सणासुदीच्या या काळात एकमेकांना शुभेच्छा देण्याचं पेवच फुटलंय. पण प्रत्यक्ष भेटणं शक्य असतानाही कधीकधी आपण नुसत्याच ऑनलाइन शुभेच्छा देऊन मोकळे होतो.
आपल्या जन्मदिनाच्या दिवशी मित्र-मैत्रिणींनी पार्टीचा आग्रह धरत केलेलं 'विश', आनंदानं मारलेली मिठी, उत्स्फूर्तपणे केलेलं हस्तांदोलन, आजीनं मायेनं डोक्यावर ठेवलेला हात, आईनं केलेला आवडीचा मेन्यू... या सगळ्यांत वाढदिवस खरोखर 'स्पेशल' व्हायचा. हल्ली सोशल नेटवर्किंगच्या अलार्म आणि नोटिफिकेशनमुळे या शुभेच्छांच्या संख्येत भरमसाट वाढ नक्कीच झाली आहे. त्यातील आपुलकीची जागा कृत्रिमपणा आणि औपचारिकतेनं घेतल्याची खंत अनेक जण व्यक्त करत आहेत.
ज्याला आपल्याशी विशेष काही देणं-घेणं नाही, ज्याला आपण फारसे कधी भेटलो नाही, जो आपल्याला थोडेफारच ओळखतो, अशा व्यक्तीकडून चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळू लागल्यात. काही जणांना यात समाधान आणि आनंद मिळत असेलही. मात्र, बहुतांश लोक या आगंतुक आणि कोरड्या शुभेच्छांचा उबग आल्याचं सांगतात. यातून आणखी एक विरोधाभास दिसून येतो, तो म्हणजे एकीकडे व्यग्र वेळापत्रकाची सबब सांगणारी मंडळी सोशल मीडियावर मात्र शुभेच्छांचा पाऊस पाडतात.
औपचारिकता
बर्थ डे कॅलेंडरमुळे येणारी नोटिफिकेशन्स, फेसबुकवर आणि व्हॉट्स अॅपवर पडणाऱ्या पोस्टस, त्याला इतरांनी केलेले लाइक्स आणि दिलेल्या शुभेच्छा, या सगळ्यांत 'आपण शुभेच्छा देण्यात मागे पडू नये,' या विचारापोटी अनेक जणांकडून शुभेच्छा दिल्या जातात. व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर एखाद्यानं शुभेच्छा देणारी पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपवरील प्रत्येक सदस्याला तसं करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. एखाद्या सदस्यानं शुभेच्छा न दिल्यास 'ते बरं दिसत नाही', या विचारानंही मग 'विश' केलं जातंय. व्हॉट्स अॅपचा ग्रुप नसता, तर त्या व्यक्तीला त्या सगळ्यांनी फोन करून आवर्जून शुभेच्छा दिल्या नसत्या, असंही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे.
'प्रोफेशनल' संबंध
नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं तयार झालेले संबंध टिकवून ठेवणं आणि आणखी घट्ट करणं, हा सुद्धा 'विश' करण्यामागचा हेतू दिसतो. काही व्यावसायिक तर आपल्या क्लाएंटची तशी यादीच करून ठेवतात. बरोबर त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या पत्त्यावर किंवा कामाच्या ठिकाणी ग्रीटिंग पाठवण्याची यंत्रणाच ते राबवतात. यामुळे व्यावसायिक संबंध दृढ करण्याचं ते काम करतात. मात्र, ज्याला हे ग्रीटिंग्ज मिळतात, त्याच्या मनात 'यांचं नेटवर्किंग आणि मार्केटिंग चांगलं आहे,' एवढ्याच भावना येतात.
सोय पाहिली जाते
सदासर्वकाळ स्मार्ट फोन हाती असल्यामुळे त्यातील अपडेट्स पाहणं, आलेले एसएमएस, व्हॉट्स अॅप चॅट, ई-मेल चाळणं हे नित्याचंच झालं आहे. आलेल्या नोटिफिकेशननुसार लगेचच प्रतिक्रिया म्हणून तयार असलेल्या शुभेच्छा पुढच्या क्षणी पोस्ट केल्या जातात. ही सोय नसती, तर एरवी लक्षात ठेवून शुभेच्छा दिल्या गेल्या असत्या त्या का? हा प्रश्नच आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट