Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

गोष्ट कादंबिनीदेवींची

$
0
0

स्‍वाती दाढे

भारतावर 'ईस्ट इंडिया कंपनी'चे राज्य असताना जनतेची स्थिती दयनीय होती. स्त्रियांसाठी तर अधिकार व शिक्षण या अशक्‍यप्रायच. जाचक सामाजिक, धार्मिक बंधने, बालविवाह, सती, बहुपत्नीत्व इत्यादी परंपरागत रूढींखाली स्त्रिया पिचलेल्या होत्या. विवाह करणे, घर सांभाळणे, मुले जन्माला घालणे, त्यांचे संगोपन करणे हीच त्यांच्यासाठी इतिकर्तव्ये होती; परंतु या सगळ्याला एक कणखर स्त्री अपवाद ठरली. त्यांचे नाव कादंबिनी गांगुली. ही अशा एका स्त्रीची कहाणी आहे, जी परतंत्र भारतातील स्त्रियांच्या बंधमुक्ततेसाठी धडपडते, जाचक बंधने तोडते, चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभी राहून अनिष्ट रूढींचा त्याग करते आणि पुढच्या पिढीसाठी उन्नतीचा प्रशस्त, झगझगीत मार्ग तयार करून महिला डॉक्टर म्हणून नावलौकिकही मिळवते.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. दुर्दैवाने त्यांना वैद्यकीय प्रॅक्टिस म्हणजेच सराव करण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्याप्रमाणेच प्रखर बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत डॉ. कादंबिनीदेवी गांगुली यांनी हे साध्‍य केले आणि भारतीयांची वैद्यकीय सेवेची गरज पूर्ण केली. कादंबिनीदेवीसोबत मुंबईच्या डॉ. रख्माबाई राऊत यांचेही नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्या १८९४ मध्ये लंडनमधून डॉक्टर होऊन भारतात परतल्या आणि वैद्यकीय सेवा सुरू केली.

प. बंगालमधील भागलपूर येथे १८ जुलै १८६१ मध्‍ये जन्मलेल्या कादंबिनी बांगलादेशातील बरिसाल येथे वाढल्या. त्यांच्यावर वडील ब्रजकिशोर बसू यांचा खूप प्रभाव. ब्रजकिशोर हे ब्राह्मो समाजाचे निष्ठावंत अनुयायी आणि भागलपूर स्कूलचे हेडमास्तर. त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. तरुण कादंबिनीने 'बंग महिला विद्यालया'तून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता'ची प्रवेश परीक्षा दिली. ही परीक्षा देणारी आणि उत्तीर्ण होणारी ती पहिली महिला. हे साल होते, १८७८. त्या नंतर कादंबिनींनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले.

ही खबर कळताच उच्चभ्रू समाज त्यांना विरोध करू लागला. त्‍यांच्‍या चेष्टा, बदनामी, विखारी नजरांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. 'बंगवासी' पत्रिकेत कादंबिनींची हीन शब्दांत मानहानी करणारे व्यंगचित्रही प्रसिद्ध झाले. कादंबिनी आणि त्‍यांचे पती द्वारकानाथ गांगुली यांनी संपादक महेंद्रलाल पाल यांच्या विरोधात खटला दाखल केला. कोर्टानेही संपादक पाल यांना सहा महिने तुरुंगवास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा केली. एका महिलेच्या संदर्भातील या घटनेने लोक स्त्रियांबद्‍दल वेगळा विचार करू लागले. त्या वेळी 'कलकत्ता मेडिकल कॉलेज'मध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता; परंतु द्वारकानाथ गांगुली यांनी पत्नीच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले आणि १८८४ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजच्या त्या पहिल्या विद्यार्थिनी झाल्या.

ब्रिटीश सरकारने कादंबिनींना २० रुपये प्रति महिना शिष्‍यवृत्‍ती दिली; परंतु तेथील प्रोफेसर त्यांना शिकवायलाच तयार नव्‍हते. एका प्रोफेसरांनी कादंबिनींना एका पेपरमध्‍ये मुद्‍दाम नापास केले. त्‍यामुळे त्‍यांना एमबी डिग्री सर्टिफिकेट मिळाले नाही. मात्र, अभ्‍यासक्रम पूर्ण केल्‍यावर प्रिन्‍सिपाल डॉ. जे. एम. कोटस् यांनी त्‍यांना जीएमसीबी डिप्‍लोमाने गौरवले आणि डॉक्‍टर म्‍हणून खाजगी प्रॅक्‍टिस करण्‍यास परवानगी दिली.

१८८८ मध्‍ये कादंबिनीदेवी डॉक्‍टर म्‍हणून 'लेडी डफरिन हॉस्‍पिटल'मध्‍ये महिना ३०० रुपये वेतनावर हजर झाल्‍या. (म्‍हणजे आजचे ४.५ लाख रुपये) परंतु एम.बी.डिग्री नसल्‍याने ब्रिटीश लेडी डॉक्‍टरांनी त्‍यांना 'मिडवाइफ', 'सुईण' म्‍हणून हिणवत साफसफाईची कामे दिली. नंतर पतीच्‍या आग्रहानुसार पुढील शिक्षणासाठी, सर्व सामाजिक नियम धुडकावून ही बंगाली संसारी स्त्री १८९३ मध्‍ये इंग्‍लंडला गेली. अढळ इच्‍छाशक्‍ती, प्रखर बुद्धिमत्‍ता आणि पतीचा पाठिंबा या बळावर त्‍यांनी एडिंबरोच्‍या स्‍कॉटिश कॉलेजमध्‍ये 'ट्रिपल डिप्लोमा कोर्सेस इन मेडिकल सायसेन्स'साठी प्रवेश घेतला आणि द्रुतगतीने तीन महिन्‍यांत हा कोर्स पूर्ण केला. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या १४ विद्यार्थ्‍यांतील कादंबिनी या एकमेव महिला आणि अर्थातच पहिली भारतीय महिला! त्यांनी बालरोग आणि स्त्रीरोगशास्त्र यांतही पदविका मिळवल्या.

