Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य

$
0
0

सुरेखा बोऱ्हाडे

काम करणाऱ्या व्यक्तीला कोव्हिडच्या संसर्गजन्य आजाराने चालता बोलता जखडल्याने मृत्यूशी गाठ पडली. माझा जवळचा एक सहकारी एलआयसी एजंट आहे. त्यांची भेट झाली तेव्हा या विषयावर तो म्हणाला, 'वर्षातून मृत झालेल्या दोन व्यक्तींच्या नातेवाइकांना क्लेम द्यायचो, तेव्हा काही वाटायचे नाही; परंतु या महिन्यात एकूण ५४ क्लेम दिले आणि क्लेम दिलेल्या कुटुंबांतील परिस्थिती बघून अतिशय दुःख वाटले. या केसमध्ये २३ महिलांना पतीच्या निधनानंतर त्यांचे एलआयसीचे क्लेम पूर्ण करून दिले. सांगायला खेद वाटतो, की २३ महिलांपैकी फक्त एका महिलेकडे तिचे स्वतःचे चेकबुक होते. २२ महिलांचे बँकेत खाते होते; परंतु त्यांनी कधीही आपल्या खात्यातून स्वतः आर्थिक व्यवहार केलेले नाहीत. आता नवऱ्याच्या मृत्यूनंतर बँकेचे व्यवहार करताना किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत.'

हे ऐकल्यावर खरे तर धक्काच बसला. समाज सुधारला, स्त्री शिकली, पुढारली असे दिसत असले, तरी वरील चित्रावरून हे तितकेसे खरं नाही. या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन हा मुद्दा ऐरणीवर आला आहे किंवा येणार आहे. हा मुद्दा फक्त चर्चा करायचा, लिहायचा किंवा निदर्शनास आणून द्यायचा एवढाच हेतू नाही. ज्या वेळी अशी कठीण परिस्थिती येते, तेव्हा प्रत्यक्षात स्त्रियांना आर्थिक स्वावलंबन नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या सर्व स्त्रिया चांगल्या शिक्षित आहेत, तर काही उच्चशिक्षित आहे. तरीही त्यांना स्वतः बँकेचे व्यवहार करता येत नाहीत. आपल्या जोडीदाराला अचानक गमवावे लागल्यामुळे अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जायला लागते आहे. घरातील कर्त्या पुरुषाला करोना झाल्यावर त्याची टेस्ट, हॉस्पिटलायझेशन, औषधे, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठीची धावपळ, पैशांची व्यवस्था या सर्वांत कुटुंबियांची खूप धावपळ होते. अशातच रोग्याला जगण्याच्या उमेदीपेक्षा भीतीने घेरले, तर मृत्यूशी गळाभेट होते; यामुळे कुटुंबातील पत्नी आणि सर्व सदस्य मनाने, शरीराने आणि धनाने तर खचतातच; शिवाय कमावता पुरुष या रोगाने दगावला, तर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहतो. पत्नीला शेवटचा निरोप घेताना जोडीदाराचा चेहराही पाहता येत नाही.

क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी

देहावरची त्वचा आंधळी काढून घ्यावी कोणी

व्यवहार कुणाला चुकला आहे. कितीही प्रेम असले, तरी गेल्या मागे जाता येत नाही. आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांच्या दाणा-पाण्यासाठी दुसऱ्या दिवशी या व्यवहारी जगात तिला उभे राहावे लागते. बँकेचे आर्थिक व्यवहार कधीही स्वतः केलेले नसल्यामुळे सुरुवातीला ते कठीण वाटते. आज ई-बँकिंग सुरू झाले आहे. ते अजूनच कठीण काम वाटते. करोनात बळी पडलेल्या पुरुषांच्या बायका शिकलेल्या आहेत; परंतु आजच्या या कठीण काळात त्यांना नोकरी मिळणेही दुरापास्त झाले आहे; त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि इतर आर्थिक तोंडमिळवणी करण्यात कसरत करावी लागते. पैसा... पैसा... पैसा काय खायचा असतो, असे आपण आतापर्यंत म्हणत आलोय; पण 'आधी कोंबडी की आधी अंडे...आधी अंडे की आधी कोंबडी' असे न राहता आता 'आधी पैसा आणि मग अन्न' हेच खरे ठरत आहे. 'कोव्हिड-१९'च्या या संकटमय काळात एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आली आणि ती म्हणजे स्त्रियांची आर्थिक दुर्बलता. शिक्षण घेऊनही तिला गरज नाही म्हणून किंवा अन्य कारणांनी नोकरी करू दिली जात नाही. त्याचप्रमाणे कुटुंबांचे आर्थिक व्यवहार, बँकिंग यातही तिला हस्तक्षेप करू दिला जात नाही. काही स्त्रिया नोकरी करतात; परंतु पगाराचे पैसे बँकेतून काढणे व त्याचा विनियोग करणे हे तिच्या हातात नसते. काही कमावणाऱ्या स्त्रियांना हा माझा पगार आहे, माझे पैसे आहेत असे म्हणण्याचा अधिकार नसतो, हे त्यातून आश्चर्यकारक.

या गोष्टीला खरे तर स्त्री जबाबदार आहे; कारण बऱ्याचदा ती म्हणते मला काय समजते यातले, सर्व व्यवस्थित चालले आहे ना ते महत्त्वाचे; पण आर्थिक साक्षरता हाती नसेल, हातात पैसा नसेल, तर स्त्रियांना अनेकदा अन्याय, अपमान, पिळवणूक, अत्याचार या गोष्टींना सामोरे जायला लागतेय. नव्हे वर्षानुवर्षे त्या आर्थिक स्वावलंबनाअभावी त्या या गोष्टी भोगत आहेत. खरे तर, कुटुंबातील आर्थिक विनियोगाचे निर्णय पती-पत्नीच्या समन्वयाने व्हायला हवेत. मोलमजुरी करणाऱ्या स्त्रिया घरखर्च भागवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न बघत कष्टात असतात. व्यसनी नवरा तिच्या हातातला पैसा मारझोड करून ओरबाडून घेतो, असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या, तरी आजही एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक स्त्रियांना स्वतः बँकेत खाते उघडणे, त्यातून आर्थिक व्यवहार करणे या गोष्टी जमत नाहीत. स्वतः केल्याशिवाय हे जमणार नाही. स्मार्टफोनचा वापर फक्त व्हॉट्सअॅप, फेसबुक या पुरता मर्यादित न ठेवता, ई-बँकिंग आणि इतर व्यवहारासाठीही करायला हवा. आपली मुले स्मार्टफोनवरून व्यवहार करून देतात. मग, आपण कशाला करायचे असे म्हणून भागणार नाही, प्रत्येकीने 'ई-लर्नर' व्हायला हवे.

सूर्य बुडे ऊन ढळे

उचल पाय चल गं बये...

चिखलावर कमळांचा

भारी कधी टाकू नये...

कवी ग्रेस सांगतात तसं स्त्रियांनी आता पाऊल उचलायला हवे आणि तेही आर्थिक स्वावलंबनाकडे जाणारे! म्हणजे तिलाही तिची जबाबदारी जड वाटणार नाही आणि तिचा भार कुणावर पडणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>