प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक तसंच नकारात्मक घटना, बदल घडत असतात. हे बदल आयुष्याला नवं वळण देऊन जातात. हे बदल तुम्हाला खूप काही शिकवून जातात. असंच काहीसं घडलं ते डहाणूकर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या स्वप्नील सूर्यवंशीच्या आयुष्यातही घडलं.
सुखासुखी सुरू असलेल्या त्याच्या आयुष्यात अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. बीएएफची दुसरी सत्रांत परीक्षा सुरू असताना स्वप्नीलच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. घरातला थोरला मुलगा असल्यामुळे आई आणि लहान बहिणीची जबाबदारी स्वप्नीलवर पडली येऊन पडली. त्यानंतर पहिलं वर्ष साठवलेल्या कमाईत कसंबसं गेलं.
त्यानंतर बहिणीच्या कॉलेज प्रवेशाची फी भरायची होती. तसंच दुसऱ्या सत्रातील काही पेपर न दिल्यामुळे लागलेली केटी परीक्षेची फी अशा करणांमुळे पैशांची गरज भासू लागली. स्वप्नीलनं काहीतरी काम शोधून पैशांची व्यवस्था करायचं ठरवलं. त्यानुसार तो काम शोधू लागला. सध्या तो एका सुपर मार्केटमध्ये काम करतोय. कंपनीमध्ये आलेल्या मालाची तपासणी करणं आणि त्याची कम्प्युटरवर एन्ट्री करण्याचे काम तो करतो. अभ्यास सांभाळून, स्वतःची नोकरी करून तो आईला देखील घरकामात मदत करतो. सकाळी लवकर त्याचा दिवस सुरू होतो. नोकरीहून घरी आल्यावर वेळ मिळेल तसा अभ्यास तो करतो. यासाठी त्यानं वेळेचं योग्य नियोजन केलं आहे. काम आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून तो पुढे जातो आहे.
नोकरी करत अभ्यास करण्याची सवय नसल्यामुळे सुरुवातीला काम करणं खूप कठीण गेलं. पण नाईलाज होता. आता हळूहळू या गोष्टींची सवय होते आहे. मला माझ्या लहान बहिणीला खूप शिकवायचं आहे. दुःखाच्या काळात माणसांची ओळख होते. मला माझ्या काकांचा मोठा आधार आहे. अनेक बारीकसारीक खर्चांसाठी काका मदत करतात. पण आयुष्यात जिद्दीनं पुढे जायचं आहे, असं स्वप्नील सांगतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट