Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

…म्हणून खचलो नाही

$
0
0

सुहास मुंगळे
आम्ही कसबा पेठेत झांबरे चावडी इथं राहात होतो. शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालय इथं झालं. १९६१- ६२ च्या दरम्यान मी इयत्ता आठवीत शिकत असताना वर्गात दिलीप चिंतामण घवी शिकायला आला. वामनमूर्ती, हुशार, शांत स्वभावाचा आणि अबोल असा हा विद्यार्थी. मीच त्याच्याशी ओळख काढली. तो कुठे राहातो वगैरे माहिती मि‍ळवली. कसबा पेठेतील मुजुमदार बोळात तो राहात होता. हळूहळू नुसत्या ओळखीचं रुपांतर घट्ट मैत्रीत झालं आणि कसबा गणपतीजवळ भेटून मी आणि तो एकत्र शाळेत जाऊ लागलो.
दिवाळीच्या सुमारास आमचं दोघांचंही एकमेकांच्या घरी जाणं- येणं वाढलं. त्याच्या घरी आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ असं कुटुंब होतं. माझ्या घरीही आई- वडील, दोन भाऊ असा परिवार. वर्ष केव्हा संपलं, दोघांनाही कळलं नाही. एसएससीच्या वेळी मात्र आमचे क्लास वेगळे होते. मग ठराविक वेळी एकत्र येऊन आम्ही एकत्र अभ्यास करायचो, चर्चा करायचो. या सर्व काळात त्याच्या नातेवाईकांशीसुद्धा परिचय झाला. त्यांच्याही घरी जाणं- येणं सुरू झालं. अनिल रोंधे हा आमच्या शाळेत होता. त्याच्याशी मैत्री झाली. तो आठ नंबरच्या मनपा शाळेजवळ राहायचा. मला दोन्हीही घरं जवळच असल्यानं आमचं कौटुंबिक वातावरण तयार झालं. दिलीपच्या घरी तर मी सतत असायचो. त्याच्या घराला माझंच घर समजायचो. एसएससीची परीक्षा दिली आणि आम्हाला मी उत्तीर्ण होणार, हा विश्वास होताच. अभ्यास नीट केला होता; पण हायर गणिताच पेपर जरा अवघड गेला होता. तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली. निकालाचा दिवस जाहीर झाला आणि नको तेच घडलं.
मला अपयश आलं. त्यामुळे खचलो. तेव्हा मला दिलीप, त्याची बहीण शैला आणि त्याच्या आईनं (आम्ही त्यांना ताई म्हणायचो) जो धीर दिला, तो आयुष्यात अतिशय महत्त्वाचा दिवस होता. कधीही न विसरता येणारा. माझ्या त्यावेळच्या मानसिक स्थितीचा विचार त्या तिघांनी केला. हे सर्व घडत असताना माझ्या आईनं फारच मोलाचा सल्ला दिला. धीर दिला. आता अजून जास्त जोमानं अभ्यास कर. म्हणजे परीक्षेत यश मिळेल. त्यावेळी उमजत नव्हतं; पण मोठी माणसं सांगतात, ते ऐकायचं, हे पक्कं असायचं. या दरम्यान दिलीप आणि शैला यांचंही सतत मार्गदर्शन असे. रोज काय अभ्यास केला, याची चौकशी करायचे. वेळप्रसंगी शैला मला बीजगणित शिकवायची. त्यातून जास्त छान कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले.
माझ्या आयुष्यात ज्या वेळी अपयशाचे प्रसंग आले, त्या प्रत्येक वेळी दिलीप आणि त्याचं कुटुंब भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं. घवींसह त्याच्या मावशा माई लवाटे, डी. पी. जोशी, रोंधे हे मला त्यांच्या कुटुंबातीलच समजायचे. दिलीपच्या लग्नाला तर आम्ही सगळे भोरला गेलो होतो. लग्न थाटामाटात केलं. माझ्या आई-वडिलांनाही मान दिला. त्याच्या घरी कुठंही कार्य असलं, की मी हजर असतोच. त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आमची ५५ वर्षांची मैत्री आजही मित्रत्वाची, बंधुत्वाची आहे. सुख-दुःखाच्या प्रसंगी आम्ही आजही एकमेकांना भेटतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>