नाती सांभाळण्याविषयी आणि ती समृद्ध करण्याविषयी मुलांना सांगणं महत्त्वाचं असतं. नात्यांची शिकवण पालकांकडूनच पाल्यापर्यंत रूजत असते, हे लक्षात घ्यायला हवं.
अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आणि अडचणीच्या टप्प्यात त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका पालक छान पार पडतात. पण हे सल्ले बरेचदा करिअर, शिक्षणाविषयक असतात. या सगळ्यांत मुलांना नात्याविषयी मार्गदर्शन करणं राहून जातं. म्हणजे त्यात काय सांगायचं, असा अनेकांचा समज असतो. मात्र, करिअरमध्ये आणि एकूणच जीवनशैलीत कितीही यश गाठलं, तरी नाती सांभाळणं आणि नात्यांमध्ये यशस्वी होणं तितकंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याबाबत पालकांनी मुलांना काय सांगावं याविषयी...
पुढाकार घ्या - दोस्ती असो वा प्रेम. समोरचा आधी बोलेल, याची वाट पाहाण्यात अर्थ नाही. त्यामुळे नवं मैत्र जोडण्यासाठी स्वतःहून हात पुढे करण्याविषयी मुलांना सांगा. अशानं अपरिचित ठिकाणी, नव्या शाळेत, कॉलेजमध्ये रूळणं अवघड जाणार नाही. प्रेम व्यक्त करायच्या बाबतीतही हेच. त्याने किंवा तिनेच विचारावं, तो विचारेल, असा विचार करता करता अनेकांच्या आयुष्यातला तो मोलाचा क्षण निघून जातो. हे मुलांना समजून सांगा.
पुरेपूर प्रयत्न - नातं टिकवण्यासाठी आणि ते यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायला शिकवा. इथं अहंकार आड येता कामा नये. तुम्ही तुमच्या बाजूनं कमी पडता कामा नये, हे त्यांच्या मनावर बिंबवा. यामुळे नातं जरी तुटलंच, तर आपण काहीच प्रयत्न केले नाहीत याचा सल मनात राहणार नाही.
स्वत्त्व जपा - कुटुंब, मित्र-मैत्रिणी यांच्या घोळक्यात स्वत्त्व जपण्याविषयी मुलांना आवर्जून सांगा. अन्यथा एकमेकांचं अनुकरण करण्याच्या नादात स्वतःची ओळख पुसण्याची भीती असते. तसंच, आधी स्वतःचा आदर करायला मुलांना शिकवा.
ब्रेकअप होणारच - प्रेमाच्या नात्यात अनेक चढउतार येतात. ब्रेकअप्स होतात. पण दुःखद भावनांत स्वतःला हरवू नका, हे मुलांना समजवा. जे होतं ते चांगल्यासाठी हे सांगून सकारात्मकता टिकवा. याहीपलीकडे तुझ्या आयुष्यात अजून कुणीतरी चांगली खास व्यक्ती येणार आहे हे त्यांना पटवा. यामुळे भावनिकदृष्ट्या सावरण्यासाठी त्यांचं मन तयार होईल.
समजूतदारपणा - नात्यामध्ये समजूतदारपणा, तडजोड, जबाबदारी पाळणं सगळ्यांनाच करावं लागतं. जबाबदारी शेअर केल्यानं नातंही समृद्ध होतं हे पाल्याला समजवा.
नात्यातला जिवंतपणा जपा- नात्यात बांधिल राहणं खूप सुंदर असतं हे पाल्याला वेळीच कळू द्या. या शिकवणीमुळे त्यांचा नात्यावर विश्वास बसेल. विशेषतः लग्नाच्या. यासाठी आधी तुमचं आणि जोडीदाराचं नातं समृद्ध असलं पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट