Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कर्ती सवरती ती!

$
0
0

प्राजक्ता नागपुरे


'वधूच्या भावाने पुढे यावे...', असा गुरुजींचा आवाज येताच श्रावणीची बहीण पुढे झाली. श्रावणीला भाऊ नव्हता. एकच बहीण होती जिने श्रावणीला भावासारखं संरक्षण दिले होते. लग्नाच्या दिवशी भावाचा सगळा मानपान तिच्या बहिणीला मिळावा ही श्रावणीची इच्छा होती. पण मुळात लिंगभेद रुजलेल्या समाजाने, मुलींचं अस्तित्व केवळ शेजारी बसलेल्या नवऱ्याच्या हाताला हात लावण्यापुरतं ठेवणाऱ्या समाजाला श्रावणीच्या बहिणीला तिच्या भावाचा अर्थात मुलाचा दर्जा द्यायचा नव्हता. शेवटी भावाचा मान घेण्यासाठी श्रावणीच्या लांबच्या भावाला बोलवण्यात आले.

आज एकविसाव्या शतकात श्रावणीच्या घरच्यांसारखे अगदी सुशिक्षित लोकही समाजाची चौकट मोडीत काढू शकत नाहीत, तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी जो मुक्तीचा मार्ग तयार केला त्यावर चालायला आपण समाज म्हणून कमी पडत आहोत हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. धर्म, परंपरा आणि विवेक यांची योग्य सांगड म्हणजे संस्कृती. मात्र याचा विसर पडून कर्मकांडाच्या नादात संस्कृतीचा महत्त्वाचे अंग असलेल्या स्त्रियांना कमीपणा दिला जात असेल तर हा समाजाला लागलेला विटाळ आहे, हे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आजही अनेक घरांमध्ये स्त्रीला धार्मिक विधी, रीती-परंपरा यांच्या सोहळ्यात दुय्यम स्थान दिले जात असले, तरी अशीही काही घरे आहेत जी ही चौकट मोडू पाहत आहेत. राधाबाईंच्या पतीचे निधन झाल्यावर त्यांच्या मुलीचे कन्यादान करण्यासाठी दिराने घेतलेला पुढाकार नाकारत राधाबाईंनी एकटीने मुलीच्या लग्नाचे सारे धार्मिक सोपस्कार पार पाडले. धीराने, कष्टाने वाढवलेल्या एकुलत्या एका मुलीचे कन्यादान कोणा तिसऱ्याच्या हातून व्हावे हे राधाबाई आणि त्यांच्या मुलीलाही मान्य नव्हते. या वेगळ्या लग्नाचे कौतुक झाले, पण दबक्या आवाजातील चर्चाही होत्याच. बायको नसतांना नवऱ्याला कमरेला सुपारी लावून सर्व विधी करू देणारा समाज स्त्रियांबद्दलही हाच समजूतदारपणा दाखवू शकतो का?, असा प्रश्न समोर आल्यास उत्तर आजही नकारार्थी येते. मात्र त्यासाठी राधाबाईंसारख्या विचाराच्या स्त्रिया हिमतीने पुढे येण्याची गरज आहे. जोपर्यंत समाजाला नवीन वाटा, नवीन निर्णय यांची सवय लागत नाही तोपर्यंत अजूनही सुधारणेला वाव आहे.

सायली तिच्या वडिलांची अतिशय लाडकी लेक. वडील वारल्यावर त्यांचे अंतिम विधी करण्याची तिची इच्छा होती. घरात थोरला मुलगा असून वडिलांचे अंतिम संस्कार मुलीने करावे हे अनेक संकुचित मनांना पटणारे नव्हते. पण सायलीने आपला हट्ट सोडला नाही. भावाच्या पुढाकाराने तिने जमलेल्या नातेवाईकांना समजावले. अंतिम विधींच्या वेळी सायली पुढे झाली. एक महिला विधी करणार म्हंटल्यावर गुरुजी काहीसे संभ्रमात पडले, पण तेही क्षणभरच. दुसऱ्या क्षणापासून त्यांनी बदललेल्या विधीच्या अनुषंगाने सूचना द्यायला सुरुवात केली. आपल्या पित्याचे सारे अंतिम सोपस्कार आपल्या हातून होणार याचं सायलीला समाधान वाटलं. अग्निडाग देणाऱ्या, पिंडदान करणाऱ्या लेकी समाज हळूहळू का होईना स्वीकारतो आहे. या सर्व मुलींनी सुरवातीला बिचकत पाऊल टाकले पण कुटुंबाचा आधार, समाजाची विचार करण्याची वाढलेली कुवत यामुळे थबकणारं पाऊल आता आत्मविश्वासाने पुढे येत आहे.

आधीच्या काळातील कुटुंबसंस्था कर्मठ आणि रितीरिवाजांवर चालणारी होती. घरात माणसांची गजबज, मुलींपेक्षा मुलांची संख्या अधिक असे. त्यामुळे घरातले धार्मिक विधी, पित्याचे अंतिम संस्कार कोण करणार असा प्रश्न उद्भवण्याच्या आत घरातील भाऊ मंडळींनी जबाबदारी पेललेली असायची. ती एकटी जरी असली, तरी मुलगी म्हणून तिच्या मताला किंमत मिळण्याची शक्यता धूसर असायची. अशावेळी काका, चुलतभाऊ ही जबाबदारी अंगावर घेत. त्यामुळे लग्न, मुंज असो अथवा दशक्रिया विधी घरातील महिला किंवा मुली ही जबाबदारी घ्यायला पुढे येत नसत. मात्र आता समाज बदलत चालला आहे. लहान कुटुंबे, एकुलती एक मुलगी असण्याचे प्रमाण वाढते आहे. शिवाय चूल आणि मूल यामध्ये अडकलेली बाई आता घराबाहेर पडून, कष्ट करून चार पैसे कमावते आहे. या आर्थिक स्वावलंबनामुळे स्वतःच्या आयुष्याचा चार्ज घेण्याइतपत विश्वास आजच्या महिलांमध्ये रुजतो आहे. त्यामुळे आता भावाच्या अनेक जबाबदाऱ्या बहीण पार पाडते. अपवाद सोडल्यास हा बदल समाज अंगिकारतो आहे. ज्या सामाजिक घटकाला काळानुरूप होणारा हा बदल पचत नसेल, त्या समाजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी 'आपण सर्वांनी परंपरा पाळणं' या विषयावर आत्मचिंतन केलं व विवेक दाखवला तर ते खूप फायद्याचं ठरेल, हे नक्की!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles