दिवाळी पहाटची क्रेझ आजही कायम आहेच. डोंबिवलीचं गणपती मंदिर, पार्ल्यातलं पार्लेश्वर मंदिर, बोरिवलीतलं वझिऱ्याचं गणेशमंदिर ही ठिकाणं म्हणजे तरुणाईची आवडती ठिकाणं आहेत. पण आता अनेकांची जीवनशैली बदलली आहे. नाइट शिफ्टमध्ये काम करणारी मंडळी आहेत. रात्री उशिरापर्यंत नेटवर असणारी तरुणाई रात्री उशिरा झोपते. अशावेळी प्रत्येकालाच पहाटे उठणं, भेटीगाठी शक्य होत नाही. त्यामुळे दिवाळी पहाटेला जेवढी गर्दी होते तशीच गर्दी, भेटीगाठी हे कार्यक्रम संध्याकाळीही आखले जातायत.
थोडं निवांतपणे उठून, घरातलं सगळं आवरून झाल्यावर दुपारची उन्हं उतरली, की संध्याकाळी बाहेर पडण्याचे प्लॅन्स तयार झाले आहेत. दिवाळी पहाटएवढाच उत्साह संध्याकाळीही बघायला मिळणार आहे. संध्याकाळी कट्ट्यावर भेटून पुढे मित्रमंडळींच्या घरी जायचं, फराळावर ताव मारायचा असे प्लॅन्स आखले जातायत. दिवाळीच्या निमित्तानं संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचं ठरवलं जातंय. पुढे लंचच्या ऐवजी डिनरचे प्रोग्रामही आखले जातायत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट