मुली कितीही शिकल्या सवरल्या तरी अजूनही अनेकींना प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याच्या परवानगीची गरज लागतेच का?
आज महिला ऑफिसमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत. भरमसाठ पगार कमावतात. पण तरीही अनेकींना लहानसहान गोष्टींसाठी नवऱ्याच्या 'परवानगी'ची गरज लागते. आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच रोजच्या दैनंदिन आवडीनिवडींनाही मुरड घालणाऱ्या अनेक जणी आहेत. उद्या हॉटेलमध्ये जाऊया का? किंवा पुढच्या महिन्यात पिकनिकला जाऊया का? या ऑफिसमधल्या मैत्रिणींच्या प्रश्नाला '...यांना विचारून बघते' हे उत्तर देणाऱ्या तुमच्या ऑफिसमध्ये किती आहेत?
आधी आईवडिलांच्या आज्ञेबरहुकूम वागणाऱ्या महिला मग लग्नानंतर पतीच्या आज्ञेत वागू लागतात. लग्नापूर्वी चांगलं वातावरणात वाढलेल्या म्हणजे माहेरी पुरेसं स्वातंत्र्य असलेल्या मुलीही लग्नानंतरही सहसा पतीच्या आज्ञेबाहेर जात नाहीत. कदाचित संसार टिकवण्यासाठी तडजोड ही स्त्रीनेच करायची असते, हे त्यांना मनोमन पटवलेलं असतं.
मुंबई विद्यापीठातील महिला विकास कक्षाच्या कार्याध्यक्ष क्रांती जेजुरीकरही महिलांवर अजून अशाप्रकारची बंधनं लादली जात असल्याचं मान्य करतात. 'केवळ अमूक करू नको असं नाही तर टीव्हीवरचं काय पहायचं आणि काय वाचायचं, हाही अट्टाहास अनेक पतींचा असतो. अनेकांना फक्त उच्चशिक्षीत आणि शोभेची बाहुली हवी असते,' असं त्या सांगतात.
अर्थात काही जणी मात्र ही बंधनं झुगारून देतात. एका मोठ्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या एचआरने मजेशीर किस्सा सांगितला. त्यांच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या एकीच्या सासरी स्लीव्हलेस आणि जीन्स चालत नाही म्हणून तिने लग्नानंतर तसे कपडे घालणं सोडून दिलं होतं. परिस्थिती आता बदलेल, नंतर बदलेल असं मनाशीच म्हणत तिने हा नियम पाळला खरा, पण अखेर 'ते काही बदलणार नाहीत', हे पुरेपूर ओळखून हळुहळू आवडीचे कपडे घालण्यास सुरुवात केली. आता तर ती घरी वनपीस घालणं आवडत नाही म्हणून चक्क ऑफिसमध्ये आल्यावर वनपीस घालते आणि जाताना तो बदलून घरी जाते.
अर्थात कुठलाही निर्णय घेताना आपण लग्नापूर्वी जसे आईवडिलांची परवानगी घेतो, तशीच नवऱ्याची मागितली तर बिघडलं कुठे? असंही काही जणी म्हणतील. पण प्रश्न फक्त परवानगीचा नाही. तुमच्या दोघांमध्ये नेमका कसा संवाद आहे, यावरून तुमच्यातल्या नातं जोखता येऊ शकतं. एखाद्या गोष्टीबद्दल नवऱ्याला किंवा आईवडिलांना विचारूच नका, अशातला भाग नाही. पण अमूक दिवशी तुमचा काही प्लॅन नाही ना? आम्ही पिकनिकला जाण्याचा किंवा हॉटेलला जाण्याचा विचार करतोय, अमूक ठिकाणी पैसे गुंतवले तर फायदा होईल का? तुला काय वाटतं? असे मनमोकळे संवाद तुम्हा दोघांमध्ये दोन्ही बाजूंकडून होत असतील, तर तुमच्यात निखळ संवाद होत आहेत आणि एकमेकांवर त्या नात्याचं दडपण नाही तर तुमच्यात छानशा मैत्रीच्या नात्याचे बंध आहेत, असं समजायला हरकत नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट