Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सुरक्षिततेला द्यावे प्राधान्य

$
0
0

अॅड. जाई वैद्य

मला १३ वर्षांचा मुलगा आणि १६ वर्षांची मुलगी आहे. माझा नवरा वकील असून लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा स्वभाव मारकुटा, वर्चस्व गाजविणारा आणि विचित्र आहे. घरातून रात्री-अपरात्री बाहेर काढणे, काठीने व बुटाने मारणे, खुर्ची डोक्यात घालण्यासाठी धावणे, या गोष्टी मी सहन करत आले आहे. चार वर्षांपासून त्यांचे कॉलेजच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध आहेत. ही मैत्रीण विवाहित असून तिला १४ वर्षांचा मुलगा आहे. तिच्याशी त्यांचे शरीरसंबंध आहेत. चार वर्षांपासून माझ्याशी शरीरसंबंध संपले आहेत. आठ महिन्यांपासून ते मला खर्चासाठी पैसे देत नाहीत. पैसे लपवून ठेवतात. मला व मुलीला मारहाण करतात. मी शिकलेली आहे; पण त्यांच्या वागण्याने आत्मविश्वास गमावून बसले आहे. मी पैसे कमावत नसल्याने मुलांसाठी हे सहन करत होते. मला त्यांना व त्यांच्या मैत्रिणीला धडा शिकवायचा आहे. त्यांच्यापासून वेगळे व्हायचे आहे. या विवाहबाह्य संबंधाचा माझ्याकडे पुरावा आहे. या पुराव्याच्या आधारे मला त्यांना कायद्यांतर्गत शिक्षा देता येईल का? विवाहबाह्य संबंधांविषयी कायद्यात काय तरतूद आहे? मी वेगळी झाल्यास मला पोटगी मिळेल का? ते वकील असल्याने मला काही अडचणी येतील का? एकमेकांच्या संमतीने, की कायद्याने वेगळे होणे शक्य होईल? मला कायद्याचे मार्गदर्शन हवे आहे.

उत्तर : तुमच्या प्रश्नातील उत्तराचे मुख्य भाग करून त्यावर बोलते. वैयक्तिक आयुष्यातील समस्यांकडे फक्त कायद्याच्या दृष्टिकोनातून बघून चालत नाही. त्याचा वास्तव, व्यावहारिक विचार तर करावा लागतोच; पण त्याशिवाय प्रत्येक व्यक्तीगणिक त्याच्या परिस्थितीचा, मानसिकतेचा विचार करून योग्य उत्तर शोधावे लागते. तुमचा प्रश्न हे याचे अतिशय समर्पक उदाहरण आहे. तुमच्या पतीच्या वर्चस्व गाजविणाऱ्या, मारकुट्या आणि विचित्र स्वभावापायी तुम्ही अतोनात शारीरिक व मानसिक छळ सहन करत आहात. त्याची झळ आता तुमच्या मुलांनाही पोहचते आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो. तुमचे राहते घर तुमच्या मालकीचे व तुमच्या नावावर आहे का? जरी नसले, तरी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याखाली अर्ज करून तुम्ही पतीला घरात प्रवेशबंदीचा हुकूम मागू शकता. जेणेकरून सर्वप्रथम तुमचा शारीरिक छळ थांबेल आणि मनाला थोडी शांतता मिळेल. याशिवाय त्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी इतरही अर्ज करता येतील. त्यानंतर तुम्हाला पतीपासून खरोखरच घटस्फोट घेऊन संपूर्णपणे नाते तोडायचे आहे, की केवळ विभक्त राहूनही पोटगी मागायची आहे, हा निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्यावा. तुम्ही घटस्फोट घेऊन लग्न मोडले, तर पुढे वारसाहक्काने पत्नी म्हणून मालमत्तेत मिळणाऱ्या अधिकारांवरही पाणी सोडावे लागेल. शिवाय तुमचे पतीही दुसरा विवाह करण्यास स्वतंत्र होतील; पण तरीही या विवाहबंधनातूनच मुक्त होऊन हे नाते संपवायचे की नाही, हा निर्णय सर्वस्वी तुमचा स्वत:चा असेल. तो तुमच्या भावना, सामाजिक परिस्थिती व व्यवहार यांची सांगड घालून तुम्ही घ्यावा, हे उत्तम. तुम्हाला घटस्फोट घ्यायचा नसला, तरी हिंदू दत्तकविधान व पोटगी कायदा १९५५च्या कलम १८ अंतर्गत तुमच्या पतीच्या व्याभिचाराचा ठोस पुरावा तुमच्याकडे असेल तर त्या आधारे, तसेच तुमचा व मुलांचा होणारा मानसिक व शरीरिक छळ या कारणांकरिता तुम्ही त्याच्यापासून विभक्त राहून पोटगी मागू शकता. तुम्ही व तुमची मुले अशा सर्वांसाठी एकाच अर्जातून पोटगी मागता येईल. याच कायद्यांतर्गत तुमची मुलगी आपल्या वडिलांकडून विवाहाचा खर्चही मागू शकते. हिंदू दत्तक विधान व पोटगी कायदा १९५५च्या कलम ३मध्ये पोटगीची व्यापक व्याख्या आपल्याला आढळते. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय इलाज व उपचार यांचा समावेश आहे. याशिवाय अविवाहित मुलीच्या लग्नाच्या विहित खर्चाचाही समावेश केला गेला आहे. कलम २३नुसार पोटगीची रक्कम ठरवताना न्यायालय अर्जदार व गैरअर्जदाराचे सामाजिक स्थान व स्थिती, अर्जदाराच्या योग्य गरजा, अर्जदार विभक्त राहत असेल तर विभक्तीचे कारण सयुक्तिक आहे किंवा नाही, अर्जदारास स्वत:चे काही उत्पन्न व मालमत्ता आहे का आणि पोटगीवर अवलंबून असणारी अर्जदारसंख्या या गोष्टी विचारात घेते. गैरअर्जदाराचे उत्पन्न, गरजा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, त्याची मालमत्ता या गोष्टीही विचारात घेतल्या जातात. बदलती परिस्थिती व गरजांनुासर पोटगीच्या रकमेतही बदल होऊ शकतो.

तुमच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाच्या कारणाखाली तुम्ही त्याच्याकडून फक्त घटस्फोटाची मागणी करू शकता. याव्यतिरिक्त त्याच्याविरुद्ध इतर कुठलाही दावा दाखल करता येणार नाही. तुमच्या पतीच्या मैत्रिणीविरुद्ध तुम्हाला कुठलाही दावा दाखल करता येणार नाही. याविषयी सध्या भरपूर चर्चा सुरू आहे; पण तुमच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तुम्ही सबळ पुराव्यासह सिद्ध करू शकलात, तर पोटगी, घटस्फोट, मुलांचा ताबा, राहत्या घरात तुम्हाला राहण्याची परवानगी आणि त्याला घरात राहण्यास वा त्या घराची विक्री, भेट वा अन्य मार्गाने वासलात लावण्याविरुद्ध मनाई हुकूम यासाठीचा तुमचा दावा बळकट होऊन यशाचा टक्का वाढेल, असे निश्चितच वाटते. त्यांना धडा शिकवणे हे तुमचे ध्येय न ठेवता तुमची, तुमच्या मुलांची शारीरिक व आर्थिक सुरक्षितता, डोक्यावरील छप्पर कायम ठेवणे आणि छळातून सुटका हे ध्येय असावे. न्यायालयात दावा चालवण्यात वेळ, पैसा, श्रम आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा परस्पर संमतीने अटी शर्ती ठरवून घटस्फोट घेणे केव्हाही उत्तमच. या अटी परस्पर संमतीने ठरत नसतील, एकांगी व अन्यायाकारक असतील, तर मात्र खटला भरून न्याय मिळवण्यास पर्याय राहत नाही. तुमचे पती वकील असल्याने तुम्हाला न्यायालयीन लढाई प्रदीर्घ काळ लढवावी लागेल. कदाचित एवढेच; पण या व्यतिरिक्त त्यांच्या वकील असण्याचा तुम्हाला तोटा किंवा त्यांना विशेष फायदा असण्याचे काही कारण नाही.

तुम्ही सुशिक्षित असूनही कधीही नोकरी न केल्याने तुमच्या पतीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होता. त्यामुळे तुम्ही तुमच्या दोन मुलांच्या भविष्यासाठी छळ सहन करत राहिलात. एवढेच नव्हे, तर स्वत:चा आत्मविश्वासही गमावलात, असे तुम्ही नमूद केले आहे. याचा खूप गांभीर्याने विचार करा व सर्वप्रथम शिक्षणाने तुम्हाला दिलेले ज्ञान, विचार आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करायचा निर्णय घ्या. तुमच्या दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन तुमच्या निर्णयाची, परिस्थितीची कल्पना द्या व एकत्रित प्रयत्न करा. तुमच्यावर ओढवलेली परिस्थिती तुमच्या मुलीवर ओढवू नये, यासाठी तिला मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करा. मुलाने तुमच्या पतीच्या वागण्याचे अनुकरण न करता, त्यातून जबाबदारीने वागण्याचा धडा घ्यावा, हे पाहा. कायद्याची लढाई लांबते, क्लिष्ट असू शकते; पण त्यासाठी योग्य तयारी केल्यास तुम्हाला कायद्याच्या माध्यमातून योग्य उत्तरेही मिळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>