Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 3450 articles
Browse latest View live

घरातून काम

$
0
0

'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरूनच काम करणे, हे सोपे वाटत असले, तरी ती एक कसरत आहे. ती साधावी लागते. ती साधत असताना, 'तू घरातूनच काम करतेस,' हेही ऐकून घ्यावे लागते. हे सारे असले, तरी अनेकींसाठी हा चांगला पर्याय आहे. घरून काम करताना माझ्यासमोर आलेल्या अडचणी, त्यांवर मी शोधलेला मार्ग कदाचित काहींना उपयोगी ठरेल.

सायली परांजपे

काळ १३-१४ वर्षांपूर्वीचा. लोकलमध्ये दिसलेला एक बोर्ड, 'वर्क फ्रॉम होम, अर्न सिक्स थाउजंड.' त्यावर फारसा विचारही केला नव्हता. घरात राहून करायची कामे म्हणजे लोणची-पापड किंवा फॉल-पिको एवढ्याच कल्पना. फारतर डीटीपी वगैरे. करिअर होते ते घराबाहेर पडूनच, ही ठाम कल्पना.

काळ दहाएक वर्षांपूर्वीचा. एका वेबसाइटसाठी काम करत होते. पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडायची वेळ आली होती. ऑफिसमध्ये फोन केला, तर टेक्निकल स्टाफमधला मुलगा म्हणाला, 'घर से भी कर सकती है आप अपडेट.' अरे, हा पर्याय मनात आलाच नव्हता. एखाद्या लेखासाठी मुद्दे काढणे वगैरे कामे घरी केली होती त्यापूर्वी; पण मला वाटते ते माझे पहिले 'वर्क फ्रॉम होम.' मग त्या आणि पुढल्या पावसाळ्यांमध्ये, मध्यरात्रीनंतर मोठा अपडेट आला, तर घरून साइट अपडेट करणे सुरू झालं, तरीही पूर्णवेळ घरून काम करण्याचा विचार शिवलाही नाही.

काळ दोन वर्षांपूर्वीचा. माझे आयुष्य पुरते बदललेले. वृत्तपत्रातील नोकरी मुलगा तान्हा असताना सोडलेली. आता तो शाळेत जायला लागलेला, तरीही बाहेर जाऊन नोकरी शक्य नव्हती. एव्हाना आपले काहीतरी असावे, अशी ऊर्मी पुन्हा वर येऊ लागलेली. मुलगा तान्हा असल्यापासून भाषांतराची थोडीफार कामे करत होते; पण आता ठोस वेळ देऊन, कमीटमेंटने काही करावे, असे वाटत होते. त्याचवेळी एका वेबपोर्टलचे काम समोर आले. या कामाबद्दल आकर्षण वाटावे असे मुद्दे बरेच होते; पण आश्चर्य म्हणजे मला सर्वांत आकर्षक वाटलेला मुद्दा होता 'घरून काम करता येईल' हा. तो वर्क फ्रॉम होमचा बोर्ड पाहिला, त्याला बराच काळ लोटला होता. आयटीसारख्या क्षेत्रातल्या मैत्रिणींना घरून कामाचा पर्याय स्वीकारताना बघितलेले होते. मुळात सध्या बाहेर जाऊन काम करणे शक्य नाही; त्यामुळे घरातून का होईना काम करायला मिळणार, याचा आनंद होता. तात्पर्य, काही वर्षांपूर्वी विचारही केला नव्हता, ते वर्क फ्रॉम होम माझ्या आयुष्याचा भाग होणार होते.

खरे आव्हान पुढे होते. 'वर्क फ्रॉम होम' या शब्दसंचाला उगाचच कम्फर्टचा वास असतो. 'घरून काम करतेस का, मजा आहे,' असे क्वचित मीही बोलले होते. प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर मात्र यातल्या अडचणींनी नखे काढायला सुरुवात केली आणि हे तेवढे सोपे नाही, असे सांगणारे अनुभव रोज उठून हजर होऊ लागले.

मला जाणवले, की मी ठराविक वेळी लॅपटॉप उघडून बसते खरी; पण काम ऑफिसमध्ये व्हायचे त्या वेगाने होत नाही. काहीतरी महत्त्वाचे अपलोड करायचे असताना बेल वाजते. उठण्यावाचून पर्याय नसतो. घरातच आहोत असे म्हणून स्वयंपाकासारखी कामे एकीकडे उरकायला जावे, तर तारांबळ ठरलेली. बारीकसारीक गोष्टी ऑफिसमध्ये पटकन वरिष्ठांना विचारता येत होत्या. येथे फोन, मेसेजेस वगैरे वगैरे. त्यात मुलगा घरी असेल, तर काही विचारायलाच नको. आई लॅपटॉपवर काहीतरी मजेशीर बघत बसली आहे, अशी त्याची ठाम समजूत. मग वैताग, चिडचिड. त्याची रडारड. घरातील आणि बाहेरची दोन्ही कामे एकमेकांमध्ये घुसत आहेत अशी अवस्था व्हायला लागली. कोठून हे काम घेतले, असा विचार पहिल्या महिनाभरात अनेकदा मनात आला.

अर्थात, या प्रत्येक गोष्टीवर मात करणे शक्य आहे, हेही हळूहळू कळू लागले. काम सोडायचे नाही, असा पक्का निग्रह मी केला आणि गुंते बऱ्याच अंशी सुटू लागले किंवा त्या गुंत्यांसकट पाय पुढे टाकण्याची कसरत जमू लागली. आता हास्यास्पद वाटते; पण सुरुवातीचा दीडेक महिना मी सकाळी अंघोळ उरकून, बाहेर जाण्याचे कपडे घालून लॅपटॉपसमोर बसत होते. त्याशिवाय आळस जाणारच नाही, असे मला वाटायचे. हळूहळू कामासाठी मनाची तयारी आपोआप व्हायला लागली. मग हा बाहेरचा मेकअप गरजेचा वाटेनासा झाला. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी ऑफिसमध्येही कमी नसतात, हा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर घरातील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष शक्य होऊ लागले. मुलाबाबत सांगायचे, तर त्याच्या शाळेच्या वेळात बहुतेक काम पूर्ण करायचा प्रयत्न मी करते. तो शाळेतून आल्यानंतर त्याला वेळ दिला, तर मग त्यानंतर थोडा वेळ काम करायला त्याची हरकत नसते.

या प्रत्यक्ष अडचणींची तीव्रता कमी झाल्यावर एक गोष्ट डाचू लागली. आपण शंभर टक्के देऊन काम करत असलो, तरी बाकीचे हे काम फारसे गांभीर्याने घेत नाहीत, याकडे कितीही दुर्लक्ष करू म्हटले तरी 'ती ना, घरूनच तर काम करते,' हा दृष्टिकोन टोचत होता. त्यात आपल्याकडे बाई आणि पुरुष करत असलेल्या कामांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात विनाकारण मूलभूत असा फरक आहे. तो 'वर्क फ्रॉम होम'लाही लागू आहे. अर्थात, या सगळ्याचा सामना ऑफिसमध्येही करावा लागतो हे लक्षात घेतल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येते. किमान त्या मुद्दयाशी अडकून पडायला होत नाही. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे आपण घरून करतो, ते काम ऑफिसमध्ये जाऊन केलेल्या कामाइतकेच महत्त्वाचे आहे, हे ठामपणे सांगण्याची गरज अनेकदा भासते. इतरांना आणि स्वत:लाही. त्यात अजिबात संकोच करू नये.

अनेकदा एखादे काम दुसऱ्या दिवसापर्यंत पूर्ण करून द्यायचे असते. त्यासाठी वेळाचे नियोजन डोक्यात तयार असते; पण आयत्यावेळी घरी कोणीतरी येते. मग गप्पा, सरबराई यात वेळ निघून जातो आणि रात्री जागून काम पूर्ण करून द्यावे लागते. असे क्वचित झाले, तर ठीक आहे; पण सारखे व्हायला लागले तर त्याला आवर घालावाच लागतो. घरून केलेल्या कामांचेही वेळापत्रक ठरवून घ्यावे लागते आणि शक्य तेवढ्या कसोशीने ते पाळावे लागते. नाहीतर मग याचा ताण तब्येतीवर येऊ लागतो आणि ते होता कामा नये. शिवाय लहान मूल असलेल्यांनी तर स्वत:साठी एक मार्जिन कायम ठेवले पाहिजे; कारण आयत्या वेळी काय इमर्जन्सी येईल सांगता येत नाही. आणखी एक प्रॅक्टिकल मुद्दा म्हणजे, कामासाठी बसण्याची जागा. घरूनच काम करतो आहोत म्हणून कुठेही लॅपटॉप उघडला आणि काम केले, असे अनेकदा होतं. आपण बसतो आहोत, ती जागा आपल्या पाठीसाठी योग्य आहे, याची खात्री करून घ्यावी लागते. नाहीतर त्यातून कल्पनाही केली नव्हती, असे गंभीर आजार होऊ शकतात.

घरातून काम करण्याचेही अनेक प्रकार आहेत. एखाद्या कंपनीसाठीच; पण ऑफिसला न जाता घरातून काम करणे वेगळे आणि मी करते त्याप्रमाणे घरातून फ्री-लान्सिंगसारखे काम करणे वेगळे. घरातून नियमित नोकरी करणाऱ्यांसाठी बरेच नियम असतात. ते कितीवेळ लॉग्ड इन आहेत यावर बारीक लक्ष ठेवले जाते. हातातील कामानंतर सहाएक महिन्यांनी मी भाषांतरांची कामे बऱ्यापैकी घ्यायला सुरुवात केली. भाषांतरांबाबत काम हातात येईपर्यंत तुम्ही बांधील नसता; पण एकदा काम हातात घेतले, की तुमच्यासाठी ती कमीटमेंट होऊन जाते. चार ठिकाणांहून घेतलेली कामे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळामध्ये डेडलाइन्स पाळून पूर्ण करायची, तर मनात काही अल्गोरिदम्स घोळवावे लागतात. त्यात घरगुती कामांचीही भर असते. सुरुवातीला गोंधळ होतात. सगळ्या लोकांशी वागताना एक प्राथमिक प्रामाणिकपणा ठेवला, तर कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागत नाही, असा माझा अनुभव.

ऑफिसमध्ये जाऊन काम करणे शक्य नसेल, त्यावेळी वर्क फ्रॉम होम हा एक उत्तम पर्याय आहे, अशा मतावर मी आता आलेली आहे. विशेषत: स्त्रियांना गरोदरपणात, मूल लहान असताना काम सुरू ठेवायचे असेल, तर तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेली ही मोठी सोय आहे. घरून काम करून आपण केवळ अर्थार्जनच नव्हे, तर करिअरही करू शकतो. त्याला काही मर्यादाही आहेतच.

क्रिएटिव्ह कामांसाठी एकांत हवासा वाटत असला, तरी काही वेळा संवादाची गरज प्रकर्षाने जाणवते. घरातून काम करताना मेसेजेस, ई-मेल्स या माध्यमांतून संवाद होत असला, तरी प्रत्यक्ष चर्चांची सर त्याला येत नाही. ऑफिसमध्ये जात असताना मला प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा संवादाचा हा मार्ग सोयीचा वाटायचा. आता मात्र मी कोणाशीही प्रत्यक्ष बोलायला उत्सुक असते. येत्या काही वर्षांत जेथे आपला लॅपटॉप, ती कामाची जागा, हे समीकरण होऊन जाईल असे म्हटले जात असले, तरी मला ऑफिस ही संकल्पना कायम टिकावी असे वाटते. पाचेक वर्षांपूर्वी याहूच्या सीईओ मरिसा मायर यांनी वर्क फ्रॉम होमवर निर्बंध आणले, तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र, लोक एकत्र येतात, तेव्हा ते अधिक उत्पादनक्षम आणि शोधक असतात, असे कारण त्यांनी दिले होते. त्यात तथ्य आहे. काम कोणत्या प्रकारचे आहे, यावरही ते अवलंबून आहेच. मलाही पुढे घराबाहेर पडणे शक्य होईल, तेव्हा नक्कीच बाहेर जाऊन काम करायला आवडेल, सध्याची वर्क फ्रॉम होम कसरत जमलेली असली तरीही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलांचा ताबा आणि पालकत्व अधिकार

$
0
0

अॅड. जाई वैद्य

प्रश्न : आमचा विवाह २०१० मध्ये झाला. फेब्रुवारी २०१२ मध्ये आमच्या मुलाचा जन्म झाला. मुलाच्या जन्मापासून तिच्या आईचे आमच्या कुटुंबात दखल देणे प्रचंड वाढले. माझी पत्नीही घरच्या जबाबदाऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सतत आपल्या माहेरी जाणे, कुटुंब आणि माझ्या नातेवाइकांशी संबंध न ठेवणे, न बोलणे, मलाही त्यांच्यापासून तोडणे असे करत होती. या सगळ्यांमुळे आमच्यात सतत कुरबुरी होतच राहिल्या. २०१५ मध्ये तिने नव्याने नोकरी सुरू केली. तेव्हा 'वर्क फ्रॉम होम'चा ऑप्शन वापरून मी माझ्या मुलाची स्वत: काळजी घेत असे. यानंतर २०१७ मध्ये आमच्या मुलाला घेऊन ती माहेरी निघून गेली. समेटाच्या माझ्या प्रयत्नांना तिने दाद दिली नाही. तिने व तिच्या माहेरच्यांनी मला माझ्याविरुद्ध ४९८ अ व इतर पोलिस तक्रारी करण्याच्या धमक्या दिल्या. माझ्या मुलाला भेटू देणे, त्याची माहिती मला देण्यास नकार दिला. पत्नीने तीन बेडरूमचा फ्लॅट तिच्यासोबत संयुक्त नावावर घेण्याची मागणी केली. शेवटी मी मुलाचा ताबा मिळावा यासाठी दावा दाखल केला. तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. माझे प्रश्न पुढील आहेत :

१. मुलाचा ताबा मिळण्याचा माझा दावा न्यायालय डिसमिस करेल का? माझ्या मुलाचा ताबा मिळण्यासाठीच्या दाव्याला पूरक म्हणून मी घटस्फोट व मुलाच्या ताब्यासाठीचा अर्ज नव्याने दाखल करावा का?

२. आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन फक्त मुलाच्या ताब्याविषयीचा खटला चालवू शकतो का?

३. माझा मुलगा पुढील वर्षी ५ वर्षांचा होईल, त्यानंतर मला मुलाचा ताबा मिळू शकतो का?

४. मला माझ्या पत्नी व तिच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीच्या कारणासाठी मुलाचा ताबा मिळू शकतो का?

उत्तर : या प्रश्नावरील खटला न्यायालयात प्रलंबित असल्याने तसेच तुम्ही वकिली सल्ला घेतला असल्याने यावर आणखी मत देणे उचित नाही; पण हा अनेकजणांसाठी प्रातिनिधिक प्रश्न असल्याने या प्रश्नाच्या निमित्ताने कौटुंबिक कायद्यातील मुलांचा ताबा, भेट आणि आई-वडिलांतील बेबनाव व घटस्फोट या महत्त्वाच्या विषयांवर प्राथमिक माहिती आपण घेऊ.

मुलांची कस्टडी (ताबा) आणि गार्डियनशिप (पालकत्व अधिकार) यात फरक आहे आणि तो समजून घेण्याची गरज आहे. मुलांचा ताबा म्हणजेच कस्टडी, यात शारीरिक ताबा असा अर्थ मुख्यत: अभिप्रेत असतो. मुलांचा शारीरिक ताबा म्हणजे मालकी हक्क नसून मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी. मुलांची काळजी, त्यांचे पालनपोषण, त्यांचा सांभाळ, त्यांची जडणघडण, शिक्षण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्याचे अधिकार, असा त्याचा योग्य अन्वयार्थ लावायला हवा. बऱ्याचदा सूज्ञ, सुशिक्षित पालकांच्या ध्यानात 'जबाबदारी' हा अर्थ न घेता 'ताबा' हा अधिकारात्मक शब्द जास्त राहतो, ही या क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हा सर्वांनाच वाटणारी खंत आहे. मुलांची कस्टडी (ताबा) हा तात्कालिक किंवा दीर्घकालीन असू शकतो. तसेच वेळोवेळी यात बदलही घडू शकतो. मुलांचा ताबा ज्याच्याकडे असेल, त्या व्यक्तीला मुलाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक सांभाळ करणे ही जबाबदारी व त्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार असतात. ज्या व्यक्तीच्या ताब्यात त्यावेळी मूल असेल, ती व्यक्ती त्यावेळी मुलाची कस्टोडियन (ताबाधारक) असू शकते. उदा. मुले ज्यावेळी शाळेत असतात, त्यावेळी शाळा पर्यायाने शिक्षक/शालेय प्रशासन मुलांचे कस्टोडियन वा ताबाधारक असतात. अशा अर्थाने कस्टडी किंवा ताबा हा मर्यादित अधिकार दर्शवतो. पालकत्व ही जास्त व्यापक संकल्पना आहे. पालकत्व ही जबाबदारी आणि अधिकार यांचा समसमासंयोग असतो. पालकाने मुलाची जबाबदारी घेणे जसे कायद्याला अपेक्षित आहे, तसेच कळीच्या मुद्द्यांवर मुलांचे मत डावलून, आपला निर्णय मुलाला ऐकायला लावणे, मुलांना शिस्त लावण्याचा अधिकारदेखील यात अभिप्रेत आहे. मुलांची वाढ, संगोपन कशा पद्धतीने व्हावे, त्यांनी कुठल्या गोष्टी कराव्यात न कराव्यात यासाठी त्याला परवानगी देणे, तो सज्ञान होईपर्यंत त्याचे कायदेशीर प्रतिनिधित्व करणे, त्याच्या हक्कांचे संरक्षण करणे, या साऱ्या गोष्टी पालकत्वाच्या कक्षेत येतात. पालकत्व सर्वप्रथम नैसर्गिक/मुलाच्या जन्मामुळे मिळते. जन्मदाते आई-वडील मुलाचे नैसर्गिक पालक असतात, हे कायद्यात मान्य आहेच; पण सर्वच धार्मिक, वैयक्तिक कायद्यांनुसार नैसर्गिक पालकत्व हे वडिलांकडे आहे आणि काही कारणांमुळे वडील पालकत्वास अपात्र असतील, तरच ते आईकडे येते. त्याला बाळाच्या वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत आईच नैसर्गिक पालक असावी, असा अपवाद आहे. (वेगवेगळ्या कायद्यांतून वेगळी तरतूद आहे. येथे सर्वसाधारण माहितीसाठी उल्लेख केला आहे.) असे जरी असले, तरी मुलांचा ताबा आणि पालकत्वाच्या बाबतीत लिखित कायद्यापेक्षा, 'मुलांच्या सर्वोच्च हितसंबंधांचे संरक्षण' हा नियम वरचढ मानला जातो. त्यामुळे 'मुलगी आहे तिचा ताबा वडिलांना मिळणारच नाही' किंवा 'आईला नोकरी नाही, शिक्षण नाही त्यामुळे तिला मुलांचा ताबा न मिळता तो वडिलांनाच मिळेल,' अशी साधारण विधाने/मते/सल्ले यांवर विश्वास ठेवू नये. कायदा व न्यायालयाच्या दृष्टीने आई-वडिलांमधील भांडणांपेक्षा मुलाचे हित जपणे, त्याला निकोप वाढीची संधी देणे, त्याला संरक्षण देणे, याला सर्वोच्च महत्त्व असल्याने दाव्यातील घटना, त्यामधून समोर येणाऱ्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी/समस्या, पती-पत्नी व मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील फरक, एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी व परिस्थिती इत्यादी गोष्टींचा सर्वांगीण विचार करून मुलांसाठी योग्य काय ठरेल याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे असते. येथे अनाठायी असले, तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हादियाच्या दाव्यातील दावा प्रलंबित असल्याच्या काळात तिने कॉलेजमध्येच राहून आपले शिक्षण पूर्ण करावे आणि त्या काळात तिच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी कॉलेजच्या प्राचार्यांवर दिली. या बहुचर्चित निर्णयाची आठवण करून दिल्यास ते अयोग्य ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही बाजूंचे दावे - तक्रारी लक्षात घेत हादियाने आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभे राहण्यास, स्वत:चे निर्णय स्वत:च्या जबाबदारीवर घेण्यास सक्षम होण्यास प्राधान्य दिले होते. हा त्या निर्णयामागचा अंतस्थ हेतू फार थोड्या जणांच्या लक्षात आला आणि हा निर्णय बहुतांच्या टीकेचा धनी झाला. खटला प्रलंबित असल्याच्या काळात न्यायालयाने जणू मुलाच्या पालकत्वाची भूमिका स्वीकारून मुलाच्या भल्याचा निर्णय घेणे कायद्यालाही अपेक्षित आहे. शेवटी आपल्या मुलाच्या भल्याबुऱ्याच्या तिसऱ्या व्यक्तीने, अगदी सन्माननीय न्यायाधीश असले, तरी निर्णय घेण्यापेक्षा दोन्ही पालकांनी आपल्यातली भांडणे बाजूला ठेवून समंजसपणे घेतला, तर ते निश्चितच जास्त स्वागतार्ह आणि योग्य ठरू शकेल. त्यामुळे शक्यतो मुलांची मने समजून घेत आणि त्यांना पालकांनी आपल्यातील भांडणात न गोवता त्यांचा दिनक्रम आणि आयुष्य जितके सुरळीत राहील, ते पाहणे हे उत्तम. अर्थात, अशी आदर्श स्थिती अनेक कारणांनी शक्य नसते, तेव्हा न्यायालयाकडे धाव घेण्यास पर्याय नसतो.

वरील माहितीच्या आधारे आपण वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहू.

१. हिंदू विवाह कायद्याअंतर्गत विवाहविषयक दावा दाखल केला, तरच त्यात कस्टडी (ताबा) मागता येतो. अन्यथा हिंदू अल्पवयीन व पालकत्व कायदा (हिंदू मायनॉरिटी अॅण्ड गार्डियनशिप) किंवा सर्वधर्मीय गार्डियन्स अॅण्ड वॉर्डस अॅक्ट अंतर्गत फक्त कस्टडीचा/ताबा वा पालकत्वासाठी दावा दाखल करता येतो. आपण कुठल्या कायद्याखाली कस्टडी मागितली आहे ते लिहिलेले नाही. याशिवाय या एकाच प्रश्नावर एक वेगळा लेख होईल इतके बारकावे यात आहेत. ते सारे येथे लिहिता येत नसल्याने सध्या एवढेच मोघम सांगता येईल. वर म्हटल्याप्रमाणे मुलाचा ताबा आणि पालकांमधील भांडणे या दोन्ही गोष्टी न्यायालय एकत्र करून निर्णय देणार नाही. त्यामुळे घटस्फोटाच्या दाव्याने मुलांच्या ताब्याच्या दाव्याला पुष्टी मिळेल, असे म्हणणे कठीण आहे.

२. परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन फक्त मुलाचा ताबा व पालकत्व यासाठी निश्चितच दावा चालवता येईल आणि कदाचित तो जास्त सुयोग्य निर्णय असेल.

३. मुलांचा ताबा मिळण्यासाठी 'त्याच्या सर्वोच्च हिताची जपणूक' करण्यास पालक म्हणून तुम्ही जास्त योग्य आणि सक्षम आहात हे सिद्ध झाल्यास मुलाचा ताबा तुम्हाला कुठल्याही वयात मिळू शकतो.

४. तुमची पत्नी व तिच्या कुटुंबियांकडून तुम्हाला मिळालेल्या वाईट वागणुकीचा आणि तुमच्या मुलासाठी तुम्ही जास्त सक्षम पालक आहात हे दाखवण्याचा काही विशेष संबंध आहे का? तो नसल्यास तुम्ही विचारलेल्या प्रश्न २मध्ये याचे उत्तर आले आहेच. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारातील बेबनाव, भांडणे, आणि तुमच्या मुलाचे संगोपन हे दोन्ही मुद्दे शक्यतो वेगळे ठेवणेच सर्वतोपरी योग्य ठरेल.

मुलांचा ताबा आणि पालकत्व याविषयीचा कायदा, खटले यांची माहिती आणि तो योग्य रीतीने चालावे यासाठी पक्षकारांना समुपदेशन या सर्वांची नितांत गरज आहे. यात न्यायालय, वकील, समुपदेशक सहभाग असायला हवा. तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने या विषयाला सुरुवात झाली, त्याबद्दल तुमचे अभिनंदन व तुमच्या न्यायालयातील लढाईत शुभेच्छा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहुणे येती घरा

$
0
0

पूर्वी घरी पाहुणे यायचे, सुट्यांमध्ये मामा-मावशीच्या गावी, घरी जाण्याची ओढ असायची. आजही ती ओढ असली, तरीही या फास्ट जगण्यात हा आनंद हरवला आहे हे मात्र खरे.

उषा रॉय

पूर्वी उन्हाळ्याची सुटी लागली, की घरी पाहुणे मंडळी येत असत. माहेरवाशीण माहेरी, तर सासुरवाशीण तिच्या माहेरी जात असे. अगदी महिनाभराची ही सुटी आनंदात संपायची. आम्हीही लहाणपणी मामा, काका, मावशी, आत्या यांच्या गावी जायचो. पाहुणे बनून जायला आवडायचे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच धमाल करायचे. आजच्या काळात हे सुखाचे दिवस हरवल्याचे वारंवार जाणवते.

आज आपल्याकडे पैसा, संपत्ती, महागड्या गाड्या, चैनीच्या वस्तू या सगळ्या गोष्टी आहेत; पण घरात माणसेच नसतात. पूर्वीचे लोक सुखसुविधा, पैसा या सगळ्यांमध्ये नव्हते; पण घरात माणसांचा राबता असायचा. शेती, गाव, पाहुणे मंडळींची वर्दळ यांमुळे घरात चैतन्य असायचे. अगदी घरातील वाळवणाचे पदार्थही सगळ्यांसाठी मिळून केले जायचे. याचबरोबर आमरस, पुरणपोळीचा बेत सगळ्यांना सुखावून जायचा. आज या सगळ्या आठवणी डोळ्यांपुढे आल्या, तरीही तोंडाला पाणी सुटते. जेवणाचा साधा बेत जरी असला, तरीही आग्रहाने वाढले जायचे. तेव्हाचे पाहुणे हक्काने घरी येऊन राहायचे. यजमानालाही आनंद व्हायचा. उलट घरी कुणी आले नाहीत, तर राग यायचा. अगदी दूरचे नातेवाइकही आम्हाला हक्काचे वाटायचे. आता मात्र उलट झाले आहे. दूरचे सोडाच; पण सख्खेही पाहुणे म्हणून यायला बिचकतात. आलेच तर उभ्या उभ्या चहा, कॉफी घेतात. आजकाल आग्रहदेखील डाएट, डायबेटिस या कारणांमुळे केला जात नाही.

आताची पिढी पाहुणे म्हणून कुठे जात नाही. फिरायला गेलीच, तर थंड हवेचे ठिकाण, हॉटेलिंग, परदेशातील एखादी टूर अशी सुटी असते. हाताशी आलेले सुटीचे काही दिवस नातेवाइक किंवा गावी जाण्याऐवजी स्वत:च्या कुटुंबाबरोबर फिरायला जाण्यास प्राधान्य दिले जाते. अगदीच नातेवाइक मंडळी भेटली, तर एखाद्या पर्यटनस्थळी गेट-टुगेदर आयोजित केले जाते. म्हणजे ट्रिप आणि भेटीगाठी या दोन्ही गोष्टींचा मेळ एकदाच साधला जातो. अशावेळी माझे मन पूर्वीच्या आठवणींमध्ये रमते. त्या साध्या, सरळ, सोज्ज्वळ आणि निर्मळ जगण्याची याद येते आणि मन गलबलते. त्यामुळे आजही मी आणि माझे कुटुंबीय येणाऱ्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो. पाहुणचार करतो. हा वारसा मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाला आहे.

यावर्षीही आमच्याकडे पाहुणे येऊन गेले. बडोद्याहून सुनेचे आई-बाबा, बांग्लादेशहून माझी चुलत नणंद, दीर, पुतणी हेदेखील आले. माझ्या पतीचा वाढदिवसही दणक्यात साजरा झाला. केक कापण्यापासून ते बंगाली पद्धतीने औक्षणही केले. शंखध्वनी, उलू देणे झाले. फोटोसेशन झाले. भरपूर धमाल केली. पाच-सहा दिवस राहून पाहुणे मंडळी आपापल्या गावी गेली. जाताना त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण देऊन गेली. नंतर पुण्याहून माझी भाची व जावई आले; पण धावतीभेट देऊन निघून गेले. त्यामुळे पाहुणचार करता आला नाही. अर्थात ख्याली, खुषालीच्या गप्पा समाधान देणाऱ्या ठरल्या. कितीही व्यग्र असली, तरीही माझी भाचेमंडळी आवर्जून भेटायला येतात. काही दिवसांपूर्वी भाचा उदय, माझी लेक मनीषा सुट्ट्यांसाठी घरी आले. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी मिळून धमाल केली. अगदी बच्चेकंपनीलाही नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्हा सर्वांच्या बालपणातील आठवणी ऐकून चकीत झाली. हॉलमध्ये रंगलेली आमची मैफल संपूच नये असे वाटत होते. गाण्यांच्या भेंड्याचा खेळ या मैफलीला चारचाँद लावून गेला. मी शिकवलेल्या डान्सचीही उजळणी झाली. अगदी शेवटी शेवटी बंगाली गाण्यांची रेलचेल होती.

ही सगळी मुले गेल्यानंतर बांग्लादेशहून माझे दीर, जाऊ आणि त्यांच्या दोन मुली आल्या. त्यांचे फिरणे, पाहुणचार यांत दिवस कसे संपले हेदेखील लक्षात आले नाही. वेगवेगळ्या भागातील बंगाली भाषा ऐकून आम्हाला हसूदेखील आले. जाताना मात्र सारेच गहिवरले. अगदी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. आता मात्र घर सुनेसुने वाटत होते. 'असे पाहुणे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती' या ओळी बरेच दिवस माझ्या मनात रुंजी घालत होत्या.

पूर्वी घरी पाहुणे यायचे, सुट्यांमध्ये मामा-मावशीच्या गावी, घरी जाण्याची ओढ असायची. आजही ती ओढ असली, तरीही या फास्ट जगण्यात हा आनंद हरवला आहे हे मात्र खरे. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणे किंवा आपल्या घरी पाहुणे येणेही समाधान देऊन जाते. आपल्या माणसांचा लळा लावते. यासाठी पाहुण्यांचे घरी येणे दिवाळी, दसऱ्याच्या आनंदासारखे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बी अ मॅन' अव्वल

$
0
0

डोंबिवलीच्या संघाचा 'मौनांतर'मध्ये तृतीय क्रमांक

देविका जोशी, रुईया कॉलेज

शब्दांची निर्मिती भावना व्यक्त करण्यासाठी झाली असं म्हणतात. पण अनेकदा शब्दांशिवाय केवळ चेहऱ्याच्या हावभावावरून मनातील भावना समोरच्या माणसापर्यंत पोहोचवल्या जातात. याच कौशल्यावर आधारित असलेली 'मौनांतर'ही मूकनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबई-पुण्यात पार पडली. मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागातूनही स्पर्धेत तब्बल २७ संघ सहभाग झाले होते. 'मौनांतर'मध्ये पुण्याच्या केसर प्रॉडक्शन निर्मित 'बी अ मॅन' या एकांकिकेनं पहिला क्रमांक पटकावला. तसंच एका दिव्यांग मुलाचा मूकनाट्य शिकण्याचा प्रवास मांडणाऱ्या 'सीड ऑफ आर्ट' या डोबिंवलीच्या ऍबस्ट्रॅक्ट आर्ट या संघानं स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये रंगलेल्या मुंबई फेरीत तरुण प्रेक्षकांनी हजेरी लावलीच. पण, त्याचबरोबर आबालवृद्धांनी देखील स्पर्धेत सादर झालेल्या मूकनाट्यांना भरभरून दाद दिली. 'मूकनाट्यांना या स्पर्धांमधून नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि या स्पर्धेमुळे येणाऱ्या काळातील मुकनाट्यांकडून आमच्यासह प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत', असं मत परीक्षक गिरीश परदेशी आणि प्रसाद वनारसे यांनी व्यक्त केलं. या स्पर्धेचं आयोजन वाइड विंग्स मीडिया, पृथ्वी इनोव्हेशन, आर्ट ऑफ सायलेंस, बी टू आर, ड्रिम्स टू रिअॅलिटी, फेअरिटेल मीडिया स्टुडिओ या संस्थांनी केलं होतं.

निकाल

प्रथम- 'बी अ मॅन'- केसर प्रॉडक्शन, पुणे

द्वितीय- 'ओह शीट ..'- अण्णासाहेब मगर विद्यालय, पुणे

तृतीय- 'सीड ऑफ आर्ट'- ऍबस्ट्रॅक्ट आर्ट, डोंबिवली

उत्तेजनार्थ- 'राम नाम सत्य है'-जी. एच. रायसोनी, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमची मुलं टीव्हीवर बघतात काय?

$
0
0

कल्पेशराज कुबल

डेली सोप्स, रिअॅलिटी शो, सिनेमे असं खूप काही टीव्हीवर दिवसभर सुरू असतं. सुमारे ३०० हून अधिक चॅनेल्स मनोरंजनाचा रतीब घालत असतात. मुलांसाठी चालवली जाणारी अनेक चॅनेल्स आहेत. पण, ही चॅनेल्स बघायची सोडून, २ ते १४ या वयोगटातली मुलं भलतंच काहीतरी बघत असतात. या भलतंच काही मध्ये सर्वसाधारण मनोरंजन, सिनेमे असं बरंच काही येतं. 'बार्क'नं (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) प्रसिद्ध केलेल्या 'पीक इनटू किड्स व्ह्यूअरशिप' या न्यूजलेटरमधल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

रिअॅलिटी शो, टीव्ही मालिका यामध्ये काहीतरी 'वेगळं' देण्याच्या उद्देशानं इडियट बॉक्सनं लहान मुलांकडे आपला मोर्चा वळवला आहे. परिणामी लहान मुलांचं टीव्ही बघण्याचं प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. टीव्हीच्या एकूण प्रेक्षकवर्गाचा विचार केला असता, त्यातला २० टक्के प्रेक्षकवर्ग हा लहान मुलांचा आहे. २ ते १४ वयोगटातली ही मुलं लहान मुलांसाठी असलेल्या चॅनेल्स ऐवजी इतर चॅनेल्स बघत असतात, असं 'बार्क'चं निरीक्षण आहे. त्यांच्या या सर्वेक्षणानुसार १३ टक्के लहान मुलं खास लहानांसाठी चालवली जाणारी चॅनेल्स बघतात. तर ८७ टक्के मुलं इतर चॅनल्स बघतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे, घरात पालक जे काही टीव्हीवर बघतात ते लहान मुलांना देखील नाईलाजानं बघावं लागतं. यात सर्वसाधारणपणे मनोरंजक चॅनेल्स आणि सिनेमा चॅनेल्स त्यांच्या नजरेसमोर असतात.

यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. टीव्हीवरील हिंसक कार्यक्रम बघणं आणि मुलांचं हिंसक वर्तन वाढणं यांचा परस्पर संबंध आहे. जास्त वेळ टीव्ही बघणं हे बालपणातल्या लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतं. अत्याधिक टीव्ही पाहण्याचा शिक्षणावर आणि शैक्षणिक कामगिरीवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनाही आपण टीव्हीवर काय बघत आहोत याबाबत दक्ष असणं आवश्यक आहे. टीव्हीच्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या काही विशिष्ट प्रसंगांचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होताना दिसतोय, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळी कार्टून, संध्याकाळी मालिका

लहान मुलं सकाळी ९ ते दुपारी ३ च्या दरम्यान कार्टून्स तसंच लहान मुलांचे इतर कार्यक्रम बघतात. परंतु संध्याकाळी ६ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत त्यांच्या डोळ्यांसमोर मालिका आणि सिनेमेचे असतात. संध्याकाळी प्राईम टाइमच्या वेळेत पालक जे काही बघतात तेच लहान मुलांना देखील बघावं लागतं. त्यामुळे सकाळी कार्टून आणि संध्याकाळी मालिका असं चित्र घराघरात पाहायला मिळतंय.

मुलं काय बघतात?

किड्स चॅनल : १३%
इतर (नॉन किड्स)चॅनेल्स : ८७%

मुलांच्या नजरेसमोर काय असतं?
जनरल एंटरटेनमेंट - ५६%
सिनेमा : १७%
संगीत : ६%
बातम्या : ६%
क्रीडा : २%
इतर : २%

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्याची नवलाई

$
0
0

लग्न करायचे नाही, नात्यात अडकायचे नाही, एकाच व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहिल्यास त्या नात्यात काही नावीन्य राहील का, हे आणि असे काही प्रश्न मिलेनियल जनरेशनच्या मनात असतात. त्यामुळेच लग्नाबाबत ते गोंधळलेले असतात. त्यासाठीच नावीन्य, त्याची आवश्यकता हे तपासायला हवे, बरोबरीने नात्यातील स्थैर्य, सुरक्षितता यांचाही विचार करायला हवा.

तन्मय कानिटकर

मध्यंतरी मी 'न्यूनेस' नावाचा एक चित्रपट बघितला. आयुष्यात नावीन्य शोधू पाहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ती प्रेमकथा. नावीन्याची सवय असणारे दोघे नात्यांत स्थैर्य आल्यावर अस्वस्थ होतात आणि वेगळे होतात वगैरे कथा आहे त्याची. सिनेमा तसा सामान्यच वाटला मला; पण यात जो मुद्दा मांडला गेला होता, तो कुठेतरी माझ्या रोजच्या अनुभवांशी जोडला जाईल असा होता. आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना वरुण म्हणाला, 'लग्नानंतर आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचे ही कल्पनाही मला अजून पचलेली नाही. किती कंटाळा येईल ना काही वर्षांनी!' वरुण हे जे म्हणाला, ते अनेकदा अनेक मुला-मुलींनी वेगवेगळ्या गप्पांमध्ये मांडले आहे. 'कंटाळा येण्याच्या' शक्यतेची भीती व्यक्त केली आहे.

या निमित्ताने मनात आलेला प्रश्न म्हणजे, आज लग्नाला उभी असण्याच्या वयातली मिलेनियल जनरेशन, म्हणजे माझी पिढी सतत नावीन्याचा ध्यास असणारी आहे का? 'यूज अँड थ्रो' हे आज परवलीचे शब्द आहेत. 'अमुक अमुक गोष्ट मी गेले चाळीस वर्षे वापरते आहे,' असे सांगणारी आपली एखादी आजी असते. आपण असे काही सांगू शकू का कधी, हा प्रश्न मनात येतोच येतो. एकुणात बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि रोज होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बदलांमुळे, आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू वेगाने बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे वस्तूंच्या अपग्रेडेड व्हर्जन्स, म्हणजेच सुधारित आवृत्त्या बाजारात येताना दिसतात. त्यांची किंमतही परवडेल अशी असते आणि बघता बघता आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी पटापट बदलत जातात. उदाहरणादाखल आयुष्यात आजवर मोबाइलचे किती हँडसेट्स आपण वापरले हे आठवले, तरी जाणवेल जास्तीत जास्त दर दोन-तीन वर्षांत आपण नवीन फोन घेतला आहे. हा आधीच्या आणि आत्ताच्या पिढीच्या आयुष्यात पडलेला फरक चांगला किंवा वाईट, याची चर्चा आपण येथे करणार नाही. तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. मुद्दा हा आहे, की आपले सगळे आयुष्य हळूहळू नावीन्याशी आणि नावीन्याच्या इच्छेशी जोडले गेले आहे. एखाद्या कंपनीची वर्षानुवर्षे तीच जाहिरात टीव्हीवर दिसत असेल, तर उपयोग होत नाही. आता अक्षरश: दर महिन्या-दोन महिन्याला नवनवीन जाहिराती आणल्या जाताना दिसतात. दर काही वर्षांनी नवीन नोकरी शोधणारे आज असंख्य आहेत. 'फेसबुक'शिवाय पान हलत नाही अशी आज तरुण पिढीची परिस्थिती असूनही, नावीन्याच्या शोधात लोक दुसऱ्या कुठल्या जागी जाऊ नयेत म्हणून फेसबुकलादेखील सातत्याने धडपड करावी लागते. फेसबुकवर सतत नवनवीन फीचर्स, सोयी-सुविधा आणल्या जातात. हे नावीन्य न राखल्यास एक दिवस फेसबुक संपेल. कोणतेही क्षेत्र घ्या. तेथे हे लागू पडतेच.

कदाचित सतत नावीन्याची मागणी करणाऱ्या या नव्या व्यवस्थेमुळे असेल; पण मिलेनियल जनरेशनचे आयुष्य आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक अस्थिर आहे, असे मला वाटते. त्याची एक भीतीही या पिढीत आहे. असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसे नसते, तर रोज नवनवीन खोट्या बातम्या सोशल मीडियामधून वेड्यासारख्या पसरल्या नसत्या. नाना पाटेकर, नाही तर विश्वास नांगरे पाटील यांचे नाव वापरत काहीतरी थातूरमातूर मेसेज पुढे ढकलून देणे घडले नसते. या गोष्टी आपल्या मनातल्या असुरक्षिततेच्या भावनेवर पोसल्या जातात. नुसतीच नवी माध्यमे हाताशी आली म्हणून ते घडलेले नाही. हे घडण्यामागील ऊर्जा आपल्या मनातल्या असुरक्षित, अस्थिर वाटण्याच्या भावनेमधून आली असणार. यातून अर्थातच नातेसंबंध, लग्न या विषयांत देखील एक प्रकारची अस्थिरता शिरकाव करते आणि त्यातूनच यापासून दूर पळण्याची वृत्तीही बळावते. आपण आहोत तो कम्फर्ट झोन सोडून नवीन कोणत्या तरी असुरक्षित गोष्टीत कशासाठी पडायचे, असा एक विचार अनेकांच्या मनात डोकावतो. त्यातून लग्न किंवा जवळच्या नातेसंबंधांची भीती वाटू लागते. इंग्रजीत ज्याला कमिटमेंट फोबिया म्हणतात तो हा प्रकार. खरी गंमत अजून पुढेच आहे. माझ्या मते, अस्थिरतेतून निर्माण होणाऱ्या या भीतीची आपल्याला एवढी सवय झाली आहे, की ही सवय आणि दुसऱ्या बाजूला असणारी नावीन्याची ओढ यांमुळे कुठेतरी आपल्याला स्थैर्याचीही भीती वाटू लागली आहे. 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात रणबीर कपूर म्हणतो, 'मैं उडना चाहता हूं, दौडना चाहता हूं, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता.' आपल्या पिढीने हेच स्वीकारले आहे. हेच त्या 'न्यूनेस' नामक चित्रपटात यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. लग्न झाले, की एकमेकांना अधिक ओळखण्याचा, एकमेकांबरोबर मजा करण्याचा असा सुरुवातीचा एक कालखंड संपल्यानंतर नवीन फार काही उरतच नाही आणि एक रुटीन सुरू होते. अगदी मजेचादेखील साचा तयार होतो. उदाहरणार्थ दर रविवारी एक सिनेमा बघणे, दर शनिवारी मित्रांसोबत जेवण करणे वगैरे वगैरे. एकदा गोष्टी अशा ठरून गेल्या, की स्थैर्य येते. नावीन्य संपते किंवा कमी होतं. अरेंज्ड मॅरेजमध्ये तर जोडीदार शोधताना आवडीनिवडी जुळतात का, यालाही आवर्जून प्राधान्य दिले जाते. म्हणजेच तेथेही नावीन्य उरत नाही. गंमत अशी, की हे असे सगळ्यांच्याच बाबतीत घडते. स्वाभाविकही असते ते; पण असे सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिल्यावर या चित्राचीच अनेकांना भीती वाटते. 'बस रुकना नहीं चाहता' म्हणता म्हणता उलट सगळे स्थिर झाले तर, याचीच भीती वाटू लागते. 'आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचे, हे केवढे अवघड आहे,' असे आज मिलेनियल जनरेशन मधील मुले-मुली म्हणतात, तेव्हा ते एकाच व्यक्तीबरोबर राहायचे म्हणजे 'आता आयुष्यात काही नावीन्य उरणारच नाही,' अशा निष्कर्षाच्या दिशेला जातात. एकाच वेळी, लग्नाच्या आधी अस्थिरतेतून वाटणारी असुरक्षितता आणि लग्नानंतर येणाऱ्या स्थैर्याचीही भीती, अशी काहीशी ही कोंडी आहे.

'आता काही नावीन्यच उरणार नाही' अशा निष्कर्षाला थेट जाण्याची गरज नसते. कोणत्याही नात्यात नावीन्य निर्माण करता येऊ शकते. अनेक जोडपी असा प्रयत्न करताना दिसतातही. एकत्र एखादी नवीन गोष्ट शिकणे येथपासून ते लग्नानंतरही एकट्यानेच फिरायला - 'सोलो ट्रीप'ला जाणे, येथपर्यंत अनेक गोष्टी, अनेक जोडपी नात्यातील नावीन्य टिकविण्यासाठी करतात. शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की माणूस बदलतो. आपल्याला येणाऱ्या अनुभवांमुळे, वयामुळे आपल्यात अनेक बदल होतच असतात. नात्यांतील नावीन्याचाच हा भाग आहे. त्या बदलांचा किंवा नावीन्य येण्याचा वेग कदाचित कमी असल्याने, पटकन लक्षात येत नाही. असे छोटे मोठे बदल माणसांत नसते झाले, तर खरेच कंटाळवाणे होईल. एकमेकांसोबत राहताना हे होत जाणारे बदल अनुभवणे, त्याचीही मजा घेणे, यामुळे नाते अधिक घट्ट आणि प्रगल्भ व्हायला मदत होते. लग्नानंतर नावीन्य जाईल आणि आयुष्य एकदम स्थिर होऊन जाईल किंवा प्रवाही राहणार नाही, याची लग्नाआधीच भीती बाळगण्याची गरज नसते. पुढचा मुद्दा असा, की नात्यात सतत नावीन्य असलेच पाहिजे आणि ते नसणारे आयुष्य कंटाळवाणेच असेल असे गृहीत धरून आपणच उगीच एका गोष्टीचे, 'बाप रे केवढे भयानक असेल ते,' असे म्हणत 'भयानकीकरण' करतो. नावीन्य आणत नाते फुलवणे आणि स्थैर्यामध्ये असणारी शांत सुरक्षितताही एकत्र अनुभवणे, या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत पुढे जाण्यात शहाणपण आहे. नाही तर आपण सतत कसल्या तरी शोधात नाखूष राहू. 'नावीन्य' या साधनालाच साध्य मानून पुढे गेले, तर गडबड होते. 'नावीन्य हवे' म्हणून काहीतरी करण्यापेक्षा, जे करायचे आहे, हवे आहे त्यासाठी नवीन काहीतरी करू, ही विचारांची दिशा ठेवल्यास डोक्यातील गोंधळ कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्ट्रेट’ रस्त्यावरील नागमोडी वळणे

$
0
0

हा विषय बराच गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असला, तरी कुठलीही व्यक्ती समलिंगी किंवा विरुद्धलिंगी असण्याआधी ती माणूस आहे, हेच एक गृहितक मानून आपल्या श्रद्धा, समज, विचार आणि कायद्यांची पुनर्रचना केली पाहिजे. कायद्याने त्यांना त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतच; पण त्याचवेळी त्यांना आपल्या वर्तुळात सामावून घेण्याची तयारी आपणही दाखवली पाहिजे.

काजल बोरस्ते

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणारे भारतीय दंड संहितेतील नेहमीच वादग्रस्त ठरलेले कलम ३७७ आणि सुप्रीम कोर्टाने यासंबंधित बऱ्याच मोठ्या अंतराने सुनावणीची केलेली तयारी, यामुळे समलैंगिक संबंधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निर्णय देण्यात दिरंगाई झाली, तरी राजकीय प्रतलावर फारसे परिणाम होणार नाही, असे मुद्दे नेहमीच तात्पुरत्या चर्चेसाठी चघळत ठेवले जातात. समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवावे की नाही, हाही असाच एक ठेवणीतील चघळण्याचा मुद्दा. गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी सुरू आहे. हा विषय फक्त समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळावी की नाही, एवढाच नसून त्याचे अनेक दृश्य-अदृश्य कंगोरे समाजव्यवस्थेच्या पदराखाली झाकले गेले आहेत. त्यांना प्रकाशात आणण्यासाठी सामाजिक घटक म्हणून किंवा निदान बहुसंख्य म्हणून तरी प्रयत्न करणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कायदेशीर मान्यता मिळवणे, ही या प्रवासातील पहिली पायरी ठरू शकते.

ज्या समाजात स्त्री-पुरुषांमधील लैंगिक आकर्षणाबद्दल, लैंगिक गरजांबद्दल उघडपणे बोलणे-लिहिणं वर्ज्य किंवा अश्लील मानले जाते, प्रेम-विवाह किंवा आंतरजातीय विवाहांना स्वीकृती नाही, मुलांना शाळेत लैंगिक शिक्षण द्यावे की नाही, यावरच्या चर्चा पिढ्यानपिढ्या रंगतात; त्या समाजात समलैंगिक संबंधांवर सांगोपांग विचार होणे म्हणजे दिवास्वप्नच. समलैंगिकता ही काहीतरी परदेशी भानगड आहे, आपल्याकडे असे सहसा होत नाही, या भ्रमात भारत असताना एचआयव्हीच्या प्रसाराने या मुद्द्यावर प्रकाश टाकला. अनेक संशोधने झाली आणि ही आपल्याही आजूबाजूला घडू शकणारी किंवा घडणारी घटना आहे. अशी जाणीव भारतीयांना झाली. आतापर्यंत प्रत्यक्ष न बोलल्या गेलेल्या विषयवार एकदमच मतमतांतरे पुढे आल्यामुळे होमोफोबिया तयार झाला. आतापर्यंत आपण जसे जगत होतो ते नैसर्गिक आणि आता पूर्वीपासूनच असलेले; पण आपल्याला नव्याने कळलेले ते अनैसर्गिक, असे एक विषम वर्गीकरण झाले. समलैंगिक संबंध ठेवणे ही एक अनैसर्गिक कृती आहे, या विचाराने त्यासाठी सामाजिक सहिष्णुता उभीच राहिली नाही. खरे तर समलिंगी असणे म्हणजे नक्की काय, याविषयी बरेच अज्ञान किंवा गैरसमज असल्याने माहीत नसलेल्या गोष्टींना चुकीचे ठरविण्याची आपली जुनी परंपरा येथे वर येते.

समलैंगिकता समजून घेण्यासाठी आधी लिंग, लैंगिकता आणि लैंगिक कल या तीन समान वाटणाऱ्या संकल्पनांमध्ये असलेला फरक समजून घेणे गरजेचे आहे. व्यक्तीचे स्त्री किंवा पुरुष असणे हे त्याच्या लिंगावरून ठरते. लिंग हा एक अवयव स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळा असतो. एकदा लिंग ठरल्यानंतर म्हणजे लिंगानुसार ती व्यक्ती स्त्री आहे, की पुरुष हे ठरल्यानंतर त्याला तसे घडविण्याची सगळी जबाबदारी आजूबाजूच्या सामाजिक वातावरणावर येते, ज्याला लैंगिकता असे म्हणतात. म्हणजे पुरुषांनी कसे पुरुषासारखे कठोर, राकट असावे आणि स्त्रीने नाजूक, स्त्रीसुलभ गोष्टी कराव्यात. लिंग आणि लैंगिकता या दोन गोष्टींच्या एकत्रित परिणामातून त्या व्यक्तीचा लैंगिक कल घडत जातो. म्हणजे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी स्त्रियांनी पुरुषांचाच विचार करावा आणि पुरुषांसाठी स्त्रिया हाच एक पर्याय आहे, असे नकळत आपल्या मनावर बिंबवले जात असते. खरे तर लैंगिक कल हे एक जैविक वास्तव आहे. हा कल विरुद्धलिंगी असावा अशी एक अलिखित मान्यता असल्याने, आपण सारेच नकळत या वाटेवरचे प्रवासी होतो. या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन एखाद्या पुरुषाचा लैंगिक कल पुरुषाकडे आणि स्त्रीचा लैंगिक कल स्त्रीकडेच, म्हणजे समान लिंगाच्या व्यक्तीकडे असेल, तर ते बहुसंख्य प्रवाहातील नसल्यामुळे अपवादात्मक ठरते. अशा अनेक अपवादात्मक गोष्टी आपण सहज स्वीकारतो किंवा काही विशेष सन्मानानेसुद्धा स्वीकारतो. व्यक्तीचे डावखुरे असणे हे जितके साधे आहे, तितकेच समलिंगी असणे आहे, ही स्वीकृती येत नाही. याचे कारण म्हणजे लैंगिक विषयांबद्दल असलेले अज्ञान आणि या अज्ञानातून जन्माला आलेली भीती. सगळे करतात त्याविरुद्ध कुणी काही करत असेल, तर ते चूक अशी समूहाची मानसिकता समलैंगिकांना वेगळे आणि विरुद्धलिंगी आकर्षण असण्याऱ्या बहुसंख्यांकांना 'स्ट्रेट' ठरविते.

समलैंगिकता ही एखादी शारीरिक, मानसिक व्याधी, विकृती किंवा आजार नाही, असे 'अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशन' आणि 'जागतिक आरोग्य संघटने'ने केव्हाच जाहीर केले असले, तरी त्याबाबतचा सामाजिक दृष्टिकोन बनविण्यात त्यांना यश आले नाही. समलैंगिकतेकडे आता फक्त सामाजिकच नाही, तर मानसिक आणि जीवशास्त्रीय अंगांनेही बघितले जाते आहे. याविषयावर अनेक संशोधने करून संशोधकांनी समलिंगी म्हणजे होमोसेक्शुअल असणे हे विरुद्धलिंगी म्हणजे हेट्रोसेक्शुअल असण्याएवढेच नैसर्गिक आहे, हे सिद्ध केले असले, तरीही 'समलैंगिकतेचे फॅड' हे भारतीय संस्कृतीतील नाही, तर ते पाश्चात्य प्रवाहातून आले आहे, असे संस्कृतीरक्षकांचे म्हणणे आहे. भारतीय परंपरेच्या चित्रांमध्ये, शिल्पांमध्ये किंवा इतरही अनेक कलाकृतींमध्ये याचे अनेक पुरावे आढळतात. समलिंगी हे समाजाच्या एका विशिष्ट आणि वरच्या थरातील लोक असतात, ते काही ठराविक क्षेत्रांमध्येच आढळतात, असाही एक गैरसमज याबाबतीत रूढ आहे. समलिंगी हे कुठल्याही जातीत, धर्मात, वर्गात, समूहात किंवा वातावरणात असू शकतात. त्यांच्या लैंगिक कलाचा आणि सामाजिक भवतालाचा फारसा संबंध नसतो.

फक्त विरुद्धलिंगी आणि समलिंगी असे भेद करूनच विषय थांबत नाही, तर त्यातही सामाजिक व्यवस्थेचे चित्र डोकावते. पितृसत्तेच्या छत्राखाली असणाऱ्या भारतीय समाजात समलिंगी पुरुषांकडे (गे) आणि समलिंगी स्त्रियांकडे (लेस्बिअन) बघण्याचा दृष्टिकोन सारखा नाही. एकवेळ पुरुष असामान्य वागला, तर ते सहन होण्याच्या कक्षेत येते; पण मुलीने तिला ठरवून दिलेली कक्षा कुठल्याच परिस्थितीत ओलांडणे मान्य नसल्याने लेस्बिअन्सना मिळणारी वागणूक अधिक अपमानास्पद असते. मग बऱ्याचदा अशा लोकांना सामाजिक दबावामुळे किंवा भीतीमुळे विरुद्धलिंगी व्यक्तीशी लग्न करून घुसमटीला आमंत्रण द्यावे लागते. या घुसमटीवर तात्पुरता इलाज म्हणून विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. असुरक्षित संबंधांमुळे एचआयव्ही किंवा इतर लैंगिक आजार पसरण्याची भीती वाढते. सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा नादात आपण एका वेगळ्याच नकारात्मक प्रतलात फेकले जातो.

समलैंगिक लोकांमध्ये आपला लैंगिक कल हा इतरांसारखा नसल्याचे लक्षात आल्यानंतर, यात आपलीच काहीतरी चूक असल्याची अपराधी भावना जागी होते आणि यातून निराशेचे चक्र सुरू होते. मित्र-मैत्रिणींमध्ये सांगितल्यास हसे होईल का? आई-वडिलांना कळले, तर त्यांच्या प्रतिष्ठेचे काय होईल? आजूबाजूचे समूह मला वाळीत टाकतील का? असे अनेक प्रश्न या अस्वस्थतेला आणखी गडद करतात. यातून सुटण्यासाठी एकतर आपला लैंगिक कल विसरून समाज नियमांप्रमाणे विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला जातो किंवा आत्महत्या करून हा विषय संपवणे अनेकांना सोपे वाटते. हे दोन्ही मार्ग न निवडता आपण समलैंगिक आहोत, हे आधी स्वतः सन्मानाने स्वीकारून ते हळूहळू समाजासमोर आणण्यासाठीचा न संपणारा आणि भयानक अस्वस्थतेचा प्रवास सुरू होतो. आपण आहोत तसेच वागलो, तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, या भीतीपोटी अशा व्यक्ती एकाच वेळी स्वतःच्या दोन अगदी भिन्न प्रतिमा घेऊन आजूबाजूला वावरत असतात. या दोन्ही व्यक्तिमत्वामधील सतत सुरू असलेला संघर्ष किती अस्वस्थता त्यांच्या पदरात घालत असेल, याचा विचारही आपण करू शकत नाही. मित्र-मैत्रीण, आई-वडील किंवा इतर कुणाचाच आधार नसताना यांच्यासाठी एकमेव आधार असतो तो म्हणजे आपला जोडीदार. समलिंगी नात्यांमध्ये फारसे स्थैर्य नसल्यामुळे कधीही तो जोडीदार गमावण्याची भीती मानगुटीवर असते, ते वेगळे. अशा सगळ्या अंधाऱ्या वातावरणात आपल्या संबंधांविषयी जाहीर वाच्यता केल्यास तो गुन्हा ठरण्याची कायमस्वरूपी असणारी भीती, त्यांना स्वतःच्या कोषात आणखी ढकलते. गेल्या काही वर्षांपासून काही संस्था समलैंगिकांना एकत्र आणून चळवळ उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्ही सुद्धा समाजाचा, मुख्य प्रवाहाचा एक भाग आहोत, हे दाखवून देण्यासाठी आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढा उभारण्यासाठी अभिमान मोर्चा, म्हणजे प्राइड मार्च आयोजित करत आहेत. मोठमोठ्या शहरांमध्ये होणारे प्राइड मार्च आणि त्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होणारे एलजीबीटीक्यूआय समुदायातील लोक एका सर्वसमावेशक समाजव्यवस्थेची मागणी करत आहेत.

हा विषय बराच गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असला, तरी कुठलीही व्यक्ती समलिंगी किंवा विरुद्धलिंगी असण्याआधी ती माणूस आहे, हेच एक गृहितक मानून आपल्या श्रद्धा, समज, विचार आणि कायद्यांची पुनर्रचना केली पाहिजे. कायद्याने त्यांना त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतच; पण त्याचवेळी त्यांना आपल्या वर्तुळात सामावून घेण्याची तयारी आपणही दाखवली पाहिजे. भारतीय संस्कृतीला सहिष्णुतेचा मोठा इतिहास आहे. अनेक भिन्न प्रवाहांना एकत्र घेत ही गंगा पुढेच जाते आहे. हीच सहिष्णुता समलिंगी समुदायाबाबत दाखवणे, हे आपले आता एक सामाजिक कर्तव्य झाले आहे. समानतेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर आता या समुदायाचेही सप्तरंग उमटू देत हीच आशा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपणही चुकतो

$
0
0

पालक सहसा पटकन 'सॉरी' म्हणत नाहीत. मुलांकडून आपण त्याची त्वरित अपेक्षा करतो. माझा अनुभव तर असा आहे, की मी माझ्या मुलीकडून तिची चूक पूर्ण व्हायच्या आधीच सॉरीची अपेक्षा ठेवते आणि ती वेळेत पूर्ण न झाल्याने डाफरते.

केतकी वस्पटे

आपण पालक म्हणून वडिलधारे, आदरणीय, पूजनीय वगैरे आहोत हे खरे आहे. जगात इतर कोणी नाही केला, तरी आपल्या मुलांनी आपला आदर करायलाच पाहिजे, असे आपल्याला वाटते आणि काही मर्यादेपर्यंत ते रास्तही आहे. मनुष्य जन्म मिळणे मुळातच दुर्मिळ आणि त्यातही संस्कारी आर्इ-वडिलांचे छत्र मिळणे भाग्याचेच. आर्इ-वडिलांचा आदर करणे, हे मुलांचे कर्तव्य निश्चितच आहे. याशिवाय मुलांचे संगोपन करणे खूपच अवघड आहे. वेळोवेळी त्यांना न आवडणारे, न पचणारं आणि अपमान करणारे खूप काही बोलावे लागते. ते त्यांच्या चांगल्यासाठीच असते, हे आपल्याला माहिती असते. अनेकवेळा मुलांनाही काही काळाने ते पटते आणि ते त्याला आपला अपराध मानत नाहीत. विलक्षण म्हणजे पालकांच्या अशा रागवण्याचा मुले कधी रागही धरून बसत नाहीत. मनातून फक्त प्रेम करतात.

मुले लहान असताना आणि मोठे झाल्यावरही आपण पूजनीय आणि आदरणीयची झूल पांघरूनच बसतो. लहान वयात नक्कीच मुलांनी आर्इ-वडिलांना त्यांच्या चुका दाखवणे योग्य नाही. त्यांची ती कुठल्याही स्तरावर पात्रता नसते. म्हणूनच 'तू बोलत बसली आहेस बाबांशी, म्हणून आपल्याला उशीर होतो आहे. मी तर केव्हाची तयार आहे,' अशा मुलांच्या बालवयातील विधानाला 'तू मला अक्कल शिकवू नकोस,' असे प्रत्युत्तर देतो. हे उत्तर देताना 'मी चुकले आहे; पण तू उद्धटपणे मला हे सांगणे योग्य नाही,' ही जाणीवही करून देणे गरजेचे आहे. आपण खरेच चुकलेलो असतो आणि ते मुलांनी अगदी नेमके टिपलेले असते. लहान वयात आपण असे दटावून वेळ भागवून नेतो. मोठी झाल्यानंतर मुलेही आपल्यासारखीच मोठी माणसे असतात. शहाणी होतात. त्यामुळे वेळ पडली तर ती अधिक परखडपणे आपल्याला आपल्या चुका दाखवू शकतात. यासाठी आपण अगदी मुले लहान असल्यापासून मनाची तयारी केली पाहिजे. आपण जरी 'मातृ देवो भव' किंवा 'पितृ देवो भव'च्या संस्कृतीत जगत असलो, तरी साधी माणसेच असतो आणि माणूस म्हटले, की चुका आल्याच.

लहानपणी मुलांना आवडणार नाही आणि खोलवर दुखावेल असे बोलण्याला कधीकधी आपला इलाज नसतो. ते गरजेचेही असते; कारण लहान मुलांमध्ये अहंकार हा प्रचंड प्रमाणात फोफावलेला असतो. हे ऐकायला जरा विचित्र वाटते; पण लहान मुले ही इगो पर्सिनोफाइड किंवा मूर्तिमंत अहंकार असतात. म्हणूनच मनाविरुद्ध काहीही झालेले त्यांना चालत नाही. त्यांना वळण लावायची गरज असते आणि त्यामुळे इगो फाइट चालू होते. आपलाही अहंकार आपल्या ठिकाणी असतो.

मुले मोठी व्हायला लागली, की आपल्याला विविध प्रसंगांतून त्यांचे प्रगल्भ विचार समजत जातात आणि आपल्या चुकांचेही मूल्यमापन त्यांच्याकडून होणे साहजिकच. चाणक्याने म्हटल्याप्रमाणे सोळाव्या वर्षानंतर मुलांशी आपण मित्रासारखे वागायला पाहिजे. व्याघ्र किंवा वाघासारखे पाच ते पंधरामध्ये. अधूनमधून मुले मोठी झाल्यावरही आपण वाघ बनायची गरज पडू शकते; पण ती ही अगदी भाजीत मिठाइतकी. कधी मुलेही आपल्या बाबतीत वाघासारखी झाली, तर तेही आपल्या चांगल्यासाठीच आहे, हे आपण तेव्हाच समजू शकू, जेव्हा आपण त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करत असू. जशी ती आपल्यावर कोवळ्या वयापासून करत असतात आणि हे आपल्या चांगल्यासाठीच आपल्यावर चिडले आहेत, हे जेव्हा आपण समजू शकू तेव्हाच. आपण मुलांकडे केवळ 'अपमानकर्ता' म्हणून बघितले, तर आपण हे विसरत असू, की मुलांनीही आजवरच्या आयुष्यात आपण त्यांचे केलेले अनेक अपमान पोटात घालून आपल्यावर प्रेम केलेले आहे. अपमान हा अपमान असतो. मग तो सहा वर्षांच्या मुलाचा असो वा साठ वर्षांच्या. 'दिल में दर्द' सगळ्यांनाच होतो आणि त्याचे महत्त्व वयामुळे कमी जास्त होत नाही.

पालक सहसा पटकन 'सॉरी' म्हणत नाहीत. मुलांकडून आपण त्याची त्वरित अपेक्षा करतो. माझा अनुभव तर असा आहे, की मी माझ्या मुलीकडून तिची चूक पूर्ण व्हायच्या आधीच सॉरीची अपेक्षा ठेवते आणि ती वेळेत पूर्ण न झाल्याने डाफरते. तात्पर्य असे, आपली ही समजूत एकदम पक्की आहे, की चूक होते ती फक्त मुलांचीच आणि म्हणून सॉरी म्हणायचे फक्त त्यांनीच. आपले कधी काही खास चुकतच नाही. तोंडातून सॉरी निघालेच, तर ते एवढे वरवरचे असते, की ते म्हटले काय आणि नाही काय, एकच असते. प्रश्न फक्त सॉरी म्हणायचा नाही, तर सॉरी वाटण्याचा आहे. मुलांशी वागताना आपल्याही काही छोट्या आणि मोठ्या चुका होत असतात. काही अगदी अल्पावधीच्या, तर काही आजीवन परिणाम करणाऱ्या. काहींची आपल्याला जाणीव असते, तर काहींची नाही; पण कुठल्याही चुकांबद्दल सहसा आपण मुलांची माफी मागत नाही. 'मातृभक्त व्हा, पितृभक्त व्हा' असे मुले ऐकतात; पण 'माझे वागणे खूपच चुकले, मी खूप वार्इट वागले तुझ्याशी तुझी काहीच चूक नसताना,' असे मुलांना तुरळकच ऐकायला मिळते. मुले आपल्या तावडीत सापडल्यामुळेच त्यांना आपल्या चुकीची शिक्षा भोगावी लागते आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, तेव्हा आपल्याला मनातून अपराधी वाटेल. प्रकृतीने जरी आपल्याला माता-पिता म्हणून उदात्त पदवी दिलेली असली, तरी त्याची आपली पात्रता आहे की नाही, हा यक्षप्रश्न आहे. प्रत्येक 'देवो भव'चा विचार असलेल्या पालकाने स्वत:ला हा प्रश्न विचारला पाहिजे. हा विचार प्रामाणिकपणे केल्यास चुकांचे गाठोडे किंवा मोठा डोंगर तयार होर्इल आणि याबद्दल आपण मुलांपाशी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. हे करू शकलो तरच भविष्यात आपल्याला वळण लागेल. मुलांशी जपून वागण्याचे वळण. त्यांनाही वार्इट वाटते आणि आपणही घोडचुका करतो, या विचाराचे वळण. आपण मुलांची वेळोवेळी माफी मागणे काही पालकांना धोकादायक वाटू शकते. मुले यामुळे आपला आणखी अपमान करायला लागतील, आपल्याला मूर्ख समजतील, गृहित धरतील; पण तसे होत नाही. 'चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन' या म्हणीप्रमाणे मुलांमध्ये निरागसतेच्या जोडीला माफ करण्याची अमाप शक्ती असते. अनेकदा दुसरा कुठला राग काढत माझ्या चिमुकलीवर मी खसाखसा ओरडले आहे. जरा जाणती झाल्यावर उगाच वार्इट वाटेल, असेही अपमानकारक बोलले आहे. काही मिनिटांनी जाणवायचे, की हे काय केले आपण. मग तिच्यापाशी जाऊन माफी मागितल्यानंतर ती इतकी गोड हसून 'ओके' म्हणायची, की मला शरमल्यासारखे व्हायचे. ते बघून पुन्हा रडावेसे वाटायचे. कोणाचे मन मोठे आहे? माझे की तिचे?

या एका सॉरीने झाले तर फक्त चांगलेच होर्इल. 'आपण वार्इट नाही', 'आर्इ इतर कारणांमुळे चुकून असे बोलली,' हे मुलांना आपल्या चुकांसाठी आपणच समजावू शकतो. आजीवन परिणाम करणाऱ्या चुकांसाठी, तर ही माफी एक संजीवनी ठरू शकते. मुले आपल्या चुकांचे परिणाम भोगत असतील आणि स्वत:लाच दोष देत असतील, तर आपल्या चुकीमुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागतो आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचविले पाहिजे. तसे केल्यास ते एका पाशातून मोकळे होतील आणि 'माझी चूक नव्हती' म्हणून नव्या उमेदिने जीवनाकडे बघतील. या कबुलीजबाबासाठी आपल्यावर प्रेमच करतील; कारण कितीही चुकलो, काहीही झाले तरी मुलांसाठी त्यांचे आर्इबाबा महानच असतात आणि माफी मागून स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करणारे, आर्इ-बाबा कोणाला नको आहेत.

(लेखिका होमस्कूलिंग करतात.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिनेही पंख पसरावे...

$
0
0

गरोदरपण, मग आनंदसोहळे, बाळंतपण आणि एक गोड जबाबदारी. हवीहवीशी वाटणारी. तुम्हाला नवे जगणे शिकविणारी. भरभरून तिचा आनंद घेतला, की आई आणि बाळ या दोघांनीही थोडे स्वतंत्र होण्याची सवय लावून घ्यायला हवी. त्याने मूलही इतर माणसांमध्ये रमते आणि त्या आईला पुन्हा एकदा तिच्या पिलाला पंखाखाली घेऊन घराबाहेरची एक भरारी मारण्यासाठी मोकळे अवकाश मिळून जाते. आपणच ही पंख पसरण्याची संधी आपल्याला योग्यवेळीच द्यायला हवी.

ऊर्मिला कानेटकर- कोठारे

आई होणे ही एक खूप सुंदर गोष्ट आहे, अगदी शब्दांमध्ये वर्णन न करता येणारी. मुलांचे करताना कुठलीही स्त्री तिचे सर्वस्व विसरून जाते. या काळात आईपणाशिवाय तिला इतर कशातच रस राहात नाही. आपण त्यात गुंतून जातो. हे होणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक अशी वेळ येते, मुले मोठी होतात आणि मग स्वतंत्रपणे काही त्यांचे पंख पसरू लागतात. हीच वेळ असते तिच्या आयुष्यात पोकळी येण्याची. तिच्यावर घरच्या अनेक जबाबदाऱ्या असतात आणि ती त्या पेलत राहते. म्हणूनच तिने स्वतःचे अस्तित्त्व जपण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. म्हणूनच तिने योग्यवेळी बाहेर पडले पाहिजे आणि आपले पंख पसरले पाहिजेत.

मला असे वाटते, की प्रत्येक बाईने जशी घराची आणि मुलाप्रतीची जबाबदारी कुणीही न सांगता रोजच्या दैनंदिनीत अंगीकारलेली असते, तशीच तिने स्वतःची ओळख जपण्यासाठी काहीतरी करत राहिले पाहिजे. त्यातून तिचा आत्मविश्वास टिकून राहतो. घरातील जबाबदाऱ्या आणि त्या लहान जिवासाठी सगळे काही आपण करू शकतो. यात घरातली सपोर्ट सिस्टिम आणि तुमच्या जोडीदाराचे तुमच्यासह असणे आवश्यक असते. करिअरचा विचार मनात असतो. माझ्या मनातही पुन्हा काम सुरू करायची इच्छा डोकावू लागली, तेव्हा कुठलाही ताण आला नाही. याचे कारण एकत्र कुटुंब. ही व्यवस्था आणि आपले नातेसंबंध, ही मला वाटते आपल्या संस्कृतीने दिलेली सर्वोत्तम भेट आहे. या व्यवस्थेमुळे, या नात्यांमुळे प्रत्येक घरातील सुनेला किंवा आई झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर घराबाहेर पडता येते. बाळाचे आजी-आजोबा असतात आणि त्यामुळे तुम्ही निर्धास्त असता. ज्यांच्याकडे आजी-आजोबा नसतात त्यांनाही काही काळाने घराबाहेर पडावे लागते किंवा बाळ सांभाळण्याची वेगळी व्यवस्था करावी लागते. मी स्वतःला याचसाठी नशीबवान समजते, की माझे एकत्र कुटुंब असल्याने खूप मोठी सपोर्ट सिस्टिम माझ्यासाठी उभी राहिली. त्यांच्यावर जिजाला सोपवून मी बिनधास्त कामासाठी बाहेर जाऊ शकते. काम असो, माझा नृत्याचा सराव असो, या सपोर्टशिवाय ते शक्य नाही.

येथे मला पुन्हा हा मुद्दा विस्ताराने मांडावा वाटतो. माझे कुटुंब खूप मोठे आहे. आम्ही दहाजण एकत्र राहतो. या कुटुंबात आमच्यासाठी काम करणारी माणसेही सामावलेली आहेत; त्यामुळे जिजाला कोण सांभाळणार, हा प्रश्नच मला पडला नाही. एवढी माणसे असल्याने ती खूप लहान वयातच खूप जास्त सोशल झाली आहे. तिला माणसांची एवढी सवय झाली आहे, की माणसे पाहिल्यावर ती आजिबात गांगरून जात नाही. तिला फक्त तिच्या आई-बाबांना पाहायची सवय नाही, तर इतर माणसांबरोबरही ती तेवढीच रमते. येथे एक गोष्ट आवर्जून सांगते, ती अशी की मुलांनीही स्वतंत्र व्हावे, त्यांना माणसांची सवय व्हावी यासाठी आईने योग्यवेळी घराबाहेर पडणे आवश्यक आहे. त्यामुळे मुले अगदीच आईचे शेपूट होऊन राहत नाहीत. वेळीच असे न केल्यास आई आणि मूल दोघेही स्वतंत्र होऊ शकत नाहीत.

बाहेरच्या जगात पाहिले, तर या क्षेत्रातल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणीही उत्तम सुविधा उपलब्ध केल्या जातात. तिचे मूल तेथे रमेल, तिलाही सतत आपल्या अपत्याला भेटता येईल, यासाठी या सुविधा पुरविल्या जातात. खरे सांगायचे, तर मी अद्याप मोठा सिनेमा स्वीकारलेला नाही; पण मी घराबाहेर पडायला सुरुवात केली आहे. आमचे प्रॉडक्शन हाउस आहे, त्याकडे मी लक्ष देते, ऑफिसमध्ये जाते. नव्याने माझ्या करिअरकडे वळता यावे, यासाठी मी फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देते आहे आणि त्याचा मला फायदा होणार आहे. मी सगळ्यांना सांगेन या फेजमध्ये फिटनेसकडेही लक्ष द्यायला हवे. आपल्या सभोवती अशी अनेक उदाहरणे आहेत. घरचे, अपत्याचे तसेच जबाबदाऱ्या आणि कामाचा तोल साधण्यासाठी तुम्ही मल्टीटास्किंग करण्याची गरज आहे. आपण बाळात खूपच गुंतून जातो आणि दुसरे काही करावे असे वाटत नाही. येथे आपण स्वतःच स्वतःला बळ देणे गरजेचे असते. तुला बाहेर पडायचे आहे, हे स्वतःला बजावणे गरजेचे असते. वेळेचे व्यवस्थित नियोजन केले, तर इच्छा तेथे मार्ग, या उक्तीनुसार सगळे काही मनासारखे होते.

माझा अनुभव तुम्हा सर्वांना सांगायचा आहे. पालक होणे ही खूप सुंदर गोष्ट आहे. दोघांकडून बाळाला वेळ दिला जातो. यात सध्या आदिनाथची खूपच ओढाताण होते आहे. त्याच्या 'पाणी' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन आणि संकलनावर तो सध्या काम करतो आहे. हा सिनेमा फेस्टिव्हलला पाठवायचा आहे; त्यामुळे शूटिंगसाठी त्याने जेवढी धावपळ केली, तेवढीच तो आता पोस्ट प्रॉडक्शनसाठी करतो आहे. यात जिजाला आणि मला त्याचा खूप कमी वेळ मिळतो; मात्र त्यातूनही तो आमच्यासाठी हवा तेव्हा उपलब्ध असतोच. कधी सकाळी, कधी संध्याकाळी, तर कधी जिजा जागी असेल तोपर्यंत तो येण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लेकीची कौतुकाची गोष्ट म्हणजे, माझे जे पॅशन आहे, ते नृत्य आणि संगीत तिलाही खूप आवडते. तिच्या त्यात रमण्यामुळेच मला सरावासाठी खूप वेळ मिळतो. सराव सुरू होतो, तेव्हा जिजा माझ्यासोबत असते. माझ्यासह ती क्लासला येते. बाळंतपणात माझे सिझर झाले, तरीही सहाव्या दिवशी मी क्लासला जायला लागले. महिन्याभरातच मी तिलाही क्लासला नेत होते. माझी लेकही माझ्यासाठी खूप सपोर्टिव्ह आहे. संगीत-नृत्य सुरू असताना ती छान रमून जाते. लेकीने लहान वयातच आपल्या आईला दिलेला हा पाठिंबा मला पुन्हा पुन्हा उमेद देतो. त्यामुळेच मी पुन्हा नृत्याकडे एवढ्या लवकर वळू शकले. पुन्हा एकदा हेच सांगू इच्छिते, आपली सपोर्ट सिस्टिम आपणच उभी करू शकतो, घराबाहेर पडून पंख पसरण्यासाठी ती आपल्याला बळ देत राहते. माझे कुटुंब भक्कमपणे माझ्या पाठिशी उभे आहे, तसेच ते तुम्हालाही मिळो, यासाठी खूप खूप शुभेच्छा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपलंच व्याकरण, आपलंच चॅनेल

$
0
0

ऑनलाइन विश्वात मराठीचा प्रचार करणारी अनेक मंडळी कार्यरत आहेत. माटुंग्याच्या अश्विनी मानेनं मात्र मराठी व्याकरणाला आपलंसं करत 'मस्त मराठी कट्टा' या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपला नवा प्रवास सुरू केलाय.

००००

प्रथमेश राणे, आरएडीएव्ही कॉलेज

मराठी विषय म्हटला की पहिली भीती वाटते ती मराठीतल्या व्याकरणाची. पण आपल्या भाषेच्या या समृद्ध व्याकरणाला थोडं सोप्या पद्धतीनं सर्वांसमोर आणलं तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनातली व्याकरणाची भीती आपोआप दूर होईल. त्यामुळे मराठीचा प्रचार करताना म्हणी, सुविचार, वाक्यप्रचार यांचा उत्तमरीत्या वापर करता येईल हे पटल्यावर मराठीजनांचा उगाचच 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' होतोय की काय याची अश्विनीला जाणीव झाली. आणि 'हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्या'पेक्षा मराठी भाषेच्या याच व्याकरण श्रीमंतीचा प्रसारासाठी वापर करायचं तिनं ठरवलं आणि साकार झाला 'मस्त मराठी कट्टा'!

अश्विनीनं मराठीतून एमए केलंय. सध्या ती रुईया कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. आपल्या या नव्या चॅनेलबद्दल बोलताना अश्विनी सांगते की, 'या चॅनेलवर मराठी भाषेची वैशिष्ट्यं सांगणारे व्हिडिओज प्रामुख्याने पाहायला मिळणार आहेत. खरं तर शुद्धलेखन ही साधी गोष्ट आहे, पण मी अनेकदा बघते की विद्यार्थी ऱ्हस्व, दीर्घ, वेलांटी, मात्रा अशा अनेक गोष्टी विसरलेत. त्यामुळे यावर काय करता येईल याचा मी विचार केला आणि 'मस्त मराठी कट्ट्या'ची कल्पना सुचली. त्यानंतर आयआयजी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीनं ही कल्पना आम्ही प्रत्यक्षात आणली'. यापुढे चॅनेलवर प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे याबद्दल 'मुंटा'ला सांगताना ती म्हणते की, 'पहिला व्हिडिओ 'म्हणी, वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ' या विषयाशी निगडित होता. यापुढे मात्र अनेक लोकसंवाद, शुद्धलेखन आणि मराठी संबंधित अनेक व्हिडिओज लोकांना पाहायला मिळतील. त्याचसोबत आम्ही अनेक तरुण प्रतिभावंतांना मुलाखतीच्या निमित्तानं व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. कारण अनेकदा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं, पण असेही अनेक तरुण आहेत ज्यांची कामं खरंच कौतुकास्पद आहेत. त्यामुळे अशा मराठमोळ्या तरुणांच्या कामाला प्रसिद्धी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल'. त्याचसोबत एखाद्या प्रस्थापित विषयासंबंधी त्या क्षेत्रातील यशस्वी तरुणांच्या मुलाखती घेऊन आम्हाला त्यातूनही काहीतरी नवं तरुणाईला देता येईल याकडे आम्ही विशेष लक्ष देणार असल्याचंही तिनं सांगितलं.

००००

सध्या युट्यूबवर कॉमेडी, धागडधिंगा असणाऱ्या व्हिडिओजना जास्त मागणी आहे. अशा वातावरणात हा प्रयोग करणं हे खरंच आव्हानात्मक आहे. जास्तीत जास्त माहितीपूर्ण व्हिडिओ प्रेक्षकांना कसे पाहता येतील यावर माझं लक्ष असणार आहे.

- अश्विनी माने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० मिनिटं, ५० नाद

$
0
0

एका मिनिटांत एका वाद्याची झलक दाखवणं तसं कठीणच काम. मात्र ५० मिनिटांत ५० वेगवेगळ्या गोष्टींमधून नादनिर्मिती करुन योगिता तांबे या अंध विद्यार्थिनीनं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. तिच्या या संपूर्ण प्रवासाविषयी...

००००

रामेश्वर जगदाळे, एमडी कॉलेज

गणेशोत्सव, गुढीपाडवा, नवरात्र उत्सवादरम्यान आपल्याला पारंपरिक वाद्यांची आठवण होते. या मंगल प्रसंगी वाजवण्यात येणारी ढोल-ताशा, नगारा, मंजिरी, खंजिरी यासारखी पारंपरिक वाद्य काळाच्या पडद्या आड जातील की काय अशी भीती काही दिग्गज मंडळी व्यक्त करतात. पण हीच वाद्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योगिता तांबे ही अंध विद्यार्थिनी प्रयत्नशील आहे. एवढंच नाही तर योगितानं ५० मिनिटांत ५० वेगवेगळ्या गोष्टींमधून नादनिर्मिती करुन नवा रेकॉर्ड रचला आहे. याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.

योगिताला लहानपणापासून टेबल, ताट वाट्या यापासून नादनिर्मिती करण्याची आवड होती. ही आवड तिच्या आजी-आजोबांनी हेरली आणि तिला तबल्याच्या शिकवणीला घातलं. श्री. कमला मेहता या अंध शाळेत शालेय शिक्षण पूर्ण करता-करता तिला वाद्य वाजवण्याची कला तिनं जोपासली. त्यानंतर रुईया कॉलेजमधून बीए करत असताना तिनं युथ फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी तिची दिमडी, नगारा, हलगी यासारख्या वाद्यांशी ओळख झाली. शारदा संगीत विद्यालयातून तिनं तबल्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डविषयी योगिता सांगते की,'यासाठी मला अनेक कलाकार मंडळींनी मदत केली. ज्येष्ठ संगीत संयोजक उज्ज्वल उर्फ अप्पा वढावकर यांनी मार्गदर्शन केलं. वाद्यांची जुळवा जुळव करून त्याची क्रमवारी करून त्याचं सादरीकरण केलं. या संपूर्ण प्रवासात आई-वडील, कमला मेहता हायस्कूलमधील मंडळी, गणेश चंदनशिवे सर, विजय चव्हाण या सगळ्यांनी मला मोलाची साथ दिली'. २०१२ सालापासून योगिता जोगेश्वरीतील अस्मिता विद्यालयात वाद्यशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. संगीत क्षेत्रातील अनोख्या कामगिरीबद्दल २०१६ साली राष्ट्रपतींतर्फे दिव्यांग दिनानिमित्त 'सर्वोत्तम क्रियात्मक दिव्यांग वयस्क' या पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे २००६ साली नाटकाला संगीत दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठातर्फे नटवर्य शंकर घाणेकर हा पुरस्कार तिला देण्यात आला. सध्या योगिता तबल्याचं पुढील शिक्षण पंडित कालिनाथ मिश्रा यांच्याकडे घेतेय. परिस्थितीमुळे कला जोपासू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसंच पारंपरिक वाद्यांचा प्रसार करण्यासाठी भविष्यात काम करायचं आहं, असं योगितानं मुंटाशी बोलताना सांगितलं.

योगिताने वाजवलेली वाद्य

तबला, ढोलकी, नगारा, दिमडी, हलगी, ढोलक, नाशिक ढोल, ताशा, डमरू, संबळ, टाळ, मंजिरी, खंजिरी, झांज, चिपळ्या, बगलबच्चा, लेझीम, पखवाज, पिपाणी, हार्मोनियम, डफ, तुणतुणा, तुतारी ही वाद्य वाजवून तिनं नादनिर्मिती केली आहे. याशिवाय ताम्हण, कलश, नारळ, ताट-चमचा, घंटा, छोटी घंटा, शंख, खुळखुळा, सूप, चाबूक, घुंगरू, खलबत्ता, करवंटी, हंडा, शिट्टी या गोष्टींचाही योगितानं वापर केला आहे.

००००

डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या लोकांना सनई, बगलबच्चा, पिपाणी यांसारख्या वाद्यांचा विसर पडला आहे. असाच जर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर राहिला तर आपली लोककला आणि वाद्यं एक दिवस इतिहास जमा होतील, यात काही शंका नाही. ही लोककला आपणच जपली पाहिजे.

- योगिता तांबे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यसंगीतातील दुहि'तारा'

$
0
0

दोन वर्षं युथ गाजवल्यानंतर दंगल ग्रुपच्या निमित्तानं तिनं महाष्ट्रभर नाव कमवलं. आता पुढचा प्रवास एकटीनं करत 'सुर सम्राज्ञी' बनण्यासोबत नाट्यसंगीतात आपला ठसा उमटवण्याचं तिचं स्वप्न आहे. ही गोष्ट आहे पोदार कॉलेजच्या दुहिता कुणकवळेकर हिची. तिच्या या सांगीतिक प्रवासाविषयी...

००००

प्रथमेश राणे, आरएडीएव्ही कॉलेज

घरातल्या तीन पिढ्या आधीच संगीत क्षेत्राशी निगडीत असल्यानं साहजिकच लहानपणीच दुहिताला संगीताचं बाळकडू मिळत गेलं. आजोबा शास्त्रीय गायक तर बाबा तबलावादक, त्यामुळे घरातून सुरू झालेली आपली ही संगीत उपासना आपलं करिअर म्हणून निवडायचं असं दुहितानं ठरवलं. त्याच दृष्टीनं भविष्यात सूरसम्राज्ञी होण्याकडे तिचा प्रवास सुरू झालाय. त्यात नाट्यसंगीत हा दुहिताचा जवळचा विषय असल्यानं भविष्यात याच क्षेत्राकडे एक संधी म्हणून पाहायचं तिनं ठरवलंय.

दुहिता सध्या माटुंग्याच्या पोदार कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकतेय. संगीताचं प्राथमिक शिक्षण तिनं वडील हर्षवर्धन कुणकवळेकर यांच्याकडे घेतलं तर शास्त्रीय संगीताचं शिक्षण डॉ. रसिका फडके यांच्याकडे चालू आहे. भविष्यात यशस्वी पार्श्वगायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं असलं तरी नाट्यसंगीत क्षेत्रात काहीतरी भरीव योगदान द्यावं या हेतूनं तिनं हल्लीच गुरू मकरंद कुंडले यांच्याकडे नाट्यसंगीताचं शिक्षण घेण्यास सुरुवात केलीय. अलिकडेच एका प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये दुहिताची निवड झालीय. ऑडिशनमध्ये तिच्या गायकीचं इतकं कौतुक झालं की, तिनं अंतिम तीन स्पर्धकांमध्ये दिसावं अशी इच्छा परीक्षकांनी व्यक्त केली. याआधी तिनं दहिसर ऑयडॉलसारख्या अनेक स्थानिक स्पर्धा गाजवल्या आहेतच. मागील दोन वर्षं दुहिता मुंबई विद्यापीठाचं मानाचं 'युथ फेस्टिवल' तसंच आंतरविद्यापीठीय स्पर्धाही गाजवतेय. यामध्ये २०१६ साली लाइट व्होकल विभागात कॉलेजसाठी कांस्यपदक तर राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठासाठी सुवर्णपदक, २०१७ साली लाइट व्होकल रौप्यपदक तर नाट्यसंगीतात सुवर्णपदक अशा अनेक पदकांचा समावेश आहे.

या प्रवासाबद्दल 'मुंटा'शी बोलताना दुहिता सांगते की, 'माझे नाट्यसंगीताचे अनेक कार्यक्रम चालूच असतात. कॉलेजमध्ये युथच्या निमित्तानं रविदास कोलथळकर यांच्याशी ओळख झाली. पुढे 'दंगल गर्ल्स' या ग्रुपमधून 'संगीत सम्राट' या शोमध्ये रनरअप ठरलो. यंदा सोलो ऑडिशन द्यायचं ठरवलं आणि या स्पर्धेच्य पुढील फेरीसाठी निवड झाली'. भविष्यात काय करायचं ठरवलं आहेस याबद्दल बोलताना ती सांगते की, 'भविष्यात पार्श्वगायिका होण्याची इच्छा असली तरी नाट्यसंगीतात करिअर करायला नक्कीच आवडेल. आज अनेक संगीत नाटकं रंगभूमी गाजवत आहेत. शिक्षण सुरू आहे, स्वतःमध्ये सुधारणा करत पुढचा प्रवास चालू ठेवायचाय', असं दुहिता सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६७ हजार मिनिटं, १९ हजार प्रेक्षक

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

तरुणाईच्या नाट्यगुणांना एकांकिका स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. उत्साही, जल्लोषपूर्ण वातावरणात वेगवेगळ्या विषयांवरील एकांकिका सादर होतात. हल्लीच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात एकांकिका स्पर्धाही ऑनलाइन झाली तर? हाच वेगळा विचार करून थेट युट्यूबवर एकांकिका सादर करत त्या जगभर पोहोचवणारी 'ई नाट्यशोध' ही एकांकिका स्पर्धा नुकतीच पार पडली. 'अस्तित्व' आणि 'मुंबई थिएटर गाईड' या संस्थांनी थेट ऑनलाइन एकांकिका स्पर्धा घेत जगभरातल्या नाट्यप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणलं.

इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती अशा एकूण चार भाषांतल्या एकांकिकांना स्पर्धेत संधी मिळाली. स्पर्धेच्या नियमांनुसार तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या २४ पैकी ९ एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. जगभरातल्या तेरा देशांतील एकोणीस हजार चोखंदळ प्रेक्षक आणि आतापर्यंत ६७ हजार ८६० मिनिटं या एकांकिका ऑनलाईन पाहिल्या गेल्या. 'ई-नाट्यशोध' या स्पर्धेवर मराठी एकांकिकांनी यंदा वर्चस्व राखलं. 'स्वामी नाट्यागण डोंबिवली'च्या राजेश शिंदेलिखित-दिग्दर्शित 'अडम-तडम' ही मराठी एकांकिका विजेती ठरली. तर डॉ. चंद्रशेखर फणसळकरलिखित श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शित 'अॅनेस्थेशिया' ही एकांकिका उपविजेती ठरली. एकांकिकांचं सादरीकरण जपून ठेवता यावं तसंच पुढच्या पिढ्यांनाही ते पाहता यावं यासाठी त्याचे दस्तऐवजीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही अनोखी स्पर्धा रावबत असल्याचं आयोजक रवी मिश्रा यांनी 'मुंटा'ला सांगितलं. स्पर्धेचा विशेष परीक्षक पुरस्कार 'थिएटर कॉपरेटीव्ह बंगळूर'च्या मनोज मित्रालिखित, श्रीनिवास बेसेटीदिग्दर्शित हिंदी एकांकिका 'पंछी'ला, तर समीक्षकांचा पुरस्कार 'कृपा शैक्षणिक सामाजिक संस्था नाशिक'च्या 'देहासक्त'ला मिळाला.

या एकांकिकाwww.mumbaitheatreguide.com/enatyashodh या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

एकांकिका - व्ह्यूअर्स

माणसं - २२१२

अडम:तडम - १४८७

ती, ते आणि - २४७८

पंछी - १४६९

पिघलते रिश्ते - २२७

ड्रीम कम ट्रू - २३३०

देहासक्त - ३७२६

जिना उसी का है - १५७८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेटवा भेटवा मज श्रीरंग

$
0
0

स्त्री-पुरुष असण्याच्या शारीर पातळीवरील मर्यादा असतात; पण जाणिवांच्या मर्यादा ओलांडण्याची अमोघ शक्ती मनुष्य प्राण्यापाशीच असते. वारकरी संप्रदायातील संतांनी जाणिवेच्या स्तरावर स्त्रीत्व जाणून घेतले. स्त्रीत्वातील शरीरापलीकडील आंतरिक भाव सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, समर्पणातील असीम शांतता अनुभवण्यासाठी विराण्या रचल्या.

प्रा. रूपाली शिंदे

विठोबाच्या भक्तांना देव हा आपल्यासारखाच एक माणूस आहे, याची जाणीव सगुणभक्तीतून झाली. त्याचे सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे विठोबा त्याच्या भक्तांच्या जगण्याचा श्वास आणि ध्यास झाला. विठोबाला भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी, पाहण्यासाठी, त्याला आपल्यामध्ये मुरवून टाकण्यासाठी, त्याचे रूप आत्मसात करण्यासाठी संत भक्तांनी अभंग रचले. विठोबाला समजून घेण्याचा, त्याचा सहवास मिळविण्याचा अभंग हा एक संवाद होता. विठोबाला आत्मसात करताना माता-माऊली, सखा, बंधू, पिता म्हणून त्याच्याबरोबर सलगी करत संवाद साधणारे अभंग वारकरी संप्रदायातील संतांनी रचले. या संवादात देवाचे देवत्व, कोप होण्याची भीती आणि कृपा करण्याचा, प्रसन्न होण्याचा मोह यांना मूठमाती देऊन निरपेक्ष प्रेमाचे मानवी नाते निर्माण करण्याचा प्रयत्न ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबांनी केला. मुक्ताई, जनाई, बहिणाबाई आदी स्त्रियांनी भक्तीला प्रेमनिष्ठेचे, भावबळाचे रूप दिले. त्यामुळे देवाचे देवत्व संपले आणि देवाचे माणूस असणे सिद्ध झाले.

देवाला देवपणाशिवाय मनुष्यरूपात पाहणाऱ्या संतांनी स्वत:ला त्याची प्रेयसी, पत्नी मानले आणि विठोबा आपला पती, प्रियकर आहे अशा नव्या नात्याने संवाद साधला. प्रेयसीच्या भूमिकेत जाऊन प्रियकर ईश्वराशी, विठोबाशी सख्य जोडणाऱ्या अभंग रचनांपैकी एक रचना म्हणजे संतांच्या विराण्या. विराणी म्हणजे विरहगीत. भक्त-प्रेयसीने प्रियकर-ईश्वराचा विरह, वियोग साहताना होणारी वेदना आणि विरहानंतरच्या मीलनाचा आनंद व्यक्त करणारी रचना म्हणजे विरहिणी किंवा विराणी. ज्ञानोबा-तुकोबांनी, नामदेव-एकनाथांनी स्वत:ला विरहिणीच्या - स्त्री रूपात स्वत:ला का घातले असावे? विरही स्त्री होऊन देवाचे सख्यत्व आपण अनुभवले पाहिजे, असे या पुरुष भक्त रचनाकारांना का वाटले असेल? असा प्रश्न मनात येतो.

'पैल तो गे काऊ कोकताहे', 'घनु वाजे घुणगुणा', 'रात्र काळी घागर काळी' या संतांच्या विराण्या भावगीतरूपामुळे आपल्याला आजही आठवतात. एका विरहिणीत वनवासी श्रीकृष्णाने अचानक आलिंगन दिले असता मनाची झालेली अवस्था 'बोलेना बोलो देईना' अशी झाली, हे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. ईश्वररूप प्रियकराच्या विरहामुळे व्याकुळ झालेल्या भक्त प्रेयसीचा विरहदाह शमविण्यासाठी फुलांची शेज घालणे, शीतल चंदनाचा लेप लावण्याचे उपाय योजिले जातात; पण होते उलटेच. चंदनामुळे सर्वांग पोळते. सुमनांची शेज अग्नीसारखी दाहक वाटते; कारण मनातील विरहभाव प्रबळ, प्रभावी आहे.

रागावलेल्या, रुसलेल्या प्रियकर ईश्वराला नामदेव प्रश्न विचारतात,

आम्हावरी कारे धरियेला राग।

काय तुझे सांग आम्ही केले।।

या प्रश्नामध्ये प्रेमाचा अधिकार तर जाणवतोच; पण रागावलेल्या प्रियकराने मनातील राग विसरून आमची विरहव्यथा जाणून घ्यावी. आपल्या भक्त प्रेयसीला शांत करावे; कारण तिचे मन विरहाने तप्त झाले आहे.

कामाग्नीने आम्ही जळतो सकळ।

करावे शीतळ अधरामृते।।

एकनाथांनी विरहिणीचे मनोगत मांडले आहे,

युगायुगीं पीडिली विरहिणी।

नाठवी ध्यानीमनी चक्रपाणी।

म्हणोनी वियोगाची जाचणी।

या विरहिणीची विरह बाधा युगानुयुगाची आहे. तिच्या या मनबाधेला उतार पडण्यासाठी संतसंगाची भेट होणे हा उपाय लागू पडतो. दुसऱ्या एका विरहिणीमध्ये विरही प्रेयसी,

वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग।

सर्व सांडियेला मोह ममता संग।

जीवी जिवलग झाला अनंग।

भेटवा भेटवा मज श्रीरंग।

असा श्रीहरी भेटीसाठी धावा करणारी नाथांची विरहिणी उत्सुकता, आर्तता, अनिवार ओढ, समर्पणाची आस हे सगळे भाव व्यक्त करते. नाथांनी विरहातील भावसौंदर्य जाणून घेण्यासाठी स्वत:ला विरही भक्त स्त्रीच्या रूपात पाहिले आहे, वेधले आहे. विरहिणी, गौळणींची रचना करणारे एकनाथ, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ऋजुता, रसिकता, भाव आस्वादकता हे सारेच गुण मोठ्या नजाकतीने व्यक्त करतात.

ज्ञानेश्वरांच्या विराण्या संयत, अभिरुचीसंपन्न, रस आस्वादक, सौंदर्योत्सव मांडतात. शृंगारातील संयम आणि संवेदनशील बाव जोपासणारे मार्दव आणि माधुर्य त्यांच्या विराण्यांमध्ये आहे. हे सारे गुण व्यक्त करण्यासाठी, त्यातील समरसता आणि उत्कटता यांचा स्वत:लाच पुन:प्रत्यय, पुन्हा एकदा अनुभव घेण्यासाठी ज्ञानेश्वर विराण्यांची रचना करतात. या रचनांचे मूळ अमृतानुभवातील 'प्रियुच प्राणेश्वरी'पाशी आहे, हे विसरून चालणार नाही. वारकरी संप्रदायातील सर्व संत विरहाने व्याकुळ होऊन, भावनेच्या भरात विठोबाच्या हळव्या, भाववेड्या प्रेमापोटी विरही स्त्री झाले, असे म्हणता येत नाही.

स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे विसर्जन करून स्त्री मनाशी एकरूप होणारे संत, स्त्री-पुरुष समानता मानत होते. म्हणूनच शृंगारातील पुरुषाचे आक्रमक, सत्ताधीश रूप त्यांनी नाकारले आणि स्त्रीच्या समर्पणाच्या इच्छेशी, प्रेरणेशी हे पुरुष एकरूप झाले. स्त्री-पुरुष असण्याच्या शारीर पातळीवरील मर्यादा असतात; पण जाणिवांच्या मर्यादा ओलांडण्याची अमोघ शक्ती मनुष्य प्राण्यापाशीच असते. वारकरी संप्रदायातील संतांनी जाणिवेच्या स्तरावर स्त्रीत्व जाणून घेतले. स्त्रीत्वातील शरीरापलीकडील आंतरिक भाव सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, समर्पणातील असीम शांतता अनुभवण्यासाठी विराण्या रचल्या.

या विराण्यांना मधुरा भक्तीच्या रूपात पाहिले, तर त्यातून केवळ ईश्वर हाच एक 'पुरुष' आहे. बाकीचे सर्व जीव प्रकृती आहेत. प्रकृतीने पुरुषाशी तादात्म्य (एकरूप) पावून आनंदाचा भोग घेणे, असा 'भोगप्रधान' या शब्दाचा मर्यादित अर्थ व्यक्त होईल. मधुराभक्तीमध्ये विरहिणी आणि प्रियकर यांच्या असमानतेवर आधारित भोग्य-भोक्ता असे नाते ईश्वर आणि भक्तांमध्ये निर्माण होते. हे उपभोगप्रधान माधुर्य अनिर्बंध कामप्रेरणेकडे घेऊन जाते. मराठी संतांनी लिहिलेल्या विराण्यांमध्ये शृंगार लालसेतून पुन्हा भक्ती लालसाच निर्माण होते. शृंगाराचे विसर्जन न संपणाऱ्या आसक्तीमध्ये होत नाही. संतांच्या विराण्यांमधून समतेवर आधारीत समर्पणशीलता आणि समर्पित होण्यातून शरीर, मन, चित्ताला लाभणारी निवांत विश्रांतीच व्यक्त होते.

हे सारे समजण्यासाठी वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ गोरोबांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग जनाबाईने वर्णन केला आहे. तो अतिशय मार्मिक अभंग असा आहे,

दोन्हीकडे दोही जाया। मध्ये गोरोबाची शय्या।

गोरा निद्रिस्त असता। कपट करिती त्यांच्या कांता।

गोरोबाचे दोन्ही हात। आपुल्या हृदयावर ठेवित।

जागा झाला गोरा भक्त। जनी म्हणे त्या निद्रित।

या अभंगात जनाबाईने गोरोबांच्या दोन्ही निद्रित सहचारणींच्या निद्रेचा, झोपी जाण्याचा अर्थ कसा लावायचा, हे कोडे आपल्यासमोर टाकले आहे. येथे गोरोबांच्या सहचारिणींच्या मनात स्पर्श सुखाची ओढ जागी झाली आहे. गोरोबा मात्र झोपले आहेत. ते या साऱ्या बाबतीत अनभिज्ञ आहेत. जाणते नाहीत. त्या दोघींच्या मनातील ओढाळ स्पर्शाला भक्ताच्या शांत, विश्रांत मनाने जगणाऱ्या शरीराने अजाणता (झोपेत असल्याने) दिलेला जिवंत प्रतिसाद मात्र त्यांचे मन शांतविणारा आहे. त्यांना विश्रांती देणारा आहे.

गोरोबांच्या आयुष्यात घडलेला आणि जनाईने सांगितलेला हा प्रसंग आपल्याला थेट शिव-शक्तीच्या समावेशनाची आठवण करून देतो. ज्ञानेश्वरांनी,

जिये प्राणेश्वरीवीण। सीवीहि सिवपण।

थारो न शके ते आपण। सिवे घडली।

असे अमृतानुभवात सांगितले आहे. शिव-शक्ती हे एकमेकांमध्ये मिसळलेले दिसतात. ते एकमेकांवर अवलंबून राहणारे आहेत. शिव आणि शक्तीमधील 'स्व' हा मी आणि दुसरा अन्य असणे, अशी दुभंगलेली, दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागलेली आणि म्हणूनच एकमेकांकडे संशयाने पाहणारी दृष्टी नाही. शिव-शक्तीचा त्यांच्या तन्मय, एकरूप जाणीवेचा चैतन्यमय आविष्कार म्हणजे हे सर्व विश्व. हे विश्व म्हणजे आपणच आहोत, असे भान हळूहळू विकास पावतो. संतांच्या विराण्या या स्त्री आणि पुरुष यांच्या देहनिष्ठ मर्यादांचे जाणीवपूर्वक केलेले उल्लंघन आहे. देहनिष्ठेकडून आत्मनिष्ठेकडे आणि आत्मनिष्ठेकडून आत्ममुक्तीचा सदेह अनुभव व्यक्त करणाऱ्या या सुंदर कविता आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपरमॉम’चा संदेश...

$
0
0

केवळ दहा महिन्यांतील सेरेनाचा हा प्रवास फक्त पैसा आणि औषधोपचारांनी शक्य झालेला नाही. अमेरिकेतील अव्वल दर्जाच्या आरोग्यसेवांचा तिला लाभ मिळाला हे मान्य केले, तरी एवढ्या कमी कालावधीत दुर्दम्य इच्छाशक्ती, मनोनिग्रह आणि आत्मविश्वासाशिवाय विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचता येणे शक्य नाही, हे मान्यच करावे लागेल.

सारंग कुंटे

'मी जिंकले; पण सेरेना हरली नाही.'

या वर्षीच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धचे विजेतेपद पटकावणाऱ्या अँजेलिक कर्बरचे हे शब्द सेरेना विल्यम्स या नावाची महती सांगायला पुरेसे आहेत. गेली सुमारे दोन दशके सेरेना आणि व्हिनस या विल्यम्स भगिनींनी टेनिस जगतामध्ये स्वत:चा दबदबा कायम ठेवला आहे. आकडेवारीत सांगायचे, तर महिला एकेरीतील तब्बल २३ ग्रँड स्लॅम विजेतेपदे, एक डझनाहून अधिक दुहेरीतील विजेतेपदे आणि चार ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके, ही सेरेनाची आजवरची कामगिरी… टेनिसच नव्हे, तर जगातील कुठल्याही खेळाच्या सर्वोच्च स्तरावर अभिमानाने मिरवता येण्यासारखी. आजच्या क्षणाला सेरेना विल्यम्स टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू आहे; पण तिचे मोठेपण या आकडेवारीपुरतेच मर्यादित नाही. टेनिस कोर्ट, विजेतेपदे, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या सर्वांपलीकडे एक सेरेना विल्यम्स आहे. आता ती एक आई आहे. म्हणूनच मुलीला जन्म दिल्यानंतर दहा महिन्यांच्या आत एखादी महिला विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देते, त्यावेळी तिच्या जिद्दीला सलाम करावा लागतो.

'सुपरमम, सुपरह्युमन' या बिरुदांपेक्षा सेरेनाला एका 'आईने' विम्बल्डन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे अधिक महत्त्वाचं वाटले. 'मी सुपरमम, सुपरह्युमन वगैरे नाही. मी अजूनही सेरेना विल्यम्सच आहे. जगातील सर्व मातांनो मी तुमच्यासाठी खेळले…. मातृत्व ही एक जबाबदारी आहे, ओझे नाही, हे लक्षात घ्या,' सेरेनाचे हे शब्द जगभरातील; विशेषत: भारतातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरावेत. मूल आणि संसार सांभाळून व्यवसाय, नोकरी, कला, चित्रपट या क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाची शिखरे गाठणाऱ्या अनेक महिला आहेत. अगदी पोलिस, संरक्षण दले, रेल्वे, वाहतूक अशा शारीरिक दगदगीच्या क्षेत्रातही चार-सहा महिन्यांची मुले कडेवर घेऊन काम करणाऱ्या महिला आपण पाहतो. यातील अनेक जणी पर्याय नाही, म्हणूनच ही कामे करताना आढळतात. आवड अथवा छंद म्हणून काम कराल का, असे विचारले तर यातील अनेकींचे उत्तर नाही, असेच येते. त्या सर्वच मातांसाठी सेरेनाची ही कामगिरी एक नवे मानसिक बळ घेऊन येऊ शकते. मूल झाल्यानंतर त्यांच्यातच गुंतून न राहता स्वत:चे करिअर पूर्वीच्याच जोमाने करण्याचा नवा आदर्श सेरेनाने घालून दिला आहे.

जागतिक क्रीडा जगतातही मुलांना जन्म दिल्यानंतर खेळ सुरू ठेवून सर्वोच्च स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंची संख्या कमी आहे. क्रीडा क्षेत्रात हा ट्रेंड अलीकडच्या काळातला आहे, असे नाही. सुमारे १२५ वर्षांपूर्वी म्हणजे १८९४मध्ये ब्लांक हिलयार्डने बाळंतपणानंतर तीन वर्षांनी विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याची नोंद आहे. मार्गारेट कोर्ट, इव्होन गुलगाँग या दोघींनी सत्तरीच्या दशकात, तर किम क्लिस्टर्सने २००९, २०१० आणि २०११मध्ये 'आई' म्हणून ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. भारताची मेरी कोम, फॅनी ब्लँकर्स कोएन, अॅमी रॉड्रीग्ज, डारा टोरेस, सराह ब्राऊन, जेसिका एनिस हिल, कॅट्रिओना मॅथ्यू या खेळाडूंनीही मुले झाल्यानंतरही महिला खेळावर लक्ष केंद्रित करू शकतात आणि स्वत:ला प्रस्थापितही करू शकतात, हे दाखवून दिले. सर्वसामान्य महिलांप्रमाणे यातील प्रत्येकीलाच गर्भधारणेच्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. बाळाच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर करावे लागणारे पथ्यपाणी, औषधोपचार, शारीरिक-मानसिक-भावनिक कोंडमारा या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या आहेत. सेरेना या महिला खेळाडूंचाच वारसा पुढे चालवते आहे, यात शंका नाही; पण या महिला खेळाडूंपेक्षा अधिक वेदनादायी अनुभव सेरेनाच्या वाट्याला आला. त्यामुळेच बाळंतपणानंतर वर्षभरात पुन्हा पूर्वीच्या फॉर्ममध्ये पोहोचणारी सेरेना जगभरातील मातांसाठी आदर्श ठरू पाहते आहे.

बाळ पोटात असतानाच सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या; परंतु खेळाचा ताण येऊन प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे सेरेनाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, याची माहिती अनेकांना नाही. 'मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांतच सेरेनावर शस्त्रक्रिया करायची होती. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी मी तिचे चुंबन घेतले; कारण ती पुन्हा जिवंत बाहेर येईल की नाही, हे कोणालाच माहिती नव्हते…. तिचा जीव वाचावा, इतकीच प्रार्थना आम्ही करत होतो…. आज दहा महिन्यांनंतर ती विम्बल्डनच्या अंतिम फेरीत खेळते आहे,…' सेरेनाचा पती अॅलक्सिस ओहानियनची ही इन्स्टाग्राम पोस्ट. काळजी, घालमेल, प्रेम, कौतुक, अभिमान असे बरेच काही अगदी थोडक्या शब्दांत सांगून जाणारी. केवळ दहा महिन्यांतील सेरेनाचा हा प्रवास फक्त पैसा आणि औषधोपचारांनी शक्य झालेला नाही. अमेरिकेतील अव्वल दर्जाच्या आरोग्यसेवांचा तिला लाभ मिळाला हे मान्य केले, तरी एवढ्या कमी कालावधीत दुर्दम्य इच्छाशक्ती, मनोनिग्रह आणि आत्मविश्वासाशिवाय विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचता येणे शक्य नाही, हे मान्यच करावे लागेल. आपण काय साध्य केले आहे, याची सेरेनालसुद्धा जाणीव आहे; पण ती इथेच थांबणार नाही. तिला आणखी पुढे जायचे आहे. टेनिस जगताने तिला यापूर्वी 'ऑल टाइम ग्रेट'चा किताब बहाल केला आहे. आता तिला खेळायचे आहे जगभरातील मातांसाठी आणि त्यांच्या हरवलेल्या आत्मविश्वासासाठी! विम्बल्डन स्पर्धेच्या निमित्ताने जगातील काही टक्के महिलांनी तिच्याकडून प्रेरणा घेतली, तरी सेरेनाचे कष्ट सार्थकी लागतील हे नक्की.

sharangdhar.kunte@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिजिटल वारकरी

$
0
0

डिजिटलच्या जमान्यात पंढरीची वारी, संपूर्ण भक्तिसोहळा डिजिटली अनुभवता आला तर? पवईच्या अक्षय भोसले या तरुण वारकऱ्यानं हा वसा घेतला आहे. त्यासाठी त्यानं व्हॉटसअॅप आणि एफबीवर 'अक्षयवारी' या उपक्रमाची सुरुवात करत डिजिटल वारी सुरू केलीय. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं, या युवा वारकऱ्याची ही भक्तिगाथा जाणून घ्या...

ज्ञानेश्वरी वेलणकर

अवघ्या महाराष्ट्राचा भक्तिसोहळा असलेल्या पंढरीच्या वारीत सहभागी व्हायची इच्छा असूनही, अनेकांना ते शक्य होत नाही. पण, वारीचा हा अनुभव तुम्हा-आम्हाला डिजिटली घेता यावा यासाठी पवईचा अक्षय भोसले हा तरुण वारकरी पुढे सरसावला आहे. वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून 'अक्षयवारी' या उपक्रमाची सुरुवात करत व्हॉट्सअप आणि फेसबुकद्वारे डिजिटल वारी सुरू करत ही भक्तिपरंपरा असंख्या भक्तांच्या मनामनांत पोहोचवली आहे.

मूळचा सताऱ्याचा असणारा अक्षय लहानपणीच मुंबईत स्थायिक झाला. लहानपणी बलोपासना केंद्रात त्याला हरिनामाची गोडी लागली. पुढे घणसोली इथे राहत असताना जवळच्या देवळात चाललेल्या कीर्तनाकडे तो आकर्षित झाला. त्यानंतर त्याच्या मनानंही विठूनामाचा ध्यास घेतला. इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करत असताना कॉलेजमध्ये तो मित्र-मैत्रिणींना संत साहित्याविषयी आणि विठ्ठल भक्तीविषयी सांगत असे. संत वाङ्मयाचा अभ्यास करताना त्यानं ब्लॉगच्या माध्यमातून त्याला उमगलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. मोबाइलचा उपयोग करून घेत आपल्या भक्तिपरंपरेची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी त्यानं 'वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र'ची स्थापना केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो संतांविषयीचे अनेक लेख, माहिती, सुभाषितं, ओव्या त्यांचे अर्थ लोकांपर्यंत पोहोचवत असतो. ब्लॉगव्यतिरिक्त व्हॉट्सअॅपवरूनही तो प्रबोधनाचं काम करतो.

तो आणि त्याची टीम प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होते. ते स्वत: चित्रीकरण करत अनेकांना विठ्ठलदर्शनाचं सुख मिळवून देतात. गेली सात वर्ष तो वारी करतोय. वारीमध्ये उत्तम मॅनेजमेंट पाहायला मिळतं. काहीसा खडतर असला, तरी पंढरीच्या वारीचा हा अनुभव भक्तांना स्वर्गसुख देणारा असतो. आजच्या तरुणाईनं हे अनुभवलं पाहिजे, असं अक्षयचं मत आहे. यंदा त्याची टीम 'व्यसनमुक्ती' या विषयाला हात घालून काम करत होती. वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. पण तरीही, नेटवर्क असलेल्या ठिकाणी ये-जा करत ही मंडळी आपली सोशलवारी अक्षरशः 'अभंग' ठेवत आहेत. अक्षय स्वत: उत्तम कीर्तनकारही आहे. अनेक वृत्तपत्र आणि मासिकांच्या माध्यमातून त्याचं लिखाणही सुरू असतं. वारकरी संप्रदायाचं मुखपत्र मासिक 'वैष्णव दर्शन'चा तो संपादक देखील आहे. पुण्याच्या एका सामाजिक संस्थेनं गेल्या वर्षी त्याला 'वारकरी रत्न' या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.

वारीचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा असं मला वाटतं. एका वारीतून आपल्याला जेवढं शिकायला मिळतं त्याची तुलना इतर कशाशी होऊच शकत नाही. खासकरून तरुणांनी यात सहभाग घ्यावा. हा एक संस्कार आहे आणि आयुष्याचं सोनं करायचं असेल तर हा संस्कार आवर्जून स्वतःवर करून घ्यावा.

अक्षय भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्माइल करा, खुश राहा!

$
0
0

मेघना अभ्यंकर, रुईया कॉलेज

'ए, आज कट्ट्यावर भेटूया सगळे', असं मित्रानं टाकताच त्यावर ठेंगा दाखवणारे इमोजी अगदी डझनभर पडतात आणि आपला होकार कळवतात. तर 'अरे भावा, राज्य स्तरीय स्पर्धा गाजवलीस तू!' असं एका मित्राचं कौतुक होताच नमस्कार करणारा इमोजी तर 'कडक सेल्फी' अशा एखाद्या कमेंटवर लाल बदामांच्या इमोजीची उधळण सोशल मीडियावर होत असते. आपलं म्हणणं मांडण्यासाठी ढीगभर शब्दांपेक्षा एखादा परिणामकारक इमोजी वापरण्यास तरुणाई प्राधान्य देते. याच धर्तीवर सर्वात जास्त वापरण्यात येणाऱ्या इमोजीची एक यादी ट्विटरनं नुकतीच प्रदर्शित केली आहे.

हसून-हसून डोळ्यातून पाणी काढणारा 'जॉय विथ स्माइल'चा हा इमोजी इतक्यांदा वापरला जातो की, २०१५ साली ऑक्सफर्ड डीक्शनरीमध्ये एक नवा शब्द म्हणून याची नोंद करण्यात आली. एखाद्याचा राग आला की लालबुंद चेहऱ्याचा स्माइली टाकला की, वाचणाऱ्यापर्यंत लगेचच आपल्या भावना पोहोचतात. मित्राची एखादी गोष्ट मनापासून आवडली की मिळणारे हार्ट्स, सध्या 'जस्ट कूल'चा जमाना असलेल्या तरूणाईला भावा किंवा ब्रो या शब्दांपेक्षा आपला कूलनेस व्यक्त करण्याकरता गॉगल घातलेला इमोजी अधिक जवळचा वाटतो. 'आग लगा देंगे' याचं शब्दशः वर्णन करणारा फायरचा इमोजी मनातल्या भावना पोहोचवतो. दुसऱ्यांकडे बोट दाखवणारा आणि आपली संमती सांगताना किंवा शक्यतो संवादाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा 'ओके' इमोजी आपण कित्येकदा वापरतो. या सगळ्या इमोजींचा ट्विटरनं जाहीर केलेल्या यादीत समावेश आहे.

ट्विटरनं जाहीर केलेल्या दहा इमोजीची यादी पुढीलप्रमाणे...

१. हसून हसून डोळ्यातून पाणी काढणारा

२. डोळ्यातून दिल फेकणारा

३. याहून अधिक काही नको सांगत नमस्कार म्हणणारा

४. लाजून लाल होणारा

५. प्रेम व्यक्त करणारे लाल बदाम

६. कूलनेसचा फंडा शिकवणारा

७. उत्साह आणि उमेद दाखवणारा

८. संमती दर्शवणारा

९. उजवीकडे बघा सांगणारा

१०. प्रेमाचा वर्षाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पबजी घालतोय धुमाकूळ

$
0
0

पबजी या गेमनं तुम्हालाही भुरळ घातलीय का? या मारधाडवाल्या गेमनं सध्या धुमाकूळ घातला आहे. तरुणाईला वेड लावणाऱ्या गेममध्ये असं आहे तरी काय?

शब्दुली कुलकर्णी

व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ नवीन नाही. सध्या पबजी नावाच्या मारधाडवाल्या गेमनं असाच धुमाकूळ घातला आहे. हा अॅक्शनपॅक्ड गेम खेळणाऱ्या तरुण मुलांचं प्रमाण वाढतंय. या गेममुळे मुलांच्या मनावर मात्र विपरित परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे.

पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या गेम्सनी काही दिवसांपूर्वी मुलांना वेड लावलं होतं. त्यात आता पबजीची भर पडली आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि अॅक्शनमुळे हा गेम सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. हा खेळ ग्रुप करुन खेळला जातो. गेम खेळण्याबरोबरच त्यात चॅटिंगही करता येतं. मुळात हा खेळ अठरा वर्षांवरील मुलांसाठीच आहे. पण, त्यापेक्षा कमी वयाची मुलंही हा गेम जास्त खेळत असल्याचं दिसून येतंय. या मारधाडीच्या खेळामुळे मुलांमध्ये आक्रमक स्वभाव वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे यावर अंकुश लावणं गरजेचं असल्याचं मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

परिणाम

- गेम खेळण्यासाठी रात्रीच्या वेळी जागरण केलं जातं. त्यामुळे साहजिकच आरोग्यावर परिणाम.

- अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं.

- आक्रमक स्वभावाला खतपाणी मिळतं

रात्रीच्या वेळी ऊत

पबजी हा गेम ग्रुप करुन खेळायचा आहे. त्यामुळे मित्र मंडळ एक वेळ ठरवून ऑनलाइन एकत्र येतात. साधारणत: रात्री ११ ते २ या वेळेत अनेकजण हा गेम खेळत असल्याचं निदर्शनास आलं आहे. रात्री आई-बाबांची नजर चुकवून किंवा ते झोपले आहेत याचा अंदाज घेऊन रात्री-अपरात्री हा गेम खेळण्याचं प्रमाण वाढतं आहे.

मुळात या अक्शनपॅक्ड खेळांचे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत असतात. या खेळांचा प्रभाव असाच वाढता राहिला तर पुढची पिढी भावनाहीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पबजी खेळाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्याचे परिणाम समोर येतायत. त्यामुळे पालकांनी याबाबतीत थोडं सजग राहणं गरजेचं आहे.

उन्मेष जोशी, समन्वयक, रिस्पॉन्सिबल नेटिझम

गेममध्ये असलेल्या मारधाडीचं अनुकरण खऱ्या आयुष्यातही करण्याची मानसिकता मुलांमध्ये तयार होते. हा गेम खेळण्याला वयोमर्यादा असली, तरीही ती पाळली जात नाही. गेम खेळताना कुठे थांबावं याचं भान नसतं. त्यामुळे या गेममध्ये ठराविक वेळेनंतर चेक पॉइंट असावं.

डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकोशी मैत्री तोडताना...

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

एखाद्याबरोबर असलेलं मैत्रीचं नातं तोडणं हे जणू ब्रेकअप समान असतं. ती कोणासाठीही ही गोष्ट सोपी नसते; कारण नातं तुटताना एकजण दुसऱ्यापेक्षा नक्कीच जास्त दुखावला जातो. मैत्री ही आयुष्यभर टिकते असं आपल्याला वाटत असतं; मात्र कधीकधी काही गोष्टी योग्य प्रकारे घडून येत नाहीत. मैत्रीमध्ये तुम्ही समोरच्याचा जास्त विचार करत असाल, कोणाचा अहंकार आड येत असेल, तुमचा वारंवार अपमान होत असेल किंवा मित्राच्या यशाचा तुम्हाला हेवा वाटत असेल, मैत्री तोडण्यामागे अशी अनेक कारणं असू शकतात. कारण काही असो, जर अशी मैत्री तुम्हाला तणावपूर्ण वाटत असेल, तर मन:शांतीसाठी तुम्हाला नात्याला पूर्णविराम द्यावा लागेल. कोणालाही नकारात्मक विचार प्रसृत करणारी मैत्री नको असते. खूप प्रयत्न करूनही तुमचं नातं टिकत नसेल, तर आनंदानं दूर जाणं हाच पर्याय आहे असं समजा. त्यासाठी काही पर्याय आजमावता येतील.

प्रत्यक्ष भेटून बोला- तुमची मैत्री खूप वर्षांपूर्वीची आहे; पण एकमेकांचा निरोप घेताना प्रत्यक्ष भेटा. तुम्ही एकत्र घालवलेल्या वर्षांना मान देत थोडासा वेळ काढलाच पाहिजे. अशी एखादी जागा शोधा तिथे तुम्ही मनातलं सगळं व्यक्त करू शकाल. अशा वेळी भावनाविवश व्हायला होतं, म्हणूनच ती जागा गर्दीपासून दूर असेल याची काळजी घ्या. हॉटेल्स ,रेस्तराँमधे कमी गर्दी असलेली वेळ निवडा.

भेटणं शक्य नसलं तर फोन करा- तुम्ही दोघं दूर असाल किंवा काही कारणास्तव भेटणं शक्य नसेल, तर फोन करून बोला. मोठे मेसेज करणं योग्य नाही. कितीही चांगला आणि मुद्देसुद मेसेज लिहिला, तरी तो संपूर्ण वाचला जाईलच याची शाश्वती नसते. पुन्हा त्यातून समोरचा नक्की काय अर्थ काढेल, हेही सांगता येत नाही. त्यापेक्षा एक वेळ ठरवा आणि चर्चा करा. तुम्हा दोघांना स्वतःची मतं व्यवस्थित मांडता येतील. आरोप, प्रत्यारोप होणार असतील, तर त्यावर उत्तरही देता येईल.

अबोला संपवू नका- तुम्ही दोघंही एकमेकांशी बऱ्याच काळापासून बोलत नसाल, तर तो अबोला संपवू नका. अबोल्यामुळे मैत्रीतून दूर जाणं सोपं होतं. तसं केल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत; पण हाच चांगला मार्ग होऊ शकतो. काही वर्षांनंतर तुम्ही त्या नात्यामधून बाहेर पडाल. आठवड्यातून तीनवेळा बोलत असाल, तर बोलणं हळूहळू कमी करा.

एकमेकांवर आरोप करू नका- मैत्री ही आनंदानं संपवायची असं तुम्ही एकदा ठरवलं, की शेवटच्या टप्प्यात एकमेकांवर आरोप करू नका. भूतकाळातील गोष्टी उकरून काढल्यामुळे मैत्रीचा शेवट काही वेगळाच ठरू शकतो. ज्या कारणांमुळे तुमचं जमलं नाही, त्यांवर चर्चा करा. समोरच्यापासून कारणं लपवू नका. त्यावर भाष्य करताना भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या.

आणखी एक संधी देऊन बघा- मित्र आणखी एक संधीची मागणी करत असेल, तर त्याचा एकदा विचार करा. तो खरोखर सकारात्मक असेल आणि नातं पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर एक संधी देऊन बघा. अशावेळी एखादी अडचण असल्यास, ती योग्य प्रकारे हाताळा. जुन्या मित्रांशी नव्यानं मैत्री करणं कठीण होऊ शकतं. ही मैत्री टिकेल याची काळजी घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाची धावाधाव गाजली

$
0
0

मेघना अभ्यंकर, रुईया कॉलेज

पोलिसांचं आयुष्य हे तसं धकाधकीचं. मुख्यमंत्र्यांच्या विशेष सुरक्षा पथकामध्ये काम करणारे पोलिस इन्स्पेक्टर सुनील लाहिगुडे यांनी मात्र या धकाधकीतही आपली धावण्याची आवड जपली आहे. अलीकडेच त्यांनी, दक्षिण आफ्रिकेमधली सर्वात जुनी आणि खडतर मॅरेथॉन अशी ओळख झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये धाव घेत कांस्य पदकाची कमाई केली. या मॅरेथॉनमध्ये केवळ सहभाग नोंदवण्यासाठी २१ किलोमीटर्सचं अंतर केवळ पाच तासांत पूर्ण करावं लागतं. लाहिगुडे यांनी सलग दोन वर्ष या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पिटरर्मरिट्सबर्ग ते दरबान हे ९० किलोमीटर्स अंतर दोनदा पार केलं. पोलीस खात्यातली नोकरी सांभाळत या स्पर्धेसाठी केलेल्या तयारीविषयी ते म्हणाले, की 'धावपटू होणं ही माझी आवड आहे. पण, त्यासाठी मी नोकरीमध्ये कोणतीही तडजोड केली नाही. सकाळी माझ्या घरापासून मी ते कफ परेडला मी पळत जायचो. ड्युटी संपल्यानंतरही घरी येताना धावण्याचा सराव करत यायचो. कामाव्यतिरिक्त असलेला सर्व वेळ मी शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी दिला. दर रविवारी वांद्रे ते मरिन ड्राईव्ह अशी २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन मी पळायचो. महिन्यातून एकदा सायकलवरून लोणावळा, म्हणजेच सुमारे ६० किलोमीटर प्रवास करायचो.' गडचिरोलीहून सुरू झालेला लाहीगुडेंचा सुरु झालेला प्रवास सातारा, सांगली, इस्लामपूर आणि आता मुंबईपर्यंत आला आहे. पोलिस खात्यात नोकरी करत असताना वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. २००६ साली मुंबई मॅरेथॉनमधील 'ड्रीम रन'मध्ये त्यांनी भाग घेतला. त्यानंतर सलग १२ वर्ष ते मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर्स धावण्यासाठी भाग घेत आहेत. मुंबईमध्ये विविध स्पर्धा करत असताना 'मुंबई रोड रनर्स' या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून त्यांना देशभरातल्या विविध स्पर्धांची माहिती मिळत गेली. हैद्राबाद, बंगळुरू, निलगिरी अल्ट्रा, लडाख अशा अनेक ठिकाणी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी यश संपादन केले. लांब अंतराच्या मॅरेथॉनसाठी सराव करताना सह्याद्री पर्वतरांगेतील जवळपास सर्व ट्रेक त्यांनी पूर्ण केले. २०१७ मध्ये त्यांनी 'कॉम्रेड्स मॅरेथॉन'मध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. जास्त अंतर, लहान-मोठ्या टेकड्या आणि अनेक अडथळे असणारी ही मॅरेथॉन सुनील यांनी १० तासांत पूर्ण केली. आता 'रन द रन', 'द हेल' या सारख्या जगभरातल्या अनेक अवघड मॅरेथॉन्समध्ये त्यांना भाग घ्यायचा आहे. त्यांची पत्नी स्मिता लाहीगुडे यासुद्धा आता मॅरेथॉन्समध्ये भाग घेतात.

पोलिसांच्या शारीरिक क्षमतेवर अनेकदा प्रश्न उठवले जातात. पोलीस देखील सक्षम असतात हे सिद्ध करण्याच्या उद्देशानं मी धावपट्टू होण्याचा निर्णय घेतला. आणि, माझ्या आवडीमुळे नोकरीमध्ये कोणतीही तडजोड न करता मला हे यश संपादन करता आलं.

सुनील लाहिगुडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 3450 articles
Browse latest View live