Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

समृद्धी आणू घरी...

$
0
0

समृद्धी ही खर्चातून नव्हे, तर बचतीतून, गुंतवणुकीतून येते. दिवाळीच्या निमित्ताने आपण बरीच खरेदी करतो. खर्च करतो. तो करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले, तर पुढील आर्थिक नियोजन गाठणे शक्य होईल.

अशोक अलूरकर

दिवाळी म्हटले, की फटाके, फराळ, अभ्यंग स्नान, धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज अशा एक ना अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. सुगंधी उटणे, नवीन कपडे, सुट्टीत फिरायला जाणे, नवीन खेळणी, आवडत्या गोष्टी खरेदी करणे, मोठ्यांकडून शुभाशीर्वाद घेऊन भेट वस्तू मिळणे, या आठवणी लहानपणाकडे घेऊन जातात. छान पडलेली थंडी, नवीन कपडे घालून नातेवाइकांकडे जाणे, त्यांना आपल्याकडे बोलावणे, मित्रमंडळींना भेटणे, किल्ला बनवणे, असे अनेक बेत दिवाळीच्या महिनाभर आधीपासून सुरू होतात.

सण म्हटले, की घर आनंदाने भरून जाते. कुठले पदार्थ बनवायचे, कुठे फिरायला जायचे, याची चर्चा एव्हाना घराघरांत सुरू झाली असेल. सुट्टीचे हॉटेल, प्रवास आदीचे बुकींगही झाले असेल. दिवाळी हा सर्वांत मोठा सण समजला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याला वाहन, घर, सोने वगैरे खरेदी केली जाते. हल्ली कुठलीही गोष्ट घेताना सहज कर्ज उपलब्ध असते. तुम्ही फक्त मनात आणायची गरज असते आणि काही मिनिटांत किंवा काही दिवसांत कर्ज मंजूर होते. ही गोष्ट एवढी सहजगत्या साध्य होते, की जणू प्रत्येकाकडे एखादा देवदूत आहे, जो मनातील इच्छा त्वरित पूर्ण करतो, असे वाटू लागते. हा देवदूत हा मनातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो; मात्र तो त्या व्यक्त झालेल्या इच्छापुर्तीनंतर येणाऱ्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असतो. इच्छा पूर्ण झाल्यावर त्याचे होणारे परिणाम, याचा विचार प्रत्येक व्यक्तीने ज्याचा त्याचा करायचा असतो.

मिळणारे कर्ज हे आपल्या हातात असलेल्या एखाद्या साधनासारखे, एखाद्या शस्त्रासारखे असते. त्या साधनाला, शस्त्राला स्वतःचे मन असे काही नसते. आपण त्याचा उपयोग कसा करू, तसा तो होऊ शकतो. त्याच्या नंतरच्या परिणामांची जबाबदारी आपलीच असते. आपल्याकडे एक म्हण आहे, 'ऋण काढून सण करू नये.' याचा अर्थ, ऋण मिळते आहे, म्हणून त्यातून सण करणे, ही धोक्याची घंटा असते. अजून एक म्हण आपल्याला माहीत आहे. ती म्हणजे, 'अंथरूण पाहून पाय पसरणे.' याचा अर्थ, खर्च करताना आपल्याकडे असलेल्या पैशांचा अंदाज घेऊन, मग खर्च करावा. वेळेला पैसे लागल्यास ते उपलब्ध असावेत. हातातील सगळे पैसे खर्च करून टाकणे, मूर्खपणाचे ठरू शकते.

दिवाळीचा आनंद साजरा करायलाच हवा, त्यात काही शंका नाही; मात्र तो आनंद क्षणिक ठरून, पुढे त्याचा आपल्यालाच त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. बचत खात्यात, मुदत ठेवीमध्ये काही लाख रुपये आहेत; म्हणून त्यातील लाख खर्च करावेसे वाटणे साहजिकच आहे. त्यात काही वावगे नाही; मात्र हे सगळे करताना भविष्यातील महत्त्वाच्या गरजांचा विसर पडता कामा नये. असे झाल्यास ऐन वेळेस महत्त्वाच्या गरजेसाठी पुन्हा ऋण घेण्याची वेळ आली, तर कष्टाने मिळविलेल्या पैशांचा तो अनादर ठरेल. एवढे कष्ट करून जर ते पैसे महत्त्वाच्या वेळी हातात नसतील, तर ते कष्ट व्यर्थ ठरतील.

हे सगळे जरी खरे असले, तरी आयुष्य जगणे, आयुष्याचा आनंद घेणे, कमावलेल्या पैशांचा उपभोग घेणे हेही महत्त्वाचे आहे. पैशांचे नियोजन हे आपण एखाद्या सहलीला गेल्यावर करत असलेल्या नियोजना प्रमाणेच असते. आपण सहलीला जाताना गरजेपेक्षा जास्त पैसे जवळ ठेवतो. सगळे पैसे आपण एकदम, पहिल्याच दिवशी किंवा एकाच गोष्टीवर खर्च करत नाही. मनात येतील त्या सर्व गोष्टी घेणे, हे जरी आज खिशाला परवडणारे असले, तरी अशा खर्चामुळे भविष्यातील गरजेसाठी किंवा महत्त्वाच्या गोष्टीसाठी पैसे कमी पडल्यास वेळ निघून गेलेली असेल. त्यावेळी कर्ज घेऊन किंवा इतर गोष्टी बाजूला ठेवून पैसे उभे केले, तरी कुठेतरी चुकले आहे, हे नक्कीच लक्षात येईल. ही चूक दुरुस्त करता येईलच असे नाही; कारण पैशांचे सोंग घेता येत नाही. पैशांचे काम हे पैशानेच होते.

आयुष्य स्वच्छंदपणे जगणे चांगलेच आहे. आयुष्यात सगळ्या गोष्टींचा आनंद जरूर घ्यावा; मात्र थोडे भानावर राहून. असे केल्याने आपण वर्तमानातील गोष्टींचा आनंद घेऊ; शिवाय भविष्यासाठीची तरतूदही करू शकतो. दोन्हीतील समतोल साधता येणे अतिशय गरजेचे व महत्त्वाचे आहे. सणाची खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे. सूट मिळते आहे; म्हणून खरेदी करणे चुकीचे आहे. १०० रुपयांची गोष्ट केवळ १५ टक्के सूट मिळते आहे म्हणून खरेदी करणार असाल, तर ती वस्तू खरेदी न करता संपूर्ण १०० रुपयांची बचत करता येईल. एखादी वस्तू घ्यायच्या आधी, त्याचा आपल्याला किती उपयोग आहे, याचा विचार करा. उपयोग असेल, तर जरूर खरेदी करा. क्षणिक आनंदासाठी खरेदी करणे टाळावे. नाहीतर दीर्घ मुदतीनंतर येणाऱ्या ध्येयांसाठी पैसे पुरणार नाहीत. दुसऱ्या लोकांशी स्पर्धा करून वस्तू विकत घेऊ नका. असे केल्याने तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्याल. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही पैसे खर्च केलेत, तरी ते बाकीच्यांना कमीच वाटू शकतात. स्वतःच्या प्राधान्याप्रमाणे पैसे खर्च करा.

खरेदीला जाण्याआधी सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करा. एकूण खर्चाला मर्यादा घाला आणि त्याचे लहान लहान भाग करून खरेदी करा. सोबत खरेदीची यादी ठेवा आणि तेवढीच खरेदी करा. असे केल्यास तुम्ही नक्कीच समृद्ध होऊ शकता. ज्यांच्याकडे संपत्ती असते, ते श्रीमंत असतात. जे जास्त खर्च करतात, हे श्रीमंत नसतात. खर्च केल्याने संपत्ती कमी होते, वाढत नाही.

तुम्ही वरील सर्व किंवा त्यातील काही उपाय करून, या दिवाळीमध्ये खर्च नियंत्रणात ठेवू शकाल. दिवाळीच्या निमित्ताने एक चांगली सवय लावून घेता येईल. या महत्त्वाच्या सणाची सुरुवात नवीन गुंतवणूक करून, गुंतवणूक वाढवून करावी. असे केल्याने भविष्यातील अनेक वर्षे सुख-समाधानाची ठरतील. रोप लावून, त्याचे वृक्षात रूपांतर झाल्यावर त्याची फळे खायला मिळणे, यातील समाधान वेगळेच आहे. दर दिवाळीला सुरू केलेल्या नवीन गुंतवणुकीतून, भविष्यातील अनेक वर्षांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल, हे निश्चित. शिवाय पुढील पिढीला हा गुंतवणुकीचा वारसा देता आला, तर तुम्ही त्यांच्या भविष्याच्या चिंतेतून मोकळे व्हाल. पुढील पिढीला गुंतवणुकीचा राजमार्ग दाखवायचा, की खर्च करून समाजात ऐटीत मिरवणे शिकवायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे. पुढील पिढी आई-वडिलांचेच अनुकरण करते, हे लक्षात असू द्या. आपण करत असलेल्या कष्टाचे चीज व्हायचे असेल, तर ते केलेल्या गुंतवणुकीतूनच होईल, केलेल्या चुकीच्या व वायफळ खर्चाने नव्हे.

(लेखक नोंदणीकृत आर्थिक नियोजक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>