भारतात परतल्यावर त्यांना सीनियर डॉक्टर म्हणून 'लेडी डफरिन हॉस्पिटल'ने त्यांना स्वीकारले. त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिसही सुरू केली. या उच्चशिक्षित, नीडर डॉक्टरने रुग्णसेवेसाठी गावोगावी दौरे सुरू केले. रात्री बेरात्री घोडागाडीतून रोगी तपासायला त्या जात. त्यांना यश, प्रसिद्धी, पैसा मिळू लागला. त्या दरम्यान एका पुरुष डॉक्टरने एका स्त्रीच्या पोटात ट्युमर असल्याचे निदान केले. मात्र, कादंबिनींनी तिची संपूर्ण तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले आणि यथावकाश तिची सुरक्षित प्रसूतीही केली. या घटनेने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. १८९५ मध्ये त्यांनी नेपाळच्या राणीची वैद्‍यकीय अधिकारी ही जबाबदारी स्वीकारली आणि नेपाळच्या रॉयल फॅमिलीच्या डॉक्टर म्हणूनही त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

डॉक्टरकीबरोबर कादंबिनीदेवींनी सामाजिक, राजकीय कार्यात भाग घेतला. १८८९ मध्ये त्यांना 'इंडियन नॅशनल काँग्रेस'मध्ये प्रवेश देण्यात आला. १८९० मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाषण केले. १८९५ मध्ये त्यांनी काँग्रेस अधिवेशनात बंगालचे प्रतिनिधित्व केले. १९०६ मध्ये त्यांनी 'वुमन्स कॉन्फरन्स इन कलकत्ता'ची स्थापना केली.

आठ मुलांची आई असलेल्या कादंबिनीदेवींनी संसाराकडेही व्यवस्थित लक्ष दिले. व्यग्र वैद्‍यकीय चिकित्सक अशा त्‍यांच्‍या व्यक्तिमत्वात स्नेहशील, हौशी, प्रेमळ मनही होते. सुंदर आणि एकसारखी लेस विणण्यात त्या तरबेज होत्या. ज्या काळी महिला डॉक्टर परीकथा वाटत होती, त्या काळी कादंबिनींनी वैद्यकीय सेवा दिलीच; शिवाय आठ मुलांना वाढवून सामाजिक-राजकीय कार्यही केले.

डॉ. कादंबिनीदेवींबद्दल अमेरिकन इतिहासतज्ज्ञ डेव्हिड कोप्फ लिहितात, 'त्या काळातील सर्वांत सफल, श्रेष्ठ व स्वतंत्र ब्राह्मो स्त्री म्हणजे कादंबिनीदेवी. तत्कालीन स्त्रीची स्थिती पाहता, अनेक अडथळे पार करत स्वत:ला सिद्ध करण्याची त्यांची क्षमता ही प्रेरणेचा मूलस्त्रोतच म्हणावी लागेल.' त्‍यांची नात पुण्यलता लिहिते, 'आजी खूप प्रेमळ होती. तिच्या अभ्यासिकेला आम्ही मुले 'कंकालघर' म्हणायचो; कारण भिंतीवर एक मानवी सांगाडा सतत झुलत असे. कपाटात ग्रंथ, यंत्र, उपकरणं आणि कुठले कुठले नमुने ठेवलेल्या बाटल्या असत. ती जिथे असेल तिथे हास्य, गप्पागोष्टी यांनी वातावरण भारून जात असे. या प्रेमळ आजीचे नियमही फार कडक होते. घरातील कोणीही रात्री नऊनंतर घरी आले, तर त्याला जेवण मिळत नसे...!'

पंधरा वर्षांचे सहजीवन द्वारकानाथ आणि कादंबिनीदेवींना लाभले. द्वारकानाथांचा मृत्यू झाला, त्या दिवशी दुपारी कादंबिनीदेवींना एका बाळंतपणासाठी कॉल आला होता. त्याही स्थितीत आपली बॅग घेऊन त्या निघाल्या आणि क्रोधित नातेवाइकांना म्हणाल्या, 'जे गेले ते परत येणार नाहीत; पण जो नवा जीव येतोय, त्याला आणायला मला जायलाच हवे.!' कादंबिनीदेवींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता; पण त्याचा त्यांनी डॉक्टरी कामांवर परिणाम होऊ दिला नाही. ३ ऑक्टोबर १९२३ रोजी सकाळी डॉ. कादंबिनींनी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. त्याच दिवशी संध्याकाळी अतिश्रमाने त्‍यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्‍यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

स्त्रियांना प्रगतीचा, शिक्षणाचा, स्वावलंबनाचा मार्ग दाखवणाऱ्या कादंबिनीदेवींसारख्या अनेक स्त्रियांचे ऋण स्मरणात ठेवून महिला दिन सुफळ करूया...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>