकीकडे घरात अडकून पडण्याविषयी सोशल मीडियावर विनोद शेअर केले जात होते, तर एकीकडे 'आयसोलेशन'मुळे कुटुंबातील सदस्यांच्या स्पर्शालाही माणसे पारखी होत होती. स्पर्श, सहवास, आपुलकी, जिव्हाळा, काळजी या लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींचे आयुष्यात असलेले अनमोल स्थान करोनाकाळात अधोरेखित होत गेले.

एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा पाया आहे. नातेवाइकांचा गोतावळा, व्हॉट्सअपचे फॅमिली ग्रुप हे चित्र आपल्याकडे प्रामुख्याने दिसते. लॉकडाउन दरम्यान या ग्रुप्सने सगळ्यांना जोडून ठेवले. एकमेकांना वेळ देणे, संवाद साधताना हातातला मोबाइल दूर ठेवणे, घरातल्या आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकणे, आई-वडिलांनी मुलांचा अभ्यास घेणे यातून नात्यांमधील भावनिक ओलावा वाढला. कुटुंबातील भारतात नसणाऱ्या सदस्यांची एरवी पेक्षा अधिक काळजी केली गेली. पैसा, प्रतिष्ठा, समाज या साऱ्यांचाच साकल्याने उहापोह झाला. जाणाऱ्या माणसांच्या संख्येमध्ये ओळखीची नावेही येऊ लागली, तेव्हा एकूणच कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व, अखेरच्या क्षणी कुटुंबांनी एकत्र नसणे म्हणजे काय याविषयीही विचार झाले. कुटुंबाचा आधार म्हणजे नेमके काय हे गेल्या दीड वर्षांचे लॉकडाउन सांगून गेले.

करोनापूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती, की विभक्तकुटुंब पद्धती व त्या अनुषंगाने होणारी मानसिकता, एकूणच समाजमनावर होणारे परिणाम, भारतीय कुटुंब व्यवस्थेचे पाश्चात्त्यीकरण वगैरे असलेल्या चर्चेच्या मुद्द्यांचं स्वरूप आता बदललेलं दिसून येत आहे. अर्थात ही झाली एक बाजू. कुटुंबांनी एकत्र असण्याचे अनेक फायदे दिसले, तरी काही ठिकाणी कौटुंबिक हिंसाचारासारख्या किंवा एकत्र असण्यातून उद्भवणाऱ्या 'अतिपरिचयात अवज्ञा' वाटावी अशा समस्याही निर्माण झालेल्या दिसल्या. गेल्या वर्ष-दीड वर्षात घरातच राहिलेली मुले, वृद्ध यांच्या मनांवर व एकूणच समाजमनावर या परिस्थितीचे दृश्य-अदृश्य परिणाम हे दूरवर टिकणारे आहेत. प्राप्त परिस्थिती आपण कितीही 'न्यू नॉर्मल' म्हणून स्वीकारली, तरीही ती सगळ्यांना सुखावह व्हावी यासाठी प्रयत्न करताना कुटुंब एकत्र असणे गरजेचे असणार आहे. वैयक्तिक कुटुंब म्हणून आणि समाज एक कुटुंब म्हणून यासाठी आपल्याला सगळ्यांनाच एकत्रितपणे प्रयत्न करावे लागणार आहेत.

आज सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता जाणवत असली, तरी संपर्क संवाद, संवेदनशीलता, समजूतदारपणा, सौहार्द यांनी परिपूर्ण असणारे आपले कुटुंब हाच आपला ऑक्सिजन आहे, ही जाणीव मात्र या कठीण परीक्षेच्या काळाने करून दिली. आज लॉकडाउन दरम्यान आपल्याला वेढून असणारी घराची सुरक्षित चौकट आणि मुक्तपणे अवघे आकाश कवेत घेणाऱ्या स्वप्नांना बळ देणारी ही पृथ्वी, दोन्हींविषयी कृतज्ञता पुन्हा वाटू लागली. इथल्या समस्त सजिवांचे एकत्र कुटुंब पुन्हा एकदा मोकळेपणाने आणि अधिक समजुतदारपणे एकत्र येईल हीच आशा आहे; कारण एकमेकांमुळेच तर आपण आहोत.

शेवटी, एकच सांगावेसे वाटते,

कोई नहीं हैं आत्मनिर्भर

न चंद्रमा न बादल, न समुद्र न तारे

सब टिके हैं, एक दुसरे के सहारे

- बोधिसत्त्व

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